अधिकाऱ्यांना औद्योगिक विकासाचे वावडे
By Admin | Updated: June 25, 2014 00:31 IST2014-06-24T23:35:30+5:302014-06-25T00:31:01+5:30
अहमदनगर : येथील औद्योगिक वसाहतीतील समस्यांबाबत लोकप्रतिनिधींना नेहमीच जबाबदार धरले जाते़ मात्र वसाहतीतील समस्या सोडविणे तर दूरच, पण जिल्हा उद्योग मित्र समितीच्या बैठकीला

अधिकाऱ्यांना औद्योगिक विकासाचे वावडे
अहमदनगर : येथील औद्योगिक वसाहतीतील समस्यांबाबत लोकप्रतिनिधींना नेहमीच जबाबदार धरले जाते़ मात्र वसाहतीतील समस्या सोडविणे तर दूरच, पण जिल्हा उद्योग मित्र समितीच्या बैठकीला हजर राहण्याचीही तसदी प्रमुख अधिकारी घेत नाहीत़ त्यामुळे लोकप्रतिनिधींहून अधिक प्रमुख अधिकाऱ्यांनाच औद्योगिक विकासाचे वावडे असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे़
शहरासह जिल्ह्यात स्वतंत्र औद्योगिक वसाहती आहेत़ नागापूरसह सुपा, नेवासा आणि केडगाव येथे महामंडळाने वसाहती उभारल्या आहेत़ येथील समस्या सोडवून उद्योग वाढविणे, काही एकट्याचे काम नाही़ त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे़ मात्र हे प्रयत्न करायचे कोणी असा प्रश्न आहे़ वसाहतीतील रस्ते, पाणी, वीज, संरक्षण, वाहतूक कोंडी, उद्योगांमुळे होणारे प्रदुषण, यासारख्या छोट्या समस्यांनी उद्योजक अस्वस्थ झाले आहेत़ जिल्हा उद्योग मित्र समितीच्या बैठकीत प्रत्येक वेळी उद्योजक पोट तिडकीने प्रश्न मांडतात़ परंतु त्याचे पुढे काय होते, ते सर्वश्रुत आहे़ प्रश्न सोडविणे तर दूरचे झाले़ पण समस्या काय आहेत, त्याची माहिती घेण्याची तसदीदेखील अधिकारी घेताना दिसत नाहीत़ त्यामुळे औद्योगिक वसाहती बकाल होत असून, नवीन उद्योजकांनी पाठ फिरविली आहे़ छोटे-छोटे प्रश्न सुटत नाहीत़ तिथे मोठे प्रश्न कसे सुटणार असा प्रश्न आहे़ हजारो हातांना काम देणाऱ्या उद्योगांकडे लक्ष देण्यास प्रमुख अधिकाऱ्यांना फुरसत नाही़ त्यामुळे समस्यांचा डोंगर वाढतच आहे़ प्रत्येक बैठकीत त्याच त्या मुद्यांवर खल होतो़ मात्र प्रश्न सुटत नाहीत, उद्योगाचे खरे दुखणे आहे़
एमआयडीसीतील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उद्योग मित्राची बैठक नुकतीच पार पडली़यावेळी उद्योग संघटनांनी विविध प्रश्न मांडले़ परंतु ते एकूण घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम, महापालिका, पोलीस प्रशासन, प्रदुषण नियंत्रण मंडळ, जिल्हा परिषद, जिल्हा सहनिबंधक, महावितरण, वाहतूक पोलीस यापैकी कुणीच उपस्थित नव्हते.
संबंधित विभागाच्या प्रमुखांना बैठकीची माहिती पत्राव्दारे,दुरध्वनीव्दारे कळविली जाते़ तसेच बैठकीच्या दोन दिवस आधी सर्वांना उपस्थित राहण्याचेही कळविले जाते़ मात्र कुणीही उपस्थित राहत नाहीत़
- एस.ए.भामरे, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र
प्रत्येक बैठकीत केवळ चर्चा होते़ परंतु त्यावर काहीच कार्यवाही होत नाही़ अधिकारीच उपस्थित नसतील तर कार्यकाही होणार कशी, ही बाब जिल्हा प्रशासनाच्या वेळोवेळी निदर्शनास आणून दिली़ मात्र सुधारणा होत नसल्याने छोटे-छोटे प्रश्न जैसे थे आहेत़
- हरजितसिंग वधवा, उद्योजक
या आहेत समस्या...
रस्त्यांची दुरवस्था
अनियमित पाणीपुरवठा
विस्कळीत वीजपुरवठा
वाहतुकीची कोंडी
चोऱ्यांचे प्रमाण वाढले
ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
रस्ता रुंदीकरणे रखडले
दांडी बहाद्दर
आजारी उद्योगांची संख्या वाढली
एलबीटीचे भिजत घोंगडे़
अनुदानाच्या फायलींवर धूळ
दिशादर्शक फलकांची निविदा रखडली
पोलीस प्रशासन
बांधकाम विभाग
महापालिका
जिल्हा परिषद
जागतिक बँक प्रकल्प
महावितरण
जिल्हासह निबंधक
पोल्युशन मंडळ