टंचाई योजनांना ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ
By Admin | Updated: August 2, 2014 01:01 IST2014-08-02T00:00:01+5:302014-08-02T01:01:46+5:30
अहमदनगर: जिल्ह्यातील टंचाईच्या उपाययोजना बंद न करता सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़
टंचाई योजनांना ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ
अहमदनगर: जिल्ह्यातील टंचाईच्या उपाययोजना बंद न करता सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ टंचाईच्या विविध योजनांना येत्या ३१आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, टँकर सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली़
महसूल दिनानिमित विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत कवडे बोलत होते़ त्यावेळी त्यांनी वरील माहिती दिली़ पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात पाणी टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला़ यासह विविध उपाययोजनाही करण्यात येत आहेत़ सुरुवातीला ३० जुलैपर्यंत याविषयीच्या विविध योजनांना मुदतवाढ दिली होती़ जुलैमध्ये पाऊस पडेल, अशी अपेक्षा होती़ मात्र जुलै महिन्यांत पावसाची सरासरी वाढली नाही़ त्यामुळे शासनाने टंचाईबाबतच्या विविध योजनांना येत्या ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यानुसार उपाययोजना सुरू ठेवल्या जातील़ योजनांचा फेर आढावा घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत़ जिल्ह्यात कुठे टँकरची आवश्यकता आहे आणि कुठे नाही, याविषयीचा अहवाल मागविण्यात आला आहे़ अहवाल प्राप्त झाल्यानंतर टँकरबाबत निर्णय घेतला जाईल़ मात्र जिथे गरज आहे, तिथे टँकर दिले जातील, असे कवडे यावेळी म्हणाले़
जिल्ह्यात आतापर्यंत २३ टक्के इतकाच पाऊस झाला आहे़ पुरेसा पाऊस पडला नाही़ सुदैवाने मुळा व भंडारदरा धरणाच्या पाणलोटक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला़ त्यामुळे दोन्ही धरणांत नवीन पाण्याची आवक सुरू झाली़ मुळा ४६ तर भंडारदरा धरण ६२ टक्के इतके भरले आहे़ त्यात आता पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोरही ओसरला आहे़ त्यामुळे आवक मंदावली असून, आणखी पाऊस होण्याची गरज आहे़ शासनाच्या वतीने पाणीटंचाई असलेल्या गावात ज्या उपाय योजना सुरू आहेत, त्या सुरूच राहतील़ त्यात खंड पडणार नाही, असे ते म्हणाले़
(प्रतिनिधी)
२८१ गावांत
टंचाई कायम
जिल्ह्यातील २८१ गावे आणि १ हजार ३०१ वाड्या-वस्त्यांना ३४९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ पावसाळा सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी लोटला तरीदेखील टँकरची संख्या कायम आहे़त्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़
अधिकाऱ्यांना
सतर्कतेचे आदेश
माळीण येथे दरड कोसळल्याची घटना घडली आहे़ या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत़ आपत्ती व्यवस्थापन कक्षातील यंत्रणा अद्ययावत करण्याच्या सूचना करण्यात आल्या असून, जिल्ह्यात धोकादायक असलेल्या परिसराची पाहणी करून अहवाल मागविण्यात आले आहेत, असे कवडे यांनी यावेळी सांगितले़