अनुचित नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 05:57 IST2020-02-28T05:57:30+5:302020-02-28T05:57:46+5:30

धर्माधिकाऱ्यांनी स्त्रियांची उपेक्षा करून त्यांची निंदा केली. पुरुषप्रधान संस्कृतीने तिला नरकाची खाण म्हटलं. महिलांना धर्माधिकार नाकारला.

Inappropriate rules creating inequality among humans | अनुचित नियम

अनुचित नियम

- बा. भो. शास्त्री

स्वार्थी माणसाने अनेक जाती निर्माण केल्या. काहींचे अधिकार हिरावून घेतले. स्वनिर्मित कल्पना धर्मग्रंथात पेरल्या आणि धर्मनियम तयार करून माणसांचे तुकडे केले. जगाला आधार देणारा मानवच निराधार केला. देवधर्मापासून त्याला वंचित ठेवला. धर्माधिकाऱ्यांनी स्त्रियांची उपेक्षा करून त्यांची निंदा केली. पुरुषप्रधान संस्कृतीने तिला नरकाची खाण म्हटलं. महिलांना धर्माधिकार नाकारला. तिला मंदिर प्रवेशास बंदी केली. अधिकाराची पात्रता असावी हे खरं आहे. अपात्र राजा, सेनापती, वैद्य, शिक्षक, धर्माचे आचार्य समाज हे देशाला अतिशय घातकच आहेत. पण हा पात्रतेचा अधिकार विशिष्ट वर्गालाच कसा काय असू शकेल, याचा विचार आता समाजाने केला पाहिजे. आजही जर महिलांना सन्मान मिळत नसेल तर तोे देश उन्नत कसा? या संकुचित विचाराने अखंड मानव जात छिन्नभिन्न झाली. त्यात एकलव्यासह अनेकांचा बळी गेला. यातून उच्च-नीचतेचा भाव निर्माण झाला. अनंत काळ भेदाभेद होत राहिला. परमगती सर्व जीवांना मिळत नाही, असा मतलबी विद्वानांनी सिद्धांत मांडला होता. पण पाच हजार वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णाने या अनुचित रूढींविरोधात पहिलं बंड पुकारलं.
मां हि पार्थ व्यपाश्रित्य
ये पि स्यु: पापयोनय:
स्त्रियोवैश्यास्तथा शूद्रा
स्तेपि यान्ति परां गतिम्
पापात्म्यासह स्त्री, वैश्य तसेच शूद्रांनाही मोक्षाधिकार असल्याचं ठणकावून गीतेत सांगितलं आहे. नंतर श्रीचक्रधरांनी लोकांचं निरीक्षण केलं आणि ते म्हणाले, ‘हा अवघा जनु ठकला असे गा: परि मी ठकला ऐसे कव्हनी न म्हणे : कव्हनी एकु ऐसे म्हणेल : मी ठकला : तरी तयाचे ठक फैडिजैल.’ हाच कळवळा संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून व्यक्त केला.

Web Title: Inappropriate rules creating inequality among humans