प्रतिकूल परिस्थितीतही भगवंताची भक्ती न सुटणे हीच खरी श्रद्धा
By appasaheb.patil | Published: February 15, 2019 02:23 PM2019-02-15T14:23:20+5:302019-02-15T14:27:29+5:30
सोलापूर : भगवंताची भक्ती स्वत:च्या सुखासाठी, स्वार्थासाठी न करता भगवंतासाठीच करावी. प्रतिकूल परिस्थितीतही भगवंताची भक्ती न सुटणे हीच खरी ...
सोलापूर : भगवंताची भक्ती स्वत:च्या सुखासाठी, स्वार्थासाठी न करता भगवंतासाठीच करावी. प्रतिकूल परिस्थितीतही भगवंताची भक्ती न सुटणे हीच खरी श्रद्धा होय, असे प्रतिपादन आचार्य किशोरजी व्यास यांनी केले.
पर्ल गार्डन येथे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ समितीतर्फे आयोजित केलेल्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञामध्ये बोलत असताना आचार्य किशोरजी व्यास यांनी वरील प्रतिपादन केले़ यात त्यांनी सती चरित्र, ध्रुवाख्यान, भरत चरित्र, अजमिलोद्वार आणि नृसिंह अवतार विस्ताराने सांगितला.
आचार्य किशोरजी व्यास म्हणाले, न मागता तहानलेल्याला पाणी, भुकेल्याला अन्न किंवा रुग्णाची सुश्रुषा करावी, परंतु न मागता आत्मज्ञान कोणालाही देऊ नये, अशी शिकवण भागवतात आहे. जगातील प्रत्येक जण सुखाच्या शोधात आहे. काहींना मानसन्मान, संपत्ती, जमीनजुमला नको असेल परंतु त्यांना त्यांच्या व्याख्येत बसणारे सुख नक्की हवे असते. आनंदाचा मूळ स्रोत आपल्या अंतरंगात असतो. जसा प्रकाशाशिवाय सूर्य असत नाही. तसा आनंदाशिवाय माणूस असत नाही. परमात्म्याच्या प्राप्तीसाठी भगवंताची भक्ती हाच सर्वोत्तम मार्ग आहे. जग कसेही वागले तरीहीप्रतिकार करण्याची क्षमता असूनही ते विसरून शांत राहता येणे हे संतांचे वैशिष्ट्य असते. समाजातील अनेकांकडून यातना सोसाव्या लागूनही संत ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वकल्याणाची प्रार्थना केली, असेही आचार्य किशोरजी व्यास यांनी सांगितले.
कलियुगातही वेदांचे रक्षण व्हावे असे विचार महर्षी वेदव्यास यांनी केला. कलियुगात धारणाशक्ती कमी होण्याची शक्यता गृहीत धरून त्यांनी मार्गदर्शन केले. प्रगतीच्या गप्पा आपण मारतो. परंतु समाजाची अधोगतीच अधिक होत आहे. खाण्यापेक्षा औषधांचा खर्च अधिक होण्याला आपण प्रगती संबोधत आहोत.