दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रोहयोतून मागेल त्याला काम द्या, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
By चंद्रकांत शेळके | Updated: September 9, 2023 21:06 IST2023-09-09T21:06:04+5:302023-09-09T21:06:18+5:30
अहमदनगर : गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. अशीच स्थिती राहिल्यास जिल्हा दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची ...

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रोहयोतून मागेल त्याला काम द्या, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
अहमदनगर : गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. अशीच स्थिती राहिल्यास जिल्हा दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने सर्व यंत्रणेने सज्ज राहावे. जिल्ह्यात मागेल त्याला काम उपलब्ध होण्यासाठी रोजगार हमी योजनेची कामे अधिक प्रमाणात सेल्फवर मंजूर करून ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.
संभाव्य दुष्काळसदृष्य परिस्थितीच्या बाबतीत करावयाच्या उपाययोजनाबाबत सर्व यंत्रणांची संयुक्त आढावा बैठकीचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्यासह सर्व तालुक्यांचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, संबंधित विभागांच्या प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले की, चालू वर्षात जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे.
पाऊस न झाल्यास दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा तसेच मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी यंत्रणांनी आवश्यक त्या सर्व उपायोजना कराव्यात. तालुकास्तरावर अधिकारी तसेच ग्रामस्तरावर काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बैठका घेऊन उपाययोजनांबाबत सूचना देण्यात याव्यात. टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठी मागणीप्रमाणे पुरवठ्याचे नियोजन करण्यात यावे. पाण्याचे स्त्रोत उपलब्ध असलेल्या जागांची माहिती अद्ययावत करण्यात यावी.
मजुरांच्या हाताला काम मिळण्यासाठी रोजगार हमी योजनेची कामे मोठ्या प्रमाणात मंजूर करुन घेण्यात यावीत. प्रत्येक गावात सार्वजनिक स्वरूपाची किमान पाच कामे मंजूर करून ठेवत सर्व यंत्रणांनी रोहयोची अधिकाधिक कामे सुरु करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी.