बीआरएसमध्ये प्रवेश देऊ मात्र शिस्त पाळावी लागेल - खासदार बी. बी. पाटील
By शिवाजी पवार | Updated: July 16, 2023 17:55 IST2023-07-16T17:54:47+5:302023-07-16T17:55:19+5:30
बीआरएसचा श्रीरामपुरात शिरकाव झाल्यानंतर कार्यकर्ता मेळाव्यासाठी आले असता पत्रकार परिषदेत खासदार पाटील बोलत होते.

बीआरएसमध्ये प्रवेश देऊ मात्र शिस्त पाळावी लागेल - खासदार बी. बी. पाटील
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : भाजपमध्ये इतर पक्षातील अनेक नेत्यांनी प्रवेश केल्याने त्यांचा काँग्रेस राष्ट्रवादी झाल्याचा आरोप होत आहे. मात्र भारत राष्ट्र समितीमध्ये आपण तसे होऊ देणार नाही. बीआरएसमध्ये अनेकजण येण्यास उत्सुक असले तरी त्यांना पक्षाचे ध्येय धोरण, नियम व आचारसंहिता पाळावी लागेल असे तेलंगणाचे खासदार बी. बी. पाटील यांनी सांगितले.
बीआरएसचा श्रीरामपुरात शिरकाव झाल्यानंतर कार्यकर्ता मेळाव्यासाठी आले असता पत्रकार परिषदेत खासदार पाटील बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माणिकराव कदम, समन्वयक बी. जे देशमुख, सुवर्णा काटे, बाळासाहेब सानप, अशोक बागुल आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थितीत होते.
पाटील म्हणाले, सध्या महाराष्ट्रात राजकीय परिस्थिती अत्यंत वाईट आहे. येथील शेतकरी, कष्टकरी जनतेची अत्यंत वाईट अवस्था आहे. राज्यात अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत. याउलट तेलंगणा राज्यात उलटी परिस्थिती आहे. २०१४ मध्ये निर्माण झालेल्या तेलंगणाची परिस्थिती मराठवाडा विदर्भासारखी वाईट होती. मात्र तेथील सरकारने सुयोग्य नियोजन करून शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. कृषी पंपाना २४ तास मोफत वीज पुरवठा केला. ८३ हजार कोटी रुपये खर्चाची जगातील सर्वात मोठी पाणी लिफ्ट योजना तयार केली. त्यामुळे ३७ लाख एकर शेती पाण्याखाली आली. प्रत्येक गावात पिण्यासाठी शुद्ध पाणी पोहचवले. शिक्षणात प्रगती करीत हजारो शासकीय शाळा उभ्या केल्या. सरकार एका विद्यार्थ्यामागे सुमारे सव्वा लाख रुपये खर्च करते. अशा एक ना अनेक योजना यशस्वी करून गुजरातपेक्षाही चार पाऊल पुढचा तेलंगणा पॅटर्न निर्माण केला. तीन चार वर्षात महाराष्ट्र तेलंगणा सारखा सुजलाम सुफलाम करून दाखवू, असेही सांगितले.