बस गायब, प्रवासी फलाटावर!
By Admin | Updated: December 17, 2015 23:43 IST2015-12-17T23:35:51+5:302015-12-17T23:43:28+5:30
अहमदनगर : पंचवीस टक्के वेतनवाढ व इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

बस गायब, प्रवासी फलाटावर!
अहमदनगर : पंचवीस टक्के वेतनवाढ व इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. इंटकच्या पुढाकाराने झालेल्या या आंदोलनाला मनसे, कास्ट्राईब संघटनांनीही पाठिंबा दिला. संपामुळे स्थानकावरून बस गायब झाल्या. परिणामी प्रवाशांना खासगी वाहनांची मदत घ्यावी लागली.
एसटी कर्मचाऱ्यांना २५ टक्के वेतनवाढ द्यावी, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, यासह इतर मागण्यांसाठी इंटकने राज्यभर संप पुकारला होता. कर्मचाऱ्यांनी आपापल्या आगारात बस बंद ठेवत घोषणाबाजी केली. शासनाने मागण्यांचा विचार केला नाही, तर संप बेमुदत सुरू राहील, असे पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले.
दरम्यान, या संपामुळे प्रवासी वाहतूक पूर्णपणे कोलमडली. शालेय विद्यार्थी तसेच नोकरदार खोळंबून पडले. ग्रामीण भागातील प्रवासी एसटीची वाट पाहत आहे तेथेच राहिले. काहींनी खासगी प्रवासी वाहनांचा आधार घेतला. या सर्व घडामोडींत खासगी वाहतूकदारांनी अव्वाच्या सव्वा भाडे आकारत संधी ‘कॅश’ केली. पारनेर, सुपा, जामखेड, कर्जत तसेच जिल्हाभरातील सर्वच आगारांत संपाचा परिणाम जाणवत होता. जवळपासचे प्रवासी खासगी वाहनांनी जात असले तरी पुणे, मुंबई, नाशिक अशा लांब पल्ल्यांचे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. तारकपूर आगारात इंटकचे हनिफ शेख, बाळासाहेब पातारे, दिनकर लिपाणे, संजय पाटोळे यांच्यासह अनेक आंदोलकांनी घोषणाबाजी करत बस बाहेर पडू दिल्या नाहीत. बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना खाली उतरविण्यापर्यंत आंदोलकांची मजल गेली. तारकपूर येथील काही गाड्यांची हवा कर्मचाऱ्यांनी सोडली.
(प्रतिनिधी)