कोतूळ : ग्रामपंचायतीच्या निवडणुका असल्याने परगावी राहणारे मतदार सध्या गावात आले आहेत. दोन्ही बाजूंचा पाहुणचार घेणारे हे मतदार मत मात्र कुणाला देणार? याविषयी अनिश्चितता असल्याने हे पाहुणे उमेदवारांना डोकेदुखी ठरत आहेत.
सध्या ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकांचा धुराळा उडाला आहे. तसेच निवडून येण्यासाठी प्रत्येक मतावर उमेदवारांची नजर आहे. मात्र, मतदार यादीत गावातील पटाईत पुढारी व मतदार नोंदणी कर्मचारी यांच्या कृपेने गेली ४० ते ५० पन्नास वर्षे गावाबाहेर नोकरी, व्यवसायानिमित्त तसेच मोलमजुरीसाठी गेलेले मतदार टिकवून ठेवले आहेत. त्यांची संख्या शंभरीच्या घरात आहे.
हे मतदार विधानसभा, लोकसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकांमध्ये अजिबात दिसत नाहीत. गावाकडील लग्न, सप्ताह, सुख-दुःखाचे प्रसंग, यात्रा यातही कधीच दिसत नाहीत. गावाकडे असलेल्या वृद्ध आई-वडिलांना दिवाळ सणालासुद्धा भेटायला येत नाहीत. केवळ पाच वर्षांतून ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र न चुकता, न बोलावता आठ दिवस अगोदरच स्वतःहून हजेरी लावतात.
विशेष म्हणजे ते दोन्ही उमेदवारांचा पाहुणचार झोडपतात. त्यांचे शहरी ब्रॅन्ड उमेदवारांना न परवडणारे असतात.
.........
आलटून-पालटून पाहुणचार
विशेष म्हणजे एकाच प्रभागात एका समोर एक असे किमान सहा किंवा अधिक उमेदवार असतात. त्यामुळे आलटून-पालटून एक-दोन दिवसांनी उमेदवारांना गंडवतात. प्रत्येकाकडून जाण्या-येण्याचे भाडे वसूल करतात. कोतूळात एकाच नात्यातील दोन उमेदवार उभे आहेत. त्यांना गंडा घालणारा एक पाहुणा मतदार दोघांच्याही लक्षात आल्याने हे प्रकरण समोर आले. मात्र, निवडणूक संपताच हे पाहुणे आणखी कुठे मतदार आहेत का, याची शोधमोहीम सुरू होणार आहे. शिवाय ग्रामपंचायत निवडणुकीत पन्नास मते निर्णायक ठरत असल्याने आता अशा मतदारांनी निकालाची धाकधूक वाढवली आहे.