भाजपात गटबाजीचे महाभारत सुरूच
By Admin | Updated: May 28, 2014 00:13 IST2014-05-27T23:51:32+5:302014-05-28T00:13:40+5:30
अहमदनगर : देशात आणि जिल्ह्यात मिळालेल्या अभूतपूर्व यशाने भाजपात उफाळलेले गटबाजीचे महाभारताचे पर्व संपेल असे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाटत असतानाच दुसरा अंक सुरू झाला आहे.

भाजपात गटबाजीचे महाभारत सुरूच
अहमदनगर : देशात आणि जिल्ह्यात मिळालेल्या अभूतपूर्व यशाने भाजपात उफाळलेले गटबाजीचे महाभारताचे पर्व संपेल असे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाटत असतानाच दुसरा अंक सुरू झाला आहे. खासदार दिलीप गांधींना मंत्रिपद न मिळाल्याने एक गट खुशीत आहे. त्यांची गद्दार, दृष्ट, कावळे अशी संभावना गांधी समर्थकांनी केली आहे. ज्येष्ठ नेते मधुसूदन मुळे, श्रीकांत साठे यांनी मंगळवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे विरोधकांचा समाचार घेतला आहे. गांधी यांना मंत्रिपद मिळू नये यासाठी भाजपामधीलच एका गटाने प्रयत्न केल्याची चर्चा उघडपणे शहरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी हे पत्रक काढून विरोधकांवर टीका केली आहे. गांधींना मंत्रिपद मिळू नये म्हणून काही दृष्ट प्रवृत्ती श्रेय घेत आहेत. या दवंडी पिटणार्या गद्दारांनी गांधी अडीच लाख मतांनी निवडून आल्याचे ध्यानात ठेवावे. पक्षातील आणि बँकेतील असंतुष्ट मंडळी नेहमी विरोधात उपद््व्याप करीत असते. परंतु ते प्रत्येक वेळी तोंडावर पडले. देशाचा कारभार पाहणारे श्रेष्ठ नेते अशा कावळ्यांच्या किवकिवाकडे लक्ष देत नसतात. कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते हेही त्यांनी ध्यानात ठेवावे, असे शेलके टोमणे मारले आहेत. मंत्रिमंडळ सर्वसमावेशक करताना अनेक दिग्गजांना संधी मिळाली नाही. मात्र, या पुढील विस्तारात गांधींना मंत्रिपदाची संधी मिळू शकते. गांधी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहणार आहेत, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे. मुळे व साठे यांच्या या पत्रकबाजीनंतर दुसरा गट काय भूमिका घेतो. याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)