दिवसातून ५ ते ६ तास व्यवसायाची परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:21 IST2021-04-09T04:21:25+5:302021-04-09T04:21:25+5:30
दहिगावने : जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसापूर्वी कोरोनाच्या अनुषंगाने ३० एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण जिल्हा लॉकडाऊन केला आहे. हा निर्णय ...

दिवसातून ५ ते ६ तास व्यवसायाची परवानगी द्या
दहिगावने : जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसापूर्वी कोरोनाच्या अनुषंगाने ३० एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण जिल्हा लॉकडाऊन केला आहे. हा निर्णय मध्यमवर्गीय,गरीब जनतेच्या दृष्टीने अन्यायकारक आहे. यामुळे हातावर पोट भरणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. म्हणून हातावर पोट भरणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना वेळेचे बंधन घालून दिवसातून ५ ते ६ तास व्यवसाय करण्याची परवानगी द्या, अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल, अशा आशयाचे निवेदन स्वाभिमानी मराठा महासंघाने शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांना दिले.
हा निर्णय घेताना गोरगरिबांच्या व मध्यम वर्गीयांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे. शासकीय नोकरदारांना पगार मिळतो. मोठ्या व्यापाऱ्यांकडे गडगंज संपत्ती आहे. मात्र फेरीवाले, हातगाड्यांवर खाद्यपदार्थ बनवून विकणारे, चहा, पान टपरीवाले, फिटर व्यवसायिक, गॅरेज आदी छोटे व्यावसायिक कुटुंबाचा उदरनिर्वाह व्यवसायातून चालवत होते. परंतु, या निर्णयामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या संपूर्ण परिणामास शासन म्हणून जिल्हाधिकारी हेच जबाबदार आहेत. म्हणून हातावर पोट भरणारे व छोट्या व्यापाऱ्यांना वेळेचे बंधन घालून दिवसातून कमीत कमी ५ ते ६ तास व्यवसाय चालू ठेवण्यास परवानगी द्यावी. अन्यथा आम्हाला गोरगरिबांच्या व मध्यमवर्गीय लोकांच्या पोटापाण्याच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा निवेदनात दिला आहे.
निवेदनावर स्वाभिमानी मराठा महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष किशोर लोढे, जिल्हा संपर्क प्रमुख सतीश पवार, अनिल सुपेकर, अमोल काटे आदींच्या सह्या आहेत.
--
०८ शेवगाव निवेदन
छोट्या व्यावसायिकांना वेळेचे बंधन घालून व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी, अशा आशयाचे निवेदन स्वाभिमानी मराठा महासंघाने शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांना दिले.