कृष्ण माझा सखा.......!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 02:53 PM2019-08-23T14:53:47+5:302019-08-23T14:53:52+5:30

भारतीय तत्वज्ञान हे महान विचारांची जननी आहे. त्यामध्ये कृष्णाची भगवद्गीता हा ग्रंथ तर मानवी जीवनाला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहे.

Krishna is my friend .......! | कृष्ण माझा सखा.......!

कृष्ण माझा सखा.......!

Next

अवघ्या भारत वर्षांमध्ये कृष्ण जन्म हा जन्माष्टमीच्या उत्सव म्हणून
मोठ्या आनंदात साजरा होतो. कृष्ण हा एक बालगोपाल म्हणून समजून
घेतला तर समजतो. राधेच्या कृष्ण समजायला आणखीच भक्तीची साधना
आवश्यक आहे तर, अर्जुनाचा सारथी असणारा पार्थसाठी समजून घेण्यासाठी
भगवद्गीता समजून घेणे गरजेचे आहे. कृष्णाय वसुदेवाय हरये परमातमने
नमः।।प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नम:भारतीय तत्वज्ञानानुसार कृष्णजीवन
हा एक अदभूत असा चमत्कार आहे. प्रत्येकाला असे वाटावे की, कृष्ण हे आपल्याच
जगण्याची कथा सांगत आहेत. मनुष्य जन्माची क्षणभंगुरता व मानवाला असलेली
विवंचना हे आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून पदोपदी दिगदर्शित करते. भारतीय
तत्वज्ञान हे महान विचारांची जननी आहे. त्यामध्ये कृष्णाची भगवद्गीता हा ग्रंथ
तर मानवी जीवनाला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहे. त्या ग्रंथाद्वारा आपण
जीवनातील पराक्रमाची अत्त्युच्च पातळी तर गाठू शकतो. सोबतच आपण
समाधानाने जीवन कसे जगावे याचा वस्तुपाठच आहे. भारतीय जीवनमार्गाचे
अनेक मार्ग आपल्याला दिसत असले तरी, त्यातील कृष्णविचार हा अतिशय
महत्वाचा सिद्धांत आहे. त्यातून जीवनाची अपारता, भव्यता व समतानता
आपल्याला अनुभवता येते. मनुष्यानाम सह्स्त्रेषू । या वचनानुसार प्रत्येक पुरूषाने
आपल्या प्रकृतीनुसार आपल्या जीवनधरणा निश्चित करून त्याप्रमाणे जीवनात
योगी होण्याच्या वाटेवर प्रवास करावा त्यामुळे प्रत्येकाला आपल्या जीवनात
कृष्णभावना जोपासण्याचा प्रयत्न करावा. ते आपल्याला जीवन कसे जगावे याचा
आदर्श वस्तुपाठ देतात.

अनन्याच्श्रिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते ।
तेषा नित्याभियुक्तांना योगक्षेम्य वहाम्यहम ।। गीता 9/22

जीवनामध्ये जे भक्त एकनिष्ठेने ईशचिंतन करतात. त्याचा योग व क्षेम
साक्षात परमेश्वर चालवतात. असे भगवान गीतेमध्ये सांगतात. जे भक्त
परमेश्वराच्या भावाला विकले गेलेले आहेत. आईच्या गर्भामध्ये असणारे मूल
कोणत्याही व्यवहाराला जाणू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे परमेश्वराशिवाय
ज्यांना काहीच चांगले वाटत नाही. ते केवळ परमेश्वरासाठीच जगतात. असे
एकनिष्ठपणे परमेश्वराचे चिंतन करतात, परमेश्वराची उपासना करतात. परमेश्वर
अशांची सेवा करीत असतो. ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात् त्याचे वर्णन करतात-

आणि मी वाचूनि काही । आणिक गोमटे नाही ।
ऐसा निश्चयोचि तिही । जयांचा केला ।।
जो अनन्य यापरी ।मी जाहलाही माते वरी ।
तेची तो मूर्तधारी । ज्ञान पै गा। ज्ञाने. 13/603

परमेश्वराचा अनन्यभक्त परमेश्वराकरीताच शरीराने कर्म करतो. त्याला
परमेश्वरावाचून जगात दुसरे काहीच चांगले नसते. संत ज्ञानेश्वर अनन्यभक्ताचे
वर्णन ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायात सांगतात. अशा प्रकारे परमेश्वरावर
अनन्यभक्तांची श्रद्धा व प्रेम सतत पडणा-या पावसामुळे नदितील वाढत्या
पाण्याप्रमाणे वाढत असतो. त्याचप्रमाणे रात्रंदिवस सर्व इंद्रियासहीत परमेश्वराच्या
दृढ अतःकरण ठेवून परमेश्वराची भक्ती – उपासना अनन्यभक्त करीत असतो. जो
अनन्यभक्त असतो, त्या ज्ञानी अनन्यभक्ताला जगात एका परमेश्वराच्या
स्वरूपाशिवाय काहीच विश्वसनीय न चांगले नाही,. असा त्याच्या काया, वाचा
मनाने केलेला निश्चय असतो.

परिपूर्णतमः साक्षात श्रीकृष्णनान्य एवहि।
एककारार्थमागत्य कोटी कार्य चकार ह ।। .. गर्गसंहिता
दूर्जनांचा येणे करूनी संहार । पूर्ण अवतार रामकृष्ण ।। तु. म.

रामकृष्ण पूर्ण अवतार आहेत. मात्र राम अवतारात सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य
नाही. रामाने वनवासात जांतांना सितेला सोबत घेतले परंतू ऊर्मिलेला सोबत
घेण्यासाठी ते परवानगी देवू शकत नाहीत कारण वाल्मिकिने रामायणात फक्त

तिघांनाच वनवास लिहीला आहे. यावर लक्ष्मण काहीही बोलू शकले नाही. मात्र
श्रीकृष्णांचे तसे नाही सामर्थ्यासह स्वातंत्र्य आहे. रामाने अकरा हजार वर्षे राज्य
केले. पण श्रीकृष्णाने फक्त सव्वाशे वर्षे राज्य केले.

यदुवंशेsवतूर्णस्य भवतः पुरूषोत्तमा ।
शरच्छतम व्यतीताय पच्चविशाधिकं प्रभो। भागवत

मृत्युलोकी मनुष्यमर्यादा । शतवर्ष जी गोविंदा । ते अतिक्रमोनि अवदा।

अधिक मुकुंदा पंचविस जाहली ।। भागवत

श्रीकृष्णाला पापपुण्य नाही, त्यांना म्हातारपण नाही, शोक नाही ते विशोको
आहेत. गोकुळातून सहज मथुरेत गेले, किबहुना स्वतःचे कुळ संपवून अवतार
संपविला तरी चेह-यावर हास्यच. यांना मृत्यू नाही कारण जन्ममरणांतीत आहेत.
ते विधिघत्सो आहेत त्यांना भूक लागत नाही. अभिप्यास यांना तहान लागत नाही.
पूर्णकाम यांचा काम नेहमी पूर्ण असतो. पूर्ण तृप्त हे असतात त्यांना पूर्णत्व प्राप्त
झालेले असल्याने त्यांना कोणत्याही कामना पूर्ण होते. श्रीकृष्ण हे सत्यसंकल्पाचे
दाता आहेत त्यांचे प्रत्येक कार्य सफल होते.

आदौ देवकी गर्भ जननं गोपीगृहे वर्धनम ।
माया पुतना जीवताप हरणं गोवर्धन धारणम ।
कंस छेदनं कौरवादि हननम् कुंती सुता पालनम ।
एतद्वी भागवत पुराण कथितम श्रीकृष् लीलामृतम ।।

ठायिचाची काळा अनादी बहू काळा । महणवूनी वेगा चाळा लावियेला ।। ज्ञाने.
श्रीकृष्णास समजून घेणे हे अंतराम्याला जाणून घेण्यासारखे आहे. श्रीकृष्ण हे असे
व्यक्तीमत्त्व आहे जे प्रत्येक अवस्थेतल्या व्यक्तीला आपल्यासारखे वाटते. त्यांना
श्रीकृष्णाचा जीवनविचार आपल्या जीवनाला मार्गदर्शक आहे. श्रीकृष्णाने
सांगीतलेला गीताविचार सर्वकाळात सर्वांना लागू होणारा आहे. प्रत्येकाच्या
जीवनाला मार्गदर्शक आहे. श्रीक़ृष्णविचार हा कोणत्याही धर्मासाठी कालातीत
आहे. तो सर्वांना सर्वकाळात लागू पडतो. अर्जून युद्धप्रसंगी जेव्हा श्रीकृष्णाला

विचारतो रणांगणावर जे युद्धासाठी उभे आहेत ते माझे काका, मामा , गुरू आहेत.
मी युद्ध कसा करू. श्रीकृष्ण अर्जूनाला सांगतात –“ तुझे कर्म आहे क्षत्रियाचा
धर्मपालन कर, समोर कोण उभे आहे याचा विचार करू नकोस” . कृष्ण कृष्ण
महाकृष्ण सर्वज्ञ त्व प्रसिद्ध महें। रमा रमणे विद्येशू विद्या म माही
प्रयच्चेशु।।
आपल्याही जीवनाचे असेच आहे जेव्हा संसाराच्या रणांगणावर मन सैरभैर
होते त्यावेळी श्रीकृष्णाचा कर्मयोग मार्गदर्शक आहे म्हणून कृष्णभावना ही
समजावून घेण्यासाठी आहे. जन्माष्टमी हा सण सर्व भारतामध्ये मोठ्या उत्साहात
साजरा केला जातो. दहीहंडी फोडण्याचा साहसी खेळ ह्या सणाचे महत्वाचे
आकर्षण असते. कृष्णविचार व कृष्णभावना समजून घेतल्यास प्रत्येकाच्या
जीवनात आनंदाच्या दहिहंडीची उधळण होईल.

- प्रा. डॉ. हरिदास आखरे

Web Title: Krishna is my friend .......!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.