ताणमुक्त मनाचा व तणावमुक्त जीवनाचा कानमंत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 08:23 PM2019-10-05T20:23:31+5:302019-10-05T20:23:35+5:30

अजय नि अभय, दोघे जिवलग मित्र. नावं ऐकायला एकसारखी वाटली तरी अर्थ मात्र विरुद्ध. अजय म्हणजे जय नाही तो पराजय तर अभय म्हणजे भय नसलेला, निर्भय. गंमत म्हणजे दोघांच्या विचार करण्याच्या नि कृती करण्याच्या पद्धतीही भिन्न होत्या.

The earrings stress free mind and stress free life | ताणमुक्त मनाचा व तणावमुक्त जीवनाचा कानमंत्र

ताणमुक्त मनाचा व तणावमुक्त जीवनाचा कानमंत्र

Next

रमेश सप्रे

अजय नि अभय, दोघे जिवलग मित्र. नावं ऐकायला एकसारखी वाटली तरी अर्थ मात्र विरुद्ध. अजय म्हणजे जय नाही तो पराजय तर अभय म्हणजे भय नसलेला, निर्भय. गंमत म्हणजे दोघांच्या विचार करण्याच्या नि कृती करण्याच्या पद्धतीही भिन्न होत्या.

अजयला सगळ्या गोष्टी मंदगतीनं करायला आवडायच्या. जेवण, आंघोळ सोडाच ऑफीसमधलं कामही मंदगतीनं करायचा. कामं पुरी व्हायची नाहीत. पुढे ढकलली जायची. ती गोगलगायीची गोष्ट आपल्याला माहीत असेलच. अतिशय धीम्यागतीनं चालणारी गोगलगाय नि भुर्रकन इकडून तिकडे उडणारी चिमणी यांची होती मैत्री. पहिल्यांदा चिऊताई असलेली नंतर चिऊबाई झाली आणि नंतर चिऊआईही बनली. आपल्या सुंदर गुबगुबीत पिलाचं बारसं करायचं तिनं ठरवलं. सगळ्यांना आमंत्रणं दिली. गोगलगाईला सुद्धा. ‘वेळेवर पोचीन हं’ असं वचनही गोगलगायीनं दिलं. तयारी करून ती निघाली सुद्धा. चिऊताईचं घरटं जरा दूर होतं.

अखेर ज्यावेळी ती तिथं पोचली तेव्हा कार्यक्रमाची धामधूम, वाजंत्री ताशे, अनेक जण जमलेयत, सर्वजण उत्साहात आहेत. आपण अगदी योग्य वेळी पोचले या आनंदात ती आपल्या मैत्रिणीला भेटली. ‘पोचले किनई वेळेवर बारशाला?’ या गोगलगायीच्या प्रश्नावर सारे हसू लागले. तेव्हा चिऊताई म्हणाली, ‘बरं झालं बारशाला म्हणून निघालात म्हणून लग्नाला तरी पोचलात. आज माझ्या मुलाचं चिमण्याचं लग्न आहे.’ असो. अतिशय मंदगतीनं, आळशी बनून काम करणा-या व्यक्तीचं आजच्या काळात हसूच होतं.

आता अभयकडे वळूया. त्याचं सारं जगणं, काम हे संथ, स्थिर असायचं. तो एका लयीत काम करत राहायचा. त्यामुळे थकायचा नाही आणि कामही वेळेवर उरकली जायची. त्याचा आदर्श होतं कासव. तेच ‘ससा नि कासव’ यांच्या शर्यतीतलं. संथ पण सतत चालून शर्यत जिंकली होती कासवानं. इंग्रजीत जी म्हण आहे. ‘स्लो बट् स्टेडी विन्स द रेस’ तिचा अर्थ हाच आहे.
कासवाच्या या गतीचे अनेक फायदे आहेत.

* एका गतीने चालल्याने (काम करत राहिल्यानं) थकायला, दमायला होत नाही.
* आपल्या चालण्याची किंवा काम करण्याची गती एका लयीत असल्यानं कामाचा दर्जा सुधारतो. आपली कौशल्य, कार्यक्षमता यांचा विकास होतो.
* सतत काळाशी स्पर्धा नसल्यानं मनावर अनावश्यक ताण, दडपण येत नाही. यामुळे शरीरमनाचं आरोग्य सुस्थितीत राहतं. एकूणच आयुष्याची मर्यादा वाढते.
* याच बरोबर बुद्धी स्थिर शांत राहिल्यान आपत्कालिन व्यवस्था करणं सोपं जातं. केवळ घाईगडबडीमुळे निर्णय घेणं आणि त्यानुसार कार्यवाही करणं सहज सोपं होऊन जातं. संकट आल्यावर कासव आपले चारी पाय, डोकं, शेपूटसुद्धा आत ओढून आपल्या कवचाखाली सुरक्षित राहतं.
या सर्व गुणांचं स्मरण दर्शन व्हावं म्हणून अनेक मंदिरात दगडाच्या किंवा पितळेच्या मूर्तीची स्थापना केलेली असते. केवळ भगवान विष्णूचा दुसरा कूर्मावतार म्हणून नव्हे.

या संथ, शांतपणाच्या जोडीला हातात असलेल्या कामांची नि त्यासाठी उपलब्ध काळाचा विचार आवश्यक असतो. यालाच काळाचं व्यवस्थापन (टाईम मॅनेजमेंट) असं म्हणतात. या संदर्भात दोन मैत्रिणींचं उदाहरण लक्षात ठेवण्यासारखं आहे.

अनुश्री नि अनुराधा दोघींना सारेजण ‘अनू’ या नावानंच हाक मारत. दोघीही एकाच ठिकाणी कामाला होत्या. एकाच वाहनातनं कामाला जायच्या; पण दोघींची काम करण्याची पद्धत मात्र एकमेकीपेक्षा अगदी निराळी होती. तसं पाहिलं तर अनुश्री अधिक वेगानं काम करायची तर अनुराधा अतिशय पद्धतशीरपणो, व्यवस्थित नियोजन करून कामं उरकायची. दोघींचा कामासाठी निघण्यापूर्वीचा कार्यक्रम भिन्न होता. सगळ्यांची सगळी कामं करून घाईगडबडीत स्वत:ची तयारी करून अनुश्री काहीशी वैतागून घराबाहेर पडायची. तर अनुराधाचा कामांचा क्रम उलटा असायचा. उठल्यावर ती शांतपणे आधी स्वत:ची तयारी करायची अगदी कामासाठी बाहेर निघताना करावयाची वेशभूषा, केशभूषा करून इतर कामं करायची. अंगभर एप्रन घालून काम केल्याने कपडे खराब व्हायचे नाहीत. स्वयंपाकाची सारी पूर्वतयारी तिनं आदल्या रात्रीच करून ठेवलेली असायची. सर्वाचे जेवणाचे डबे, मुलांचा गणवेश, पतीराजांची कपडे, बॅग इत्यादीची सारी तयारी केलेली असायची. शांतपणे सारं उरकून पंधरा मिनिटं शांत राहून श्वासाकडे लक्ष देत ध्यान करून आजचा कामाचा दिवस अतिशय यशस्वी नि आनंदी जाणार आहे हे स्वत:ला स्पष्ट सांगून सावकाश घराबाहेर पडायची. नेहमी मजेत असायची. चेह-यावर कायम हास्य, स्वत:चं काम उरकून इतरांना मदत केल्यामुळे सर्वाची आवडती बनली होती.

आपल्यालाही असा प्रयोग स्वत:च्या जीवनात करता येईल, ताणमुक्त मन नि तणावमुक्त जीवनाचा कानमंत्रच आहे हा! करून पाहायला काय हरकत आहे. 

Web Title: The earrings stress free mind and stress free life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.