तहानलेल्या गावांसाठी उद्भवांची शोधाशोध!

By Admin | Updated: April 4, 2016 00:10 IST2016-04-04T00:10:52+5:302016-04-04T00:10:55+5:30

अण्णा नवथर, अहमदनगर कोरडे पडलेले उद्भव, लांबलेले कुकडीचे आवर्तन, यामुळे तहानलेल्या दक्षिण नगर जिल्ह्यासाठी पाण्याच्या उद्भवांची शोधाशोध प्रशासकीय यंत्रणेकडून सुरू आहे़

Hunt for thirsty villages! | तहानलेल्या गावांसाठी उद्भवांची शोधाशोध!

तहानलेल्या गावांसाठी उद्भवांची शोधाशोध!

अण्णा नवथर, अहमदनगर
कोरडे पडलेले उद्भव, लांबलेले कुकडीचे आवर्तन, यामुळे तहानलेल्या दक्षिण नगर जिल्ह्यासाठी पाण्याच्या उद्भवांची शोधाशोध प्रशासकीय यंत्रणेकडून सुरू आहे़ जामखेड शहरासाठी ६५ किलोमीटरवरील आष्टी तालुक्यातील वेलतुरी तलावातून टँकर भरून देण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला आहे़ त्यावर काय निर्णय होतो, याकडे जामखेडकरांच्या नजरा लागल्या आहेत़
दक्षिण नगर जिल्ह्यातील जामखेड, कर्जत, पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्याला पुणे जिल्ह्यातील कुकडी प्रकल्पातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो़ या तालुक्यांना कुकडी प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी देण्याचा निर्णय मंत्रालयातील बैठकीत झाला होता़ मात्र, त्यावर अद्याप निर्णय झाला नाही़ कुकडीचे आवर्तन लांबणीवर पडले़ त्यामुळे दक्षिण नगर जिल्ह्यात भीषण टंचाई निर्माण झाली आहे़ जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या कर्जत- जामखेड मतदारसंघात भीषण स्थिती निर्माण झाली आहे़ टँकर भरण्यासाठी देखील या दोन्ही तालुक्यात पाणी शिल्लक नाही़ उद्भव कोरडे पडल्यामुळे तहानलेल्या जामखेडकरांना आष्टी तालुक्यातील वेलतुरी तलावातून पाणी आणण्याचा पर्याय पुढे आला आहे़ या तलावातून जामखेड शहरासाठी दररोज २० टँकर भरून देण्याची मागणी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे़ तसा प्रस्तावही त्यांनी बीड जिल्हा प्रशासनास पाठविला आहे़ कुकडी प्रकल्पातून मिळणारे आवर्तन लांबल्याने दक्षिण नगर जिल्हा तहानला आहे़
तहानलेल्या गावांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी प्रशासनाकडून उद्भवांची शोधाशोध सुरू आहे़ वेलतुरी तलावातून जामखेड शहरासाठी टॅँकरद्वारे पाणी आणणे, त्याचाच एक भाग आहे़ मात्र कर्जत व जामखेड तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे़ दक्षिण नगर जिल्ह्यातील पाथर्डीसह नगर तालुक्याला नेवासा तालुक्यातील औद्योगिक वसाहतीतून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे़
(प्रतिनिधी)
उत्तर नगर जिल्ह्यातील कोपरगाव, शिर्डी आणि राहाता तालुक्यासाठी नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणातून गोदावरी नदीद्वारे आवर्तन सोडण्यात आले आहे़ या आवर्तनातून श्रीरामपूर तालुक्यातील काही तलाव भरून घेतले जाणार आहेत़ दारणा धरणातील आवर्तन सुटल्याने वरील तिन्ही तालुक्यांतील उद्भव भरणे शक्य होईल़ या उद्भवावरील शहरांसाठीच्या पाणी योजनादेखील पूर्ववत होणार आहेत़
मुळा व भंडारदरातून आवर्तन सुरू
भंडारदरा धरणातून पाणी योजनांचे उद्भव भरण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे़ श्रीरामपूर शहराला पाणी पुरवठा करणारे उद्भवदेखील या पाण्यातून भरून घेतले जाणार असल्याने या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे़ मुळा धरणातून मुसळवाडी तलावात पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे़ मुळातून लवकरच नेवासा तालुक्यातील सोनई व भेंडा येथील तलाव भरून घेण्यासाठी आवर्तन सोडण्यात येणार आहे़ या दोन्ही धरणांमुळे श्रीरामपूर, नेवासा, नगर, पाथर्डी तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे़
पालकमंत्र्यांचा मतदारसंघ तहानला
जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या कर्जत- जामखेड मतदारसंघात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे़ या भागातील उद्भव कोरडे पडल्याने या भागात टँकरने पाणी पुरविणेही कठीण झाले आहे़ कुकडी प्रकल्पातून आवर्तन सोडण्यासाठी शिंदे आग्रही आहेत़ त्यांनी जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कुकडीतून तत्काळ पाणी सोडण्याची मागणी केली होती़ मात्र, त्यावर अद्याप कोणताही निर्णय होऊ शकला नाही़ त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात विशेषकरून जामखेड शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून, या शहराची आता बीड जिल्ह्यावर भिस्त आहे़

Web Title: Hunt for thirsty villages!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.