आयटीपार्कचा लिलाव

By Admin | Updated: June 9, 2014 00:04 IST2014-06-08T23:49:52+5:302014-06-09T00:04:11+5:30

अहमदनगर : उद्योजकांची मागणी फेटाळत प्रशासनाने आयटीपार्कचा आॅनलाईन लिलाव करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत़

ITPark auctioned | आयटीपार्कचा लिलाव

आयटीपार्कचा लिलाव

अहमदनगर : उद्योजकांची मागणी फेटाळत प्रशासनाने आयटीपार्कचा आॅनलाईन लिलाव करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत़ औद्योगिक वसाहतीतील इमारतीसाठी प्रथमच निविदा काढली जात असून, नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या या पध्दतीबाबत उद्योजकांमध्ये कमालीचे मतभेद आहेत़
नगर शहरात आयटी उद्योग सुरू व्हावेत, यासाठी येथील नागापूर औद्योगिक वसाहतीत महामंडळाने आयटीपार्कची इमारत उभारली़ ही इमारत उभारून १३ वर्षे उलटून गेली़ मात्र या इमारतीत एकही उद्योग सुरू होऊ शकला नाही़ उद्योग तर दूरचे झाले परंतु एकही गाळ्याची विक्री झाली नाही़ तेरा वर्षांनंतरही इमारतीचे कुलूप उघडले नाही़ आयटीपार्क उद्योगांच्या प्रतीक्षेत आहे़ प्रशासनाने पूर्वी ८ हजार प्रति चौरस मीटर, असे दर निश्चित केले होते़ पण एकाही उद्योजकांनी गाळा घेण्याची तयारी दर्शविली नाही़ लोकप्रतिनिधींनीही आयटी कंपन्यांना नगरला येण्याचे साकडे घातले नाही़ आयटीपार्कसाठी कोणतेही प्रयत्न झाले नाहीत़ त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेला हा पार्क धूळखात पडून आहे़ तो सुरू करण्यासाठी येथील ४० उद्योजकांनी एकत्र येऊन मागणी केली होती़ त्यामुळे खऱ्या अर्थाने आयटीपार्कच्या फायलीवरील धूळ झटकली गेली असून, प्रथमच आॅनलाईन लिलाव करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत़
ही इमारत आयटी उद्योगांसाठीच राखीव आहे़ या निर्णयावर प्रशासन ठाम आहे़ इतर वापरासाठी इमारतीची मागणी करण्यात आली होती़ परंतु याठिकाणी आयटी उद्योगच सुरू होतील, इतर कामासाठी ही इमारत मिळणार नाही, असे त्याचवेळी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते़
इमारतीचे आरक्षण बदलण्यासाठी प्रयत्न झाले़ परंतु ते न बदलता पुन्हा आयटी उद्योगांसाठी प्रशासनाने पायघड्या घातल्या असून, प्रथमच निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेऊन उद्योजकांना आवाहन केले आहे़ मात्र पूर्वीचे आणि सध्याच्या दरात कमालीचा फरक आहे़ पूर्वी ८ हजार चौरसमीटर, असे दर होते़ कमी दर असताना देखील त्यास प्रतिसाद मिळाला नाही़ हा अनुभव गाठीशी असूनही प्रशासनाने २१ हजार रुपये चौ़ मी़ असे कमीत कमी दर ठेवले आहे़ यापेक्षा अधिक बोली लावणाऱ्यांना इमारतीतील गाळ्यांचे वाटप केले जाणार आहे़ मात्र दरवाढीमुळे त्यास प्रतिसाद मिळणार की नाही, याबाबत साशंकता आहे़
़(प्रतिनिधी)
एकत्रितरित्या उद्योजकांनी मागणी केली़ मात्र सर्वसामान्यांना न देता आता निविदा काढली जात आहे़ त्यात आता दरही वाढविण्यात आला आहे,यावरून शासनाला ही इमारत बिल्डरांच्याच घशात घालयची असल्याचे स्पष्ट होत आहे़ पूर्वी कमी दर असूनही कुणी आले नाही़ दुपटीपेक्षाही अधिक दर देऊन येथे येणार कोण, हा प्रश्न आहेच
-हरजितसिंग वधवा, उद्योजक
पूर्वी निविदा न काढता केवळ दर प्रसिध्द केले जात होते़ त्यामुळे त्यास प्रतिसाद मिळाला नाही़ परंतु शासनाने आॅनलाईन लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यास नक्कीच प्रतिसाद मिळेल आणि नगरमध्ये आयटी उद्योग सुरू होतील़
-अशोक सोनवणे,
अध्यक्ष, आमी

Web Title: ITPark auctioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.