शतकोत्तरी गुरूपौर्णिमेला लाखोंची मांदियाळी
By Admin | Updated: July 13, 2014 00:19 IST2014-07-12T23:43:32+5:302014-07-13T00:19:21+5:30
शिर्डी : शिर्डीतील शतकोत्तरी गुरूपौर्णिमेच्या मुहूर्तावर शनिवारी लाखो भाविकांनी साईदरबारी हजेरी लावत साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले.
शतकोत्तरी गुरूपौर्णिमेला लाखोंची मांदियाळी
शिर्डी : शिर्डीतील शतकोत्तरी गुरूपौर्णिमेच्या मुहूर्तावर शनिवारी लाखो भाविकांनी साईदरबारी हजेरी लावत साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले. विशेष म्हणजे पहाटे मंदिर उघडण्यापूर्वीच भाविकांच्या रांगा शहराबाहेर पोहोचल्या होत्या़
द्वारकामाईत शुक्रवारपासून सुरू असलेल्या साईसच्चरित्र ग्रंथ पारायणाची सकाळी सांगता झाली़ यानिमित्ताने साईप्रतिमा व साईसच्चरित्र ग्रंथाची द्वारकामाई मंदिरातून मिरवणूक काढण्यात आली़ ही मिरवणूक गुरूस्थान मंदिरात व तेथून समाधी मंदिरात नेण्यात आली़ तत्पूर्वी सुवासिनींनी साई ग्रंथ धरणारे संस्थानचे अध्यक्ष शशिकांत कुलकर्णी, साईप्रतिमा धरणारे कार्यकारी अधिकारी कुंदन सोनवणे व उपकार्यकारी अधिकारी अप्पासाहेब शिंदे, तसेच विणाधारक रामराव शेळके यांचे औक्षण केले़ यानंतर अध्यक्ष शशिकांत कुलकर्णी व सुषमा कुलकर्णी यांच्या हस्ते समाधीची पाद्यपूजा करण्यात आली़ माध्यान्ह आरतीला कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सपत्नीक हजेरी लावली़
दुपारी ह़भ़प़माधवराव आजेगावकर (परभणी) यांच्या कीर्तनाचा, तर रात्री विजय साखरकर (मुंबई) यांचा सार्इंच्या गाण्यांवर आधारित नृत्यमय कार्यक्रम झाला़ रात्री सव्वानऊ वाजता श्रींच्या सुवर्ण रथाची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली़ यात मोठ्या प्रमाणावर भाविक व ग्रामस्थांबरोबरच अनेक बॅन्ड पथके सहभागी झाली़ उत्सवाच्या निमित्ताने भाविकांच्या देणगीतून मंदिर व परिसरात फुलांची सजावट करण्यात आली़ भाविकांच्याच देणगीतून तीनही दिवस मोफत अन्नदान होत आहे़ पहिल्या दिवशी ७० हजार भाविकांनी मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेतला, तर ८० भाविकांनी रक्तदान केले.
पुस्तक प्रकाशन
साईभक्त मुग्धा सुधीर दिवाडकर यांच्या सार्इंवरील पुस्तकाचे प्रकाशन कुंदन सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले़यावेळी आप्पासाहेब शिंदे, लेखिका मुग्धा दिवाडकर, जनसंपर्क अधिकारी मोहन यादव उपस्थित होते. १८५४ ते १९१८ या कालावधीत साई सहवासात आलेल्या प्रमुख भक्तांचा इतिहास याद्वारे मांडण्यात आला आहे़
निर्णयावर नाराजी
उत्सव काळात केवळ संस्थानचे पदाधिकारी व अधिकारी यांचेच वस्त्र मूर्तीवर चढवण्याच्या निर्णयावर संस्थानचे माजी विश्वस्त डॉ़ एकनाथ गोंदकर यांनी आक्षेप घेत हा सामान्य भाविकांवर अन्याय असल्याचे सांगितले़ सकाळच्या ग्रंथ मिरवणुकीच्या वेळी बराच वेळ मंदिर विनाकारण निर्मनुष्य ठेवण्यात आल्याबद्दलही गोंदकर यांनी नाराजी व्यक्त केली़ दर्शनबारीत पाच ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती.