Mahashivratri : महाशिवरात्रीनिमित्त जाणून घ्या 12 ज्योतिर्लिंगांची माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 10:49 AM2019-03-04T10:49:31+5:302019-03-04T11:09:52+5:30

जगभरातील समस्त  शिव भक्तांसाठी महत्त्वाचा दिवस म्हणजे महाशिवरात्री. त्यामुळे या दिवशी करायची व्रत-वैकल्ये, पूजा आणि मुहूर्त याबाबत लोकांच्या मनात प्रचंड उत्सुकता असते.

Mahashivratri: Know about 12 Information Jyotirlingas | Mahashivratri : महाशिवरात्रीनिमित्त जाणून घ्या 12 ज्योतिर्लिंगांची माहिती...

Mahashivratri : महाशिवरात्रीनिमित्त जाणून घ्या 12 ज्योतिर्लिंगांची माहिती...

googlenewsNext

जगभरातील समस्त  शिव भक्तांसाठी महत्त्वाचा दिवस म्हणजे महाशिवरात्री. त्यामुळे या दिवशी करायची व्रत-वैकल्ये, पूजा आणि मुहूर्त याबाबत लोकांच्या मनात प्रचंड उत्सुकता असते. महादेवांच्या भारतातील प्रमुख 12 मंदिरांना 12 ज्योतिर्लिंगे म्हणतात. या 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात 5 ज्योतिर्लिंगे आहेत. 

धर्मशास्त्राने या ज्योतिर्लिंगांच्या यात्रेचा क्रम सांगितला आहे, तो असा : 

सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम्। उज्जयिन्यां महाकालमोङ्कारममलेश्वरम् ॥१॥
परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशंकरम्। सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥२॥
वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे। हिमालये तु केदारं घृष्णेशं च शिवालये ॥३॥
एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः। सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति ॥४॥  

1.  सोमनाथ  (गुजराथ - वेरावळ)-

गुजरातमध्ये सौराष्ट्रात वसलेलेसोरटी सोमनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. देशातील प्राचीनतीर्थस्थळांत सोमनाथ मंदिराचा समावेश होतो. हे मंदिर गर्भगृह, सभामंडप आणि नृत्यमंडप या तीन प्रमुख भागांमध्ये आहे.याच्या शिखरावरील कलशाचे वजन दहा टन आहे. ध्वजाची उंची 27 फूट आहे.पुराणात या मंदिराच्या अनुषंगाने एककथा आहे. चंद्राचे सोम असे नाव होते. तो दक्षाचा जावई होता. एकदा त्यांनी दक्षाची अवहेलना केली. त्यामुळे राग येऊन दक्षाने त्यांचा प्रकाश दिवसादिवसाने कमी होत जाईल. असा शाप दिला. अन्य देवतांनी दक्षाला उःशाप देण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी. सरस्वती नदी समुद्राला जिथे मिळते, तेथे स्नान केल्यास या शापाचा परिणाम रहाणार नाही, असे सांगितले. त्यानंतर सोमाने सौराष्ट्रातील या ठिकाणी येऊन येथे स्नान केले आणि भगवान शिवाची आराधना केली. शंकर येथे प्रकट झाले आणि त्यांनी त्याचा उद्धार केला. क्षय नाहींसा होण्याकरितां सोमानें लिंग स्थापून पूजा केलीम्हणून ते सोमनाथ या नावाने प्रसिद्ध झाले .

2. मल्लिकार्जुन(आंध्रप्रदेश - श्रीशैल्य)–  

गुंटकल बेसवाडा - या छोट्या लाइनवर नंद्याळ स्टेशन आहे. तेथून 28 मैलांवर असलेल्या आत्माकुमार गांवाला मोटारीने जावें लागतें. आत्माकुरहून मल्लिकार्जुन 43 मलै श्रीशैल्यपर्वतावर आहे. रागावून गेलेल्या कुमार कार्तिकेयाला भेटण्याक‍रीतां (मल्लिका) पार्वती व अर्जुन (शंकर) येथें आले म्हणून मल्लिकार्जुन या नावाने प्रसिद्ध झाले. मल्लिकार्जुनाच्या पलीकडे पांच मैलांवर पाताळगंगा (कृष्णा) आहे.

3. महाकाळेश्वर  (मध्यप्रदेश - उज्जैन)-

हे मंदिर मध्य प्रदेशच्या उज्जैन जिल्ह्यामध्ये आहे. हे ज्योतिर्लिंग व स्वयंभू असून रुद्रसागर तलावाच्या काठावर उज्जैन शहरात आहे.हे शहर क्षिप्रा नदीच्या किनारी वसले आहे. या शहराला ऐतिहासिक वारसा असून पूर्वी विक्रमादित्य राज्याची राजधानी येथे होती.दर बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभ मेळ्यातजगभरातून भाविक येथे जमा होतात.श्री महांकालेश्वर ज्योतिर्लिंगची प्रतिमा दक्षिणमुखी आहे. बारा ज्योतिर्लिंगात  दक्षिणमुखी पूजेचे महत्वामुळे फक्त महांकालेश्वर येथेच भस्म आरतीहोते. वर्षात केवळ एकदा महाशिवरात्रिच्या दुसर्या दिवशी भगवान श्री महांकालेश्वरांची दुपारी बारा वाजता भस्म आरती होते .

4. ओंकारेश्वर (मध्यप्रदेश - ओंकारेश्वर) -

ॐकारेश्वर मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्यात आहे. हे नर्मदा नदीमध्ये शिवपुरी नामक बेटावर वसलेले असून मोरटक्का गाव पासून जवळपास २० कि.मी. अंतरावर आहे. हे द्वीप हिन्दू पवित्र चिन्ह ॐ च्या आकारामध्ये बनले आहे. येथे दोन मंदिरे आहेत,  ॐकारेश्वरआणि अमरेश्वर.

ॐकारेश्वर ची निर्मिती नर्मदा नदी पासून झाली आहे. ही नदी भारताची अत्यंत पवित्र नदी आहे. राजा मान्धाता ने येथे नर्मदा किनारी घोर तपस्या करून भगवान शिव ला प्रसन्न केले आणि त्यांच्याकडून येथेच निवास करण्याचे वरदान मागून घेतले.  येथे एकूण ६८ तीर्थ असून येथे ३३ कोटी देवता राहतात अशी कल्पना आहे. याशिवाय येथे २ ज्योतिस्वरूप लिंग यासहित १०८ प्रभावशाली शिवलिंग आहेत. शास्त्र मान्यता अशी आहे की कोणीही तीर्थयात्री देशाची भले ही सारे तीर्थ करून घेऊ दे परंतु जोपर्यंत तो ओंकारेश्वर येऊन केलेल्या तीर्थों चे जल आणून येथे नाही चढवत तोपर्यंत त्याचे सारे तीर्थ अधूरे मानले जातात.

5. परळी वैजनाथ (महाराष्ट्र - परळी)  -

भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी परळीच्या वैजनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत आहे. पुण्यश्लोक राणी आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायर्‍या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाहीपण फक्त वैजनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत.

6. भीमाशंकर  (महाराष्ट्र - भीमाशंकर)-  

भीमानदीच्या उगमस्थानी असलेले बारा ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर आहे. मंदिराबाबत असे म्हणतात की, १८ व्या शतकात नाना फडणीसानी हे मंदिर बांधलेले आहे. मंदिर हेमाडपंती आहे. मंदिरावर उत्कृष्ट कलाकुसरीचे नमुने पाहवयास मिळतात. `भीमा' नदीचा उगम आणि श्री महादेवाचे - शंकराचे स्थान, म्हणून याला `भीमा-शंकर' असे म्हणतात.भीमाशंकर हे एक थंड हवेचे ठिकाण असून मंदिराच्या आजुबाजुचा परिसर - डोंगरदर्‍यांनी युक्त, दाट जंगलांचा असा - निसर्गरम्य आहे. हे जंगल अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. 

7. रामेश्वर (तामिळनाडु - रामेश्वर)–

 हे भारताच्या तमिळनाडू राज्यातील रामेश्वरम बेटावरील एक शिवमंदिर आहे. प्रभू रामचंद्रांनि रावणाविरुद्ध झुंजलेल्या युद्धातील पापांचे क्षालन करण्यासाठी या ठिकाणी वाळूचे शिवलिंग बनवून भगवान शंकराची आराधना केली. त्यांच्यावर प्रसन्न होऊन भगवान शंकराने त्या ठिकाणी ज्योतिर्लिंगाच्या रूपात निवास करण्याचे वचन भगवान रामचंद्रांना दिले. हे तीर्थक्षेत्र बारा ज्योतिर्लिंगांपैकी व चार धामांपैकी एक मानले जाते. विशाल नंदी व १००० फुट लांब , ६५० फुट रुंद आणि १२५ फुट उंच असे रामेश्वर चे मंदिर आहे. वार्षिक उत्सवाच्या वेळेस भगवान शंकर व पार्वती ची सोन्या चांदीच्या रथातून भव्य मिरवणूक काढली जाते.

8.नागेश्वर (महाराष्ट्र - औंढा नागनाथ) -

पांडवांच्या १४ वर्षाच्या अज्ञातवासात धर्मराज युधिष्ठीर याने औंढा नागनाथाचे मंदिर बांधल्याचे, त्याने महादेवाची स्थापना केल्याचे म्हटले जाते. हेमाडपंती शैलीचे हे नागनाथाचे मंदिर असून याचा विस्तार ६०,००० चौ. फूट एवढा प्रचंड आहे. महादेवाच्या पिंडीसमोर नंदीची मूर्ती नाही, तर नंदिकेश्वराचे स्वतंत्र मंदिर बाजूला आहे हे येथील वैशिष्ट्य आहे. मंदिराच्या आवारात १२ ज्योतिर्लिंगाची छोटी-छोटी मंदिरे असून, १०८ महादेवाची मंदिरे आणि आणखी ६८ महादेवाच्या पिंडी आहेत. याशिवाय वेदव्यासलिंग, भंडारेश्वर, नीलकंठेश्वर, गणपती, दत्तात्रय, मुरलीमनोहर, दशावतार यांची देखील मंदिरे आहेत.

मंदिरावर शिल्पकलेचे उत्कृष्ट काम केलेले आहे. परिसरात मोठे मैदान असून आठ खांबांचे मोठे दालन आहे. संत विठोबा खेचर हे इथलेच. संत नामदेव हे जवळच असलेल्या नरसीचे होते. असे समजले जाते, की, संत नामदेव जेव्हा कीर्तन करीत होते, त्या वेळी नागनाथ मंदिराने आपले तोंड त्या दिशेला फिरवले होते. 

औंढा नागनाथच्या शेजारील राजापूर गावातील उत्खननात प्राचीन काळच्या सुंदर व रेखीव अशा मूर्ती सापडल्या आहेत. सिद्धेश्र्वर व येलदरी ही प्रसिद्ध धरणे व पर्यटनाची ठिकाणे येथून जवळच आहेत. औंढा-नागनाथला जाण्यासाठी परभणीहून ४०-४५ मिनिटे लागतात. नांदेड या शहरापासून ६४ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे. सध्याच्या हिंगोली जिल्ह्यात, औंढा नागनाथ हे स्थान आहे.

9. विश्वेश्वर (उत्तर प्रदेश - वाराणसी)–

विश्वेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.शंकराचे हे रूप काशीत पूजले जाते.पूर्वी वाराणसीत काशी विश्वनाथ मंदिर होते. वाराणसी भारताची सांस्कृतिक राजधानी असून ते भारताची पवित्र नदी गंगाच्या किनार्यावर वसलेले आहे. शहराच्या मध्यावर विश्वीनाथ मंदिर असून तेथे भगवान शिव, विश्वेतश्वगर किंवा विश्वेनाथ ज्याकतिर्लिंग स्थापलेले आहे. श्री विश्वेश्वर ज्योतिर्लिंग हे कोणाच्या तपस्येने तयार झाले नसून येथे साक्षात भगवान शिव हेच विश्वनाथ च्या रूपात प्रकट झाले. असे म्हणतात कि येथे मृत्यू येणार्या प्रत्येकास मोक्ष प्राप्ती होते.  

10. त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र - त्र्यंबकेश्वर)–  

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग हे भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहे. या ज्योतिर्लिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगास ब्रम्हा, विष्णू, महेश या तिघांच्या प्रतिमा आहेत.त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी या पर्वताच्या पायथ्याशी वसले आहे. हा पर्वत म्हणजे शिवाचे एक रूप मानले जाते.याच पर्वतावर पवित्र गोदावरी नदी उगम पावते. या मंदिराचे बांधकाम इ. स. १७५५ साली पेशवे बाळाजी बाजीरावांनी केल्याचा उल्लेख आढळतो. दर १२ वर्षांनी नाशिकबरोबर त्र्यंबकेश्वरलाही कुंभमेळा भरतो. नाशिकपासून फक्त २८ कि. मी. अंतरावर त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र आहे.

11.केदारनाथ (उत्तरांचल - केदारनाथ) -

हे हिमालयात उत्तराखंडच्यारुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये मंदाकिनी नदीच्या किनारी आहे. पुराणाप्रमाणे भगवान विष्णू जगाच्या कल्याणाकरिता पृथ्वीवर निवास करण्यासाठी आले.त्यांनी बद्रीनाथ मध्ये आपले पहिले पाउल ठेवले.हे अगोदर भगवान शिवाचे स्थान होते. परंतु भगवान विष्णू साठी त्यांनी या स्थानाचा त्याग केला आणि केदारनाथ मध्ये वास्तव्य केले. या ठिकाणी शंकराचार्यांनी वयाच्या ३२ व्या वर्षी समाधी घेतली. केदारनाथ हे ज्योतिर्लिंगा बरोबरच चार धामा पैकी एक धाम आहे. प्रतिकूल हवामानामुळे हे मंदिर एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीतच दर्शनासाठी खुले असते.

12. घृष्णेश्वर (महाराष्ट्र -संभाजीनगर)-  

बारा ज्योतिर्लिंगांपैकी घृष्णेश्र्वराचे एक महत्त्वपूर्ण ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे. शिवशंकराच्या उपासकांसाठी पवित्रस्थान असलेल्या घृष्णेश्र्वर मंदिरात शिवभक्तांची खूप मोठी गर्दी होत असते. पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकरांनी इ.स. १७६५ ते १७९५ दरम्यान घृष्णेश्र्वराचे संपुर्ण मंदिर बांधून त्यावर नक्षीकाम करून घेतले. घृष्णेश्र्वराचे मंदिर संभाजीनगर जिल्ह्यात असून वेरूळपासून अगदी जवळ आहे. या मंदिरापासून जवळच श्रीगणेशाचे २१ आद्यपीठापैकी एक लक्षविनायक मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे यांच्या घराचे अवशेष (जुना वाडा) देखील मंदिराजवळ आहेत.

Web Title: Mahashivratri: Know about 12 Information Jyotirlingas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.