कांदा बियाणांची पाच कोटींची उलाढाल ठप्प
By Admin | Updated: June 14, 2014 01:19 IST2014-06-13T23:28:37+5:302014-06-14T01:19:29+5:30
पारनेर : गारपिटीमुळे केवळ त्यावेळच्या पिकांचेच नुकसान झाले असे वाटत असले तरी पारनेर तालुक्यातील गारपिटीने शेतकऱ्यांचे निरनिराळ्या मार्गांनी नुकसान झाल्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत.
कांदा बियाणांची पाच कोटींची उलाढाल ठप्प
पारनेर : गारपिटीमुळे केवळ त्यावेळच्या पिकांचेच नुकसान झाले असे वाटत असले तरी पारनेर तालुक्यातील गारपिटीने शेतकऱ्यांचे निरनिराळ्या मार्गांनी नुकसान झाल्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत.
गारपिटीमुळे शेतकरीच तयार करीत असलेल्या कांदा बियाणांना फटका बसल्याने खरिपात केवळ कांदा बियाणांवर होणारी सुमारे पाच कोटी रूपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. शेतकरीच कांदा बियाणे करीत असल्याने त्यांच्या अर्थकारणाला खीळ बसलीच शिवाय सध्या खरीप कांदा लागवडीसाठी बियाणांचा तुटवडा जाणवत असून वाढत्या भावाने बियाणांची विक्री होत आहे.
पारनेर तालुक्याला गेल्या दोन ते तीन महिन्यात तीन ते चार वेळा गारपिटीने झोडपले. जवळा, निघोज, पारनेर, अळकुटी, देवीभोयरे, पाडळी आळेसह कान्हूरपठार, दुर्गम भाग असलेल्या काटाळवेढा, पळसपूर, पोखरी, म्हसोबा झाप यासह तालुक्यातील अनेक भागांना याचा फटका बसला.
पहिल्या टप्प्यात फक्त शेतातील कांदा व फळबागांचे नुकसान झाल्याचे म्हणत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली. परंतु गारपिटीचे दुष्परिणाम आता खरीप हंगामात दिसू लागले आहेत. याचा सर्वाधिक फटका कांदा पिकाला बसला आहे.
(तालुका प्रतिनिधी)
नगरला बियाणे उपलब्ध
पारनेर तालुक्यात गारपिटीचा कांदा बियाणाला फटका बसला आहे हे वास्तव आहे. पारनेर तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांनी अजून बियाणे विक्रीला आणले नाहीत. त्यामुळे तुटवडा निर्माण झाला असेल. परंतु नगरहून शेतकऱ्यांनी पाचशे रूपये किलोने बियाणे आणले आहे. तालुक्यात बियाणांचा काळाबाजार होत असल्याच्या लेखी तक्रारी नाहीत. काळाबाजार झाल्यास भरारी पथकामार्फत कारवाई करू.
- दिलीप कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी, पारनेर
बियाणांचा तुटवडा
सध्या अजुन पावसाची हजेरी नाही. विहिरी व इतर ठिकाणी पाणी कमी झाल्याने शेतकऱ्यांनी कांदा लागवड सुरू करण्याचे धाडस अजून केले नाही. त्यामुळे तालुक्यातील अनेक कृषी सेवा केंद्रांनी कांदा बियाणे आणले नाही.जवळा, निघोज भागात मात्र सध्या पाण्याचे प्रमाण असल्याने त्यांनी बियाणे खरेदी सुरुवात केल्यावर त्यांना दोन हजार रूपये किलोने बियाणे विकत घेण्याची वेळ आल्याचे जवळा येथील शेतीतज्ज्ञ रामदास घावटे व करंदीचे माजी सरपंच नामदेव ठाणगे यांनी सांगितले.
ुपाच कोटींचा तोटा
तालुक्यात खरीप कांद्याचे क्षेत्र सुमारे दीड हजार ते सतराशे हेक्टरवर अंदाजित होते. यामध्ये एका हेक्टरला बारा किलो बियाणे लागते. शेतकरीच साठ ते सत्तर टक्के बियाणे घरीच करीत होते त्याचे प्रमाण घटले. तालुक्याला किमान अठरा टन कांदा बियाणे असेल तर मागणी पूर्ण होते. सध्या नगरला कंपन्यांचे बियाणे पाचशे ते सातशे रूपये किलो असा भाव ठरला तर शेतकऱ्यांच्याच घरात येणारे सुमारे तीन ते पाच कोटींचे अर्थकारण ठप्प होऊन शेतकऱ्यांना तोटा झाला आहे.