कारखान्यांचे बॉयलर थंडावले

By Admin | Updated: April 18, 2016 00:38 IST2016-04-18T00:26:29+5:302016-04-18T00:38:25+5:30

अहमदनगर : मराठवाड्याला सोडण्यात आलेले पाणी, उसाचे घटलेले क्षेत्र यामुळे एप्रिलच्या मध्यावरच जिल्ह्यातील २० साखर कारखान्यांचा गळीत हंगाम आटोपला आहे.

Factory boilers stopped | कारखान्यांचे बॉयलर थंडावले

कारखान्यांचे बॉयलर थंडावले

अहमदनगर : दुष्काळस्थिती, पावसाने दिलेला ताण, मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरणातून मराठवाड्याला सोडण्यात आलेले पाणी, उसाचे घटलेले क्षेत्र यामुळे एप्रिलच्या मध्यावरच जिल्ह्यातील २० साखर कारखान्यांचा गळीत हंगाम आटोपला आहे. सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या कारखान्यांनी ९२ लाख ७० हजार मेट्रीक टन उसाचे गाळप केले असून त्यातून १ कोटी १४ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक साखर उतारा प्रवरा साखर कारखान्याचा ११.९५ टक्के असून सर्वाधिक साखर उत्पादन अंबालिका कारखान्याचे १२ लाख ५१ हजार क्विंटल झालेले आहे.
यंदा तीव्र उन्हाळा असल्याने नगरसह मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सध्या जिल्ह्यात पाण्याच्या टँकरचा आकडा ५६५ वर पोहोचला आहे. मुळा आणि भंडारदरा धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यात आलेले आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतीचा सोडा पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे जवळपास ९० टक्क्यांनी उसाचे क्षेत्र घटले आहे. चाऱ्यासाठीही मोठ्या प्रमाणात ऊस तोडला होता़
कुकडी, घोडमधून पिण्यासाठी पाणी सोडण्यात आल्याने दक्षिण जिल्ह्यात काही भागात उसाचे नगण्य क्षेत्र आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांनी पशुधन वाचवण्यासाठी खोडवा उसाचा चारा म्हणून वापर केला आहे.
यामुळे पुढील हंगामासाठी जिल्ह्यात ऊसच नसल्याचे चित्र आहे. १७ तारखेला संगमनेर साखर कारखान्याच्या गाळपाचा समारोप झाला असून चालू हंगामात राहुरी, साईकृपा २ हे कारखाने सुरू होवू शकले नाहीत. नगर कारखाना सुरू झाला. मात्र, या ठिकाणी अवघे ४ हजार मेट्रीक टन गाळप झाले.
(प्रतिनिधी)
झालेले गाळप
संजीवनी- ५ लाख ५० हजार, कोपरगाव- ४ लाख ९२ हजार, गणेश- ३ लाख २३ हजार, अशोक- ४ लाख ९६ हजार, प्रवरा- ७ लाख ८७ हजार, श्रीगोंदा- ५ लाख ६४ हजार, थोरात- ८ लाख ७० हजार, ज्ञानेश्वर- ८ लाख ६ हजार, वृध्देश्वर- २ लाख ३४ हजार, मुळा- ६ लाख ८५ हजार, अगस्ती- ४ लाख ५१ हजार, केदारेश्वर- ४४ हजार, क्रांती- १ लाख २८ हजार, कुकडी- ५ लाख १८ हजार, नगर- ७ हजार, अंबालिका- १० लाख ७ हजार, गंगामाई- ६ लाख २५ हजार, साईकृपा- १ लाख ७५ हजार, प्रसाद- २ लाख ५८ हजार, जयश्रीराम- १ लाख ७१ हजार असे आहे.
नाशिक विभागात नगर आणि नाशिक या दोन जिल्ह्यातील कारखान्यांचा समावेश आहे. या विभागात चालू हंगामात १०४ लाख २४ हजार मेट्रीक टन उसाचे गाळप झालेले आहे. यातून ११३ लाख ६१ हजार मेट्रीक टन साखर उत्पादन झालेले आहे. या दोन जिल्ह्यांचा साखर उतारा १०.९४ टक्के निघालेला आहे.

Web Title: Factory boilers stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.