शिर्डी : मंत्रालयात जनतेच्या हिताची कामे घेऊन जरूर या, पण स्टेट्स सिम्बॉल म्हणून येऊ नका. आपली संस्कृती वेगळी आहे, अशा शब्दात कान टोचत सरकार आणि पक्ष यांच्यात सेतू म्हणून काम करा आणि सरकारची कामे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे आयोजित भाजपच्या प्रदेश अधिवेशनात पक्षजनांना केले.
आगामी शंभर दिवसांत करावयाच्या कामांकडे लक्ष्य दिले आहे. सरकारचा कारभार पारदर्शक आणि प्रामाणिक राहील. त्यासाठी आपल्याला भाजप पक्षसंघटनेची साथ लागेल. ‘श्रद्धा, सबुरी’चा अर्थ समजून घ्या. हा अर्थ ‘राष्ट्र प्रथम, अंत मे मै’ या भाजपच्या ब्रीदवाक्यातही आहे. ज्यांना तो समजला नाही, त्यांची अवस्था वाईट झाली, असा चिमटा फडणवीस यांनी काढला. भाजपची सदस्य नोंदणी ४३ लाख झाली आहे, २० जानेवारीपर्यंत ती दीड कोटींवर न्या, असे आवाहन फडणवीस यांनी केले.
शिंदे, पवारांना घेऊनच वाटचाल एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन नेत्यांना सोबत घेऊनच महायुतीची वाटचाल सुरू राहील. रिपाइंसारख्या लहान पक्षांनाही सोबतच ठेवू, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
व्होट जिहाद २चे आव्हानमालेगावमधील बांगलादेशी घुसखोरांच्या प्रकरणाचा उल्लेख करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मालेगाव, अंजनगाव यासारख्या ठिकाणी एकेका दिवसात ५०-६० जन्माचे दाखले दिले गेल्याचे समोर आले आहे. हे व्होट जिहाद पार्ट २ आहे आणि त्याचा बीमोड करावाच लागेल, एकाही घुसखोराला देशात ठेवता कामा नये. जात - पंथावरून दुफळी कशी माजेल, याचा प्रयत्न अराजकतावादी शक्ती करत आहेत. त्यांच्याविरूद्धची आमची लढाई सुरूच राहील. विधानसभा निवडणुकीत आमचे नेते नरेंद्र मोदी यांनी ‘एक है तो सेफ है’चा नारा दिला, साधूसंतांच्या आशीर्वादाने भगवी लाट निर्माण झाली, असेही फडणवीस म्हणाले.