बळीराजा धास्तावला
By Admin | Updated: June 25, 2014 18:52 IST2014-06-24T23:45:49+5:302014-06-25T18:52:24+5:30
ज्ञानेश दुधाडे, अहमदनगर रोहिणी पाठोपाठ मृग कोरडा गेला. आता आर्द्रा नक्षत्रातही आशादायक चित्र नाही. जून महिना सरत आला, तरी पावसाचा पत्ता नाही.
बळीराजा धास्तावला
ज्ञानेश दुधाडे, अहमदनगर
रोहिणी पाठोपाठ मृग कोरडा गेला. आता आर्द्रा नक्षत्रातही आशादायक चित्र नाही. जून महिना सरत आला, तरी पावसाचा पत्ता नाही. सोसाट्याचा वारा आणि रात्रीच्या गारव्यामुळे पाऊस लांबल्याचे चित्र आहे. यामुळे बळीराजा धास्तावला असून बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांचे बियाणे, खते पडून आहे. यामुळे कृषी विभागासह सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले असून पाऊस कधी येणार याचीच चिंता सर्वत्र आहे.
रोहिणी आणि मृग नक्षत्र कोरडे गेल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. आता आर्द्रा नक्षत्र सुरू झाले असून तीन-चार दिवस तरी पाऊस होण्याची शक्यता दिसत नाही. राज्याच्या नकाशावर अवर्षण प्रवण जिल्हा म्हणून नगर जिल्ह्याची ओळख आहे. प्रमुख्याने रब्बी हंगामाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, अलीकडच्या काही वर्षात जिल्ह्यात खरिपाच्या क्षेत्रात वाढ झालेली आहे.
कपाशीसोबत जिल्ह्यात खरिपात पावसाळी कांदा, बाजरी, सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा कल अधिक आहे. ऊस कारखानदारीमुळे उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. साधारण मे महिन्याचा शेवटचा आठवडा ते सात जूनपर्यंत जिल्ह्यात दमदार पाऊस पडत असतो. त्याच पावसावर जिल्ह्यात खरिपासाठी पेरण्या होत असतात. पण काही वर्षापासून हे चित्र बदलत आहे. यामुळे पीक पध्दतीवर त्याचा परिणाम होऊन जिल्ह्यातील कडधान्य पिकांचे क्षेत्रही घटतांना दिसत आहे.
पावसाअभावी जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचे बियाणे पडून असून शेतकऱ्यांसोबतच व्यापारी हवालदिल झालेला आहे. गेल्या दोन वर्षापासून पावसाअभावी कपाशी बियाण्याचे दरवर्षी नुकसान होत आहे. पहिल्या वर्षीचे कपाशीचे बियाणे दुसऱ्या वर्षी वापरण्यासंदर्भात मतभिन्नता असल्याने शेतकरी पाऊस पडल्याशिवाय त्याची खरेदी करणार नसल्याचे बोलले जात आहे. मात्र, पुढील आठवड्यात पाऊस झाल्यास बाजारात एकदम खरेदीसाठी झुुंबड उडाल्यास यातून काळाबाजार होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात कृषी विभागाने खरिपासाठी ४ लाख ८२ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते. यात कडधान्यासाठी ४२ हजार हेक्टर क्षेत्र होते. साधारण २० ते ३० जूनपर्यंत कडधान्य पेरणीचा कालावधी आहे.
अद्याप पाऊस न झाल्याने जिल्ह्यात जवळजवळ कडधान्याची पेरणी अशक्य असल्याचे बोलले जात आहे. केवळ तूर पिकाची १५ जुलै पर्यंत पेरणी करता येणार आहे.
कडधान्या ऐवजी अन्य पीक जसे बाजरी, तूर, सूर्यफूल आणि सोयाबीनचे क्षेत्र पाऊस लांबल्यामुळे वाढणार आहे.
पाच लाख जनतेला टँकरने पाणी
लांबलेल्या पावसाचा फटका शेतकऱ्यांसोबत जिल्ह्यातील ग्रामीण जनतेला बसला आहे. २८२ टँकरद्वारे जिल्ह्यातील तब्बल ५ लाख जनतेला सरकारी पाण्याच्या टँकरव्दारे पाण्याचा पुरवठा होत असून त्यातून सरकारचे कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत.
सर्वाधिक पाण्याचे टँकर पाथर्डी तालुक्यात ७० ठिकाणी सुरू आहेत. या ठिकाणी १ लाखाहून अधिक जनतेची तहान भागविण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर आहे. संगमनेर तालुक्यात ३८ टँकरने ७० हजार जनतेला पाणी सुरू आहे. जिल्ह्यात सध्या २२४ गावे आणि १ हजार २२ वाड्यावर पाणी टंचाई आहे. पाऊस लांबल्यास या गावांची संख्या वाढणार आहे.
टँकर आणि कंसात लोकसंख्या
संगमनेर ३८ (७०४६७), अकोले १३ (२१२५१), कोपरगाव ९ (१५३१५), नेवासा ४ (९४०८), राहाता ९ (१४६४६) नगर ३४ (६२२९८), पारनेर २८ (६३९१९), पाथर्डी ७० (१०३९४८), शेवगाव २४ (४१४७४), कर्जत ३० (५७९५६), जामखेड १९ (३६६६५), श्रीगोंदा ४ (७४६५)
पेरणीचा
खर्च वाढला
वाढती महागाई आणि पेट्रोल, डिझेलच्या वाढलेल्या किमतीचा परिणाम शेतकऱ्यांच्या पीक पेरणीवरही झालेला आहे. कोणत्याही पिकांच्या पेरणीसाठी पाच ते सात हजार रुपये खर्च येत असल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. त्यातच कांदा बियाण्याने तर शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणीच आणले असून प्रती किलोचे दर हे दीड ते साडे तीन हजार रुपयांपर्यंत वाढले आहेत. या शिवाय बियाणांची शाश्वती कोण घेणार हाही प्रश्न आहे.
पूर्वी बैलाच्या साहाय्याने शेती व्यवसाय चालत होता. आता मात्र, बैलांच्या जीवावर शेती हा प्रकार नावाला राहिलेला आहे. यांत्रिकीकरणाच्या युगात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च प्रचंड वाढलेला आहे. जिल्ह्यात विविध भागात घेतलेल्या माहितीनुसार सोयाबीन आणि बाजरीच्या प्रत्येकी एकरी पेरणीसाठी बियाणांसह साधारण चार हजार रुपये, कपाशीसाठी मात्र पाच ते सात हजार रुपये खर्च येत आहे.
या पेरणीसाठी रासायनिक खतांची आवश्यकता असून ऐनवेळी खतांची टंचाई निर्माण झाल्यास चढत्या दराने खते विकत घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत असते. यामुळे कृषी विभागाला यासाठी दक्ष राहावे लागणार आहे.
कांदा बियाणांचे दर
गगनाला भिडले आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे
१० ते १५ हजार रुपये पायलीने कांदा बियाण्याची विक्री सुरू आहे. जिल्ह्यात कांद्याचे क्षेत्र २५ हजार हेक्टर असून ८५० क्विंटल
बियाणांची आवश्यकता आहे.
जिल्ह्यात उपलब्ध बियाणे
कृषी विभागाच्या आकडेवारी नुसार जिल्ह्यात २६ हजार ८५० क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. यात भात २ हजार ८६ क्विंटल, ज्वारी ३३ क्विंटल, बाजरी ४ हजार ८८२ क्विंटल, मका ५ हजार २५६ क्विंटल, तूर १४८ क्विंटल, मूग १८२ क्विंटल, उडीद १ हजार ९९२ क्विंटल, सूर्यफूल ९ हजार ७४७ क्विंटल यांचा समावेश आहे. सोयाबीनचे ३२ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.
कपाशी बियाणांची ५ लाख ६० पाकिटे जिल्ह्यासाठी आलेली आहेत. यात २ लाख ८२ हजार कनकची असून ३२ हजार अजित १५५ ची आहेत. कपाशी बियाणे कमी पडणार नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
जिल्ह्यासाठी ६७ हजार क्विंटल रासायनिक खतांचा पुरवठा झालेला आहे. यात युरिया, संयुक्त खते यांचा समावेश आहे. जिल्ह्यात पाऊस झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत खतांचा काळाबाजार होऊ देणार नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
पाऊस ...
फक्त सहा टक्के!
नगरसह राज्यात मान्सून दाखल झाला आहे. मात्र, मान्सूनच्या पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यात आतापर्यंत अवघ्या ५.८१ टक्के पावसाची नोंद झालेली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत जिल्ह्यात २१ टक्के पाऊस झाला होता. यामुळे खरिपाच्या पेरण्यांना वेग आला होता.
जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या अकोले तालुक्यात पावसाने अद्याप दमदार हजेरी लावलेली नाही. यामुळे उत्तर जिल्ह्यासाठी वरदान असणाऱ्या आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा असणाऱ्या मुळा आणि भंडारदरा धरणांनी तळ गाठला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे तोंडचे पाणीच पळाले आहे.
जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीत जिल्ह्यात सरासरी २९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून यात सर्वाधिक ९१ मि.मी. पाथर्डी त्याखालोखाल नगर ७८ मि.मी., ७७.४ मि.मी. जामखेड, ३९ मि.मी. शेवगाव, ३३ मि.मी. श्रीगोंदा, २१ मि.मी. कर्जत, राहाता १८ मि.मी. , श्रीरामपूर १२ मि.मी. आहे. उर्वरित अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहुरी आणि नेवासा तालुक्यात १० मि.मी. च्या आता पावसाची आकडेवारी
आहे.
गत वर्षी याच कालावधीत दमदार पावसासह मुळा आणि भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली होती. यंदा चित्र भयावह आहे. जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
बागांसह उभी पिके करपली
एकीकडे पावसाअभावी खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या आहेत. तर दुसरीकडे उभी पिके करपू लागली आहे. यात चारा पिके, ऊस आणि फळबागांचा समावेश आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना या पिकांसाठी पाणी जपून वापरण्याचा सल्ला दिला आहे.
पाऊस लांबल्याचा फटका सर्व स्तरातील जनतेला बसत आहे. पेरण्या खोळंबल्या, त्याच सोबत फळबागा आणि ऊस पिकांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी घटल्याने ऐन उन्हाळ्यात प्रयत्न करून वाचविलेली ही पिके शेतकऱ्यांच्या डोळ्या देखत करपतांना दिसत आहेत. यामुळे लवकरात लवकर पाऊस पडावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात डाळींब, संत्रे, चिकू, लिंबू या फळांच्या फळबागा असून शिर्डी राहाता परिसरात पेरूच्या बागा आहेत. पाण्याअभावी त्यांचे नुकसान होत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन पध्दतीने त्यांना पाणी द्यावे असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
तसेच मुलस्थानी जलसंधारणाचा वापर करावा. जेणे करून पावसाचे नवीन पाणी शेतातील शेतजमिनीत जिरवता येईल. तसेच गादी वाफे तयार करून त्यावर पेरणी करण्याचा सल्लाही देण्यात आलेला आहे.