जामिनासाठी कोतकरांचे उच्च न्यायालयात अपिल
By Admin | Updated: July 11, 2016 23:54 IST2016-07-11T23:33:29+5:302016-07-11T23:54:21+5:30
अहमदनगर : शेवगाव येथील अशोक लांडे खून प्रकरणातील आरोपी भानुदास कोतकर, संदीप कोतकर, अमोल कोतकर व सचिन कोतकर यांनी नाशिक जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपिल दाखल केले

जामिनासाठी कोतकरांचे उच्च न्यायालयात अपिल
अहमदनगर : शेवगाव येथील अशोक लांडे खून प्रकरणातील आरोपी भानुदास कोतकर, संदीप कोतकर, अमोल कोतकर व सचिन कोतकर यांनी नाशिक जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपिल दाखल केले आहे. या अपिलावर १५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
कोतकर यांनी दाखल केलेल्या अपिलाविरोधात या खटल्यातील मुख्य फिर्यादी शंकर राऊत यांनी उच्च न्यायालयात हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे. चारही आरोपींविरोधात स्वतंत्र अर्ज दाखल करत त्यांचा गुन्हेगारी घटनांशी असलेला संबंध अधोरेखित केला केला आहे़ उच्च न्यायालयात न्यायमूर्ती अभय ओक व न्यायमूर्ती सय्यद यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे़ अशोक लांडे खून खटल्यात भानुदास कोतकरसह त्याचे तीन मुले संदीप, अमोल व सचिन या चौघांना नाशिक जिल्हा न्यायालयाने ११ मे २०१६ रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे़ या निकालाविरोधात आता कोतकर पिता-पुत्रांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे़ या प्रकरणातील मुख्य फिर्यादी शंकर राऊत यांनी मात्र, उच्च न्यायालयात दाखल केलेल्या वेगवेगळ्या चार अर्जात आरोपींचा कोणत्या गुन्हेगारी घटनांशी सबंध राहिला आहे, हे विषद केले आहे. आरोपींना जामीन दिल्यास फिर्यादी व साक्षीदारांना त्रास होऊ शकतो, असे नमूद केले आहे़