भाजपात गटबाजीचे ‘कमळ’
By Admin | Updated: April 7, 2016 00:05 IST2016-04-06T23:55:28+5:302016-04-07T00:05:08+5:30
अहमदनगर : शहर जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीनंतर शहर भाजपामध्ये स्थापना दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा गटबाजीचे प्रदर्शन झाले.

भाजपात गटबाजीचे ‘कमळ’
अहमदनगर : शहर जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीनंतर शहर भाजपामध्ये स्थापना दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा गटबाजीचे प्रदर्शन झाले. शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांनी पक्ष प्रवक्ते माधव भंडारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेतला. त्याकडे गांधी विरोधकांनी पाठ फिरवली. गांधी यांच्या कार्यक्रमात पालकमंत्री राम शिंदे यांचे छायाचित्र टाळल्यामुळे पक्षातील गटबाजी कार्यकर्त्यांची तोंडी चांगलीच रंगली़
भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन बुधवारी शहरात साजरा करण्यात आला. यानिमित्त शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांनी टिळक रोडवरील एका मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला. या कार्यक्रमासाठी पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी, भाजपा शहराचे प्रथम अध्यक्ष गुलशन जग्गी यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमात माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनाही व्यासपाठीच्या खालीच बसविले होते. पक्ष प्रवक्ते यांची उपस्थिती असल्याने या कार्यक्रमास शहरातील नेत्यांची उपस्थिती आवश्यक होती. मात्र, या कार्यक्रमाकडे शहरातील मोठे नेते आणि कार्यकर्ते फिरकलेच नाहीत. या कार्यक्रमाला गांधी समर्थक, नवे पदाधिकारी, आघाड्यांचे प्रमुख आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सकाळी ११ वाजता फटाक्यांच्या आतषबाजीत भाजपा शहर कार्यालयात गांधी यांनी शहर जिल्हाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी गांधी म्हणाले, पक्षाकडे पदाची मागणी केली नव्हती. जी मागणी केली, ती दुसऱ्यांसाठी केली होती. कोअर समितीने शिफारस केल्यांनतर माझी घोषणा करण्यात आली़ (प्रतिनिधी)
सत्ता जाताच काँग्रेसकडून शिंगणापूरचा वाद
काँग्रेसची सत्ता गेली की शिंगणापुरचा वाद उभा राहतो. १९९९ मध्ये युतीचे सरकार आल्यानंतर शिंगणापुरला चोरी करायचे आंदोलन झाले आणि आता चौथऱ्यावरून आंदोलन पेटले आहे. शनिशिंगणापुरमध्ये स्त्री-पुरुषांना दर्शन मिळालेच पाहिजे. १९९९ पूर्वीची ४० वर्षे आणि गेल्या पंधरा वर्षात शिंगणापुरबाबत काँग्रेसला वाईट का वाटले नाही? असा सवाल करीत शनी चौथऱ्याच्या दर्शनाबाबत वाद उभा करण्याचा खोडसाळपणा काँग्रेसने केल्याची टीका भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केली.
ती बाई काँगे्रसची
चौथऱ्याबाबत अचानक जागी झालेली तृप्ती देसाई २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत खडकवासला मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवार होती. देसाई यांच्या नावावर समाजसुधारणेचे कोणते काम आहे. सत्ता गेली की काँग्रेसला वाद उभा करण्याचा खोेडसाळपणा सुचतो. सर्व मंदिरांचे गाभारे, दर्गा, पीर, गुरुद्वारा अशा ठिकाणी महिलांना समान अधिकार द्यावेत. यासाठी काँग्रेस का भांडत नाही, असे भंडारी यांनी स्पष्ट केले.
गांधी विरोधकांचे सावेडीत रक्तदान
खा़ दिलीप गांधी यांच्या विरोधकांनी सावेडीत स्वतंत्र रक्तदान शिबिर आयोजित करून गांधी यांच्या नेतृत्त्वालाच आव्हान दिले. भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, सुनील रामदासी, साहेबराव विधाते, महेश नामदे, बाबासाहेब सानप, बाबासाहेब वाकळे, अनंत देसाई, सुमित बटुळे, महेश तवले, हृषिकेश आगरकर, बापुसाहेब बाचकर आदी रक्तदान शिबिरास उपस्थित होते़