धामोरी - बाभुळगाव शिवरस्ता झाला खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:19 IST2021-03-15T04:19:06+5:302021-03-15T04:19:06+5:30
राहुरी : रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून राहुरी तालुक्यातील धामोरी - बाभूळगाव या दोन्ही गावचा शिवरस्ता गेल्या अनेक वर्षांपासून बंद ...

धामोरी - बाभुळगाव शिवरस्ता झाला खुला
राहुरी : रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून राहुरी तालुक्यातील धामोरी - बाभूळगाव या दोन्ही गावचा शिवरस्ता गेल्या अनेक वर्षांपासून बंद केला होता. यामुळे त्यापुढे जाणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांची वाहने, ट्रॅक्टर व शेतीमाल काढण्यास मोठी अडचण निर्माण झाली होती. महसूलच्या सप्तपदी अभियानातून शेतकऱ्यांत समेट घडवून हा रस्ता खुला करण्यात आला आहे. यामुळे शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे.
धामोरी येथील शेतकऱ्यांनी शिवरस्ता खुला करुन मिळण्यासाठी महसूलच्या विजय सप्तपदी अभियानअंर्तगत रस्ता खुला करावा, यासाठी राहुरी तहसील कार्यालयात अर्ज केला होता. त्या अर्जाचा श्रीरामपूर प्रांत कार्यालयाचे प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकारी डाॅ. दयानंद जगताप, राहुरीचे तहसीलदार फसेउद्दीन शेख यांनी तत्काळ दखल घेत पाहणी केली. शिव रस्त्यालगतच्या दोन्ही गावच्या शेतकऱ्यांना बोलावून त्यांच्यात समन्वय साधत समेट घटविला. यानंतर जेसीबीच्या साह्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूने नंबरे रोवून व रस्त्यावरील पिके हटवून शिवरस्ता खुला केला. त्यामुळे पुढे जाणाऱ्या शेतकऱ्यांची अडचण दूर झाली. रस्ता अतिक्रमण खुले करण्यासाठी वांबोरी महसूल मंडलाचे मंडलाधिकारी दत्ता गोसावी, तलाठी एस. यु. राणे, बाभूळगावच्या ग्रामसेवक श्रीमती ताकपिरे, सरपंच गोरक्षनाथ गिऱ्हे, उपसरपंच माने, धामोरीचे सरपंच काका बकरे, उपसरपंच रघुनाथ उगले, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विलास गिऱ्हे, पोलीसपाटील उमेश पाटोळे, जाधव पाटील यांचे सहकार्य लाभले. महसूल विजय सप्तपदी अभियानांर्तगत शिवरस्ता खुला केल्याबद्दल प्रांताधिकारी डाॅ. जाधव व तहसीलदार शेख यांचे दोन्ही गावच्या शेतकऱ्यांनी आभार मानले.
.....
राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या गावातील शिवरस्ते, पांदण रस्ते, महसुली नकाशावरील रस्ते, आक्रमण झालेले रस्ते असतील तर सर्वांनी एकत्र येऊन अभियानात भाग घ्यावा. सामंजस्याने रस्ते खुले करुन घ्यावेत. जेणेकरुन आपला शेतीमाल आपल्याला शेतीच्या बाहेर काढण्यास अडचण होणार नाही. या अभियानात शेतकरी एकत्र आल्यास रस्त्याचे प्रश्न मिटणार आहेत. त्याकरिता गावातील सरपंच, तंटामुक्त समित्यांचे अध्यक्ष, पोलीसपाटील, तलाठी आणि ग्रामसेवक यांचा सहभाग महत्त्वाचा आहे.
- डाॅ. दयानंद जाधव,
उपविभागीय अधिकारी, श्रीरामपूर.
.....