खर्ड्याच्या भुईकोट किल्ल्यात सापडले ३११ तोफगोळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:37 IST2021-02-06T04:37:44+5:302021-02-06T04:37:44+5:30
खर्डा (जि. अहमदनगर) : जामखेड तालुक्यातील खर्डा येथील भुईकोट किल्ल्याच्या दुरुस्ती, मजबुतीकरण, सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. यानिमित्त पुरातत्त्व विभागाच्या ...

खर्ड्याच्या भुईकोट किल्ल्यात सापडले ३११ तोफगोळे
खर्डा (जि. अहमदनगर) : जामखेड तालुक्यातील खर्डा येथील भुईकोट किल्ल्याच्या दुरुस्ती, मजबुतीकरण, सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. यानिमित्त पुरातत्त्व विभागाच्या वतीने किल्ल्यामध्ये उत्खनन सुरू असताना एका खड्ड्यामध्ये जवळपास ३११ दगडी तोफगोळे सापडले.
१७९५ साली येथे झालेल्या मराठा आणि निजाम यांच्या लढाईत येथील तोफगोळ्यांचा उपयोग झाला असण्याची शक्यता इतिहासतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. विशेषत: इसवी सन १७९५ निजाम आणि मराठे यांच्या युद्धामध्ये तत्कालीन तोफखान्याचा प्रमुख यांनी या तोफगोळ्यांचा वापर केला होता. या लढाईचे ऐतिहासिक पुरावे आजही किल्ला परिसरात सापडतात.
सध्या किल्ल्याच्या आतील परिसरात उत्खनन सुरू आहे. पडझड झालेली तटबंदी, किल्ल्याच्या बाहेरील भागातील खंदकाचे नव्याने बांधकाम सुरू आहे. त्याचबरोबर येथे उत्खनन करून किल्ल्याच्या पुरातन रचनेचा अभ्यास करून त्याचे पुनरुज्जीवन करण्याचा पुरातत्त्व विभागाचा मानस आहे. या उत्खननात इथे तत्कालीन दगडी तोफांचे अवशेष, धान्याची कोठारे, दारूगोळ्याची कोठारे, काही चोरवाटा, भुयारी वाटा नव्याने सापडल्या आहेत. तरी या उत्खननामधून या चोरवाटा मोकळ्या व्हाव्यात तसेच किल्ल्याला मूळ स्वरूप प्राप्त होऊन तेथील पुरातन रचना नागरिकांपर्यंत याव्यात, यासाठी हे उत्खनन महत्त्वाचे ठरत आहे. अहमदनगर वस्तुसंग्रहालयात खर्डा येथील मराठा-निजाम लढाईत वापरलेली तोफ आजही संग्रहित आहे.
----
ऐतिहासिक खर्डा शहरात आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून गावातील निंबाळकर गढीवर लवकरच ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी अशा ऐतिहासिक तोफगोळ्यासारख्या ठेव्यांचे संवर्धन होईल. किल्ल्याचे सध्या सुरू असलेले काम गौणखनिजाच्या पुरवठ्याअभावी बंद आहे. याबाबत तहसीलदार यांच्याकडे सकारात्मक मार्ग काढण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
-विजयसिंह गोलेकर, अध्यक्ष, तीर्थक्षेत्र व पर्यटन विकास कृती समिती
-----------
निजाम-मराठे लढाईत मराठ्यांनी या लढाईत तोफांचा वापर केला. या लढाईत निजामाच्या सैन्यावर दोन बाजूंनी तोफांचा मारा करण्यात आला होता. त्यामुळे निजाम सैन्याची फळी दोन भागांत विभागली गेली होती. याचा फायदा मराठा सैन्यास पुरेपूर झाला. लढ्यातील पराभवानंतर निजामाने खर्डा किल्ल्यात आश्रय घेतला होता. त्यानंतर मराठा सैन्याने खर्डा किल्ल्यावर तोफा डागल्या. त्यामुळे निजामाने संपूर्ण शरणागती पत्करली होती.
-प्रा. धनंजय जवळेकर, इतिहास संशोधक
..........
फोटो दोन ०५ खर्डा तोफगोळे
खर्डा येथील भुईकोट किल्ल्यात सापडलेले भुईकोट किल्ले. दुसऱ्या छायाचित्रात तोफगोळे सापडलेली जागा.