सहा महिन्यांपासून ई-लायब्ररी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:37 IST2021-03-04T04:37:34+5:302021-03-04T04:37:34+5:30
श्रीरामपूर : केवळ उत्पन्न मिळत नाही या कारणासाठी नगरपालिकेने गेल्या सहा महिन्यांपासून ई-लायब्ररी बंद ठेवली आहे. लायब्ररीतील सर्व्हर व ...

सहा महिन्यांपासून ई-लायब्ररी बंद
श्रीरामपूर : केवळ उत्पन्न मिळत नाही या कारणासाठी नगरपालिकेने गेल्या सहा महिन्यांपासून ई-लायब्ररी बंद ठेवली आहे. लायब्ररीतील सर्व्हर व बॅटरी धूळ खात पडून आहेत. वातानुकूलित यंत्रणाही कार्यान्वित नाहीत. त्यामुळे ४० हजार पुस्तके व अभ्यासक्रमाचा डेटा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, अशी टीका उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केली.
पालिकेच्या बंद असलेल्या लोकमान्य टिळक वाचनालयातील ई-लायब्ररीच्या विभागाला ससाणे यांच्यासह माजी नगराध्यक्ष संजय फंड, श्रीनिवास बिहाणी, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे, रितेश रोटे, मनोज लबडे, प्रवीण नवले, लक्ष्मण कुमावत, सुहास परदेशी यांनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी सत्ताधा-यांच्या कारभारावर टीका केली.
दिवंगत राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी २०१३ मध्ये या ई-लायब्ररीचे उद्घाटन केले. जिल्ह्यातील ही एकमेव ई-लायब्ररी होती. अल्पदरात विद्यार्थ्यांना शिकण्याची त्यामुळे सुविधा प्राप्त झाली. येथून स्पर्धा परीक्षा तसेच सरकारी नोकरीचे अर्ज विद्यार्थ्यांना मोफत भरता येत होते. मात्र गेल्या सहा महिन्यापासून ती बंद स्थितीत आहे. कंत्राट संपले तरी त्याचे नूतनीकरण करण्यात आले नाही, अशी टीका यावेळी विरोधकांनी केली.
सत्ताधा-यांना शिक्षण घेण्यासाठी सर्वसामान्यांना येणा-या अडचणींची माहिती नाही. केवळ दिवंगत नेते जयंत ससाणे व त्यांच्या सहका-यांनी उभारलेली वास्तू असल्याने बंद पाडल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
कोणत्याही परिस्थितीत लायब्ररी बंद पाडण्याचा डाव यशस्वी होऊ दिला जाणार नाही. येत्या आठ दिवसांमध्ये ती पूर्ववत सुरू झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा विरोधकांनी दिला.
.....
अर्थसंकल्पाचा काय उपयोग
एक रुपयाचीही करवाढ नसलेला अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला. १८८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असला तरी जनतेच्या हिताचे असे उपक्रम बंद पडत आहेत, अशी टीका यावेळी करण्यात आली.
-----------