विजेच्या सततच्या झटक्यांमुळे पिकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:21 IST2021-04-09T04:21:03+5:302021-04-09T04:21:03+5:30
राजापूर परिसरात शेतीसाठी आठ तास वीजपुरवठा केला जातो. पण त्यातला एक तास तर वीज रोजचीच गायब असते. जेव्हा वीज ...

विजेच्या सततच्या झटक्यांमुळे पिकांना फटका
राजापूर परिसरात शेतीसाठी आठ तास वीजपुरवठा केला जातो. पण त्यातला एक तास तर वीज रोजचीच गायब असते. जेव्हा वीज असते तेव्हा सारखी ये-जा सुरू असते. त्यामुळे सातत्याने सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने पाणी असूनही पिकांना पुरेसे पाणी देता येत नाही. सद्य:स्थितीत कांदा पिकासाठी एक किंवा दोनच पाण्याची गरज आहे, परंतु हातातोंडाशी आलेला घास विजेच्या लपंडावामुळे शेतकऱ्यांपासून दुरावला जाण्याची भीती आहे. रात्री-अपरात्री शेतकरी शेतावर जातात. त्या वेळीही विजेच्या बाबतीत अशीच स्थिती निर्माण होते. यामुळे शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.
..........
वीजपुरवठा सुरळीत करावा
वीजपुरवठा सुरळीत व पूर्ण दाबाने करावा, अशी मागणी सरपंच प्रतीषा धनंजय मेंगवडे, सदस्य नीलम घावटे, माजी उपसरपंच सचिन चौधरी, अरुण शेळके, संजय शेळके, मच्छिंद्र गुंजाळ या शेतकऱ्यांनी केली आहे.
................
शेतातील कांदा पीक काढणी एक-दोन पाण्यावर आली आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना विजेच्या लपंडावामुळे पाणी असूनही पिकांना पाणी देता येईना. योग्य दाबाने सुरळीत वीजपुरवठा करावा अन्यथा आक्रमक पवित्रा घेतला जाईल.
- मच्छिंद्र गुंजाळ, संजय शेळके,
शेतकरी
..........
पिंप्री कोलंदर फिडरवर ओव्हरलोड होत असल्याने संपूर्ण भागात एक तास वीज बंद असून वरूनच ट्रिपिंग होत असल्याने वीज झटके मारते. बेलवंडी येथे पॉवर ट्रान्सफार्मरचे काम सुरू आहे. लवकरच वीज सुरळीत होईल. कृषी योजनेतून राजापूरसाठी नवीन सबस्टेशनचा प्रस्ताव पाठवला आहे.
- पी.ए. बारहाते, उपअभियंता,
पिंप्री कोलंदर सबस्टेशन