फक्त १३ दिवस....दमछाक निश्चित
By Admin | Updated: April 22, 2024 11:35 IST2014-09-14T23:09:52+5:302024-04-22T11:35:29+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना फक्त १३ दिवसांचाच अवधी मिळणार असल्याने कमीतकमी वेळेत जास्तीतजास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान त्यांच्यापुढे उभे ठाकणार आहे.

फक्त १३ दिवस....दमछाक निश्चित
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना फक्त १३ दिवसांचाच अवधी मिळणार असल्याने कमीतकमी वेळेत जास्तीतजास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान त्यांच्यापुढे उभे ठाकणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार २० सप्टेंबरला निवडणुकीची अधिसूचना जारी केली जाणार आहे. २७ सप्टेंबरला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. १ आॅक्टोबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. १५ आॅक्टोबरला मतदान आहे.
निवडणुकीचे हे वेळापत्रक लक्षात घेतले तर फक्त १३ दिवसच उमेदवारांना त्यांच्या प्रचारासाठी मिळतात. मतदारसंघाची व्याप्ती आणि मतदारांची संख्या लक्षात घेतली तर इतक्या कमी वेळेत त्यांच्यापर्यंत पोहोचणे उमेदवारांसाठी अवघड काम आहे. अद्याप आघाडी आणि युतीचे जागा वाटपच झाले नाही. उमेदवार निवडही व्हायचीच आहे. ते झाल्यानंतर प्रचारात रंगत येणार आहे.
विशेष म्हणजे प्रचाराचा काळ हा नवरात्रोत्सवाचा आहे. त्यामुळे मतदारही उमेदवारांना कितपत मिळू शकतील हा प्रश्नच आहे. प्रत्येक मतदारसंघातील गल्लीबोळात नवरात्र महोत्सव साजरा केला जातो. त्यात त्या भागातील युवक सहभागी होतात. अशा वेळी प्रचार यात्रा किंवा प्रचार मिरवणुका काढल्या तरी त्याला मतदारांचा आणि त्या भागातील युवकांचा किती सहभाग मिळू शकतो हा प्रश्नच आहे. त्यामुळे सोशल मीडियाचाच जास्तीतजास्त वापर उमेदवारांना करावा लागणार आहे. नवरात्र महोत्सवात आचारसंहितेमुळे थेट सहभाग नोंदवता येणार नसला तरी आर्थिक पाठबळ मंडळाच्या मागे उभे करून उमेदवार संबंधित मंडळाच्या कार्यकर्त्यांचा प्रचारासाठी उपयोग करून घेऊ शकतो.
दसऱ्याच्याच दरम्यान किंवा दिवाळीच्या आधी शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षा घेतल्या जातात. दिवाळीच्या आधी महाविद्यालयांना सुट्या लागतात. त्या काळात अनेक कुटुंब बाहेरगावी जातात. याचाही फटका प्रचाराला बसू शकतो.
संपूर्ण राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका आहेत. त्यामुळे राज्यस्तरावरील किंवा केंद्रस्तरावरील स्टार प्रचारकांचे निवडणूक दौैरे आयोजित करणेही कठीण होणार आहे. दोन टप्प्यात निवडणुका झाल्या असत्या तर त्यानुसार नियोजन करणे सोपे जाते. मात्र एकाच वेळी संपूर्ण राज्यात नेत्यांना प्रचारासाठी फिरावे लागणार आहे. केंद्रीय नेत्यांचीही या कामात कसोटी लागणार आहे.