भक्ती म्हणजे अंतरंगात बदल होणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 16:40 IST2019-04-05T16:38:25+5:302019-04-05T16:40:20+5:30

संतांनी भक्तीमार्गाचा प्रचार आणि प्रसार करतांना देवळातला देव विश्वात्मक बनविला.

Devotion is a change in intimacy | भक्ती म्हणजे अंतरंगात बदल होणे

भक्ती म्हणजे अंतरंगात बदल होणे

- भरतबुवा रामदासी

महाराष्ट्रातील संतांनी भक्तीमार्गाचा प्रचार आणि प्रसार करतांना देवळातला देव विश्वात्मक बनविला. विश्वात्मक देवाचे वर्णन वेदांमध्ये आहेच पण वेद हे संस्कृत भाषेत आहेत. शिवाय वेदभाषा ही बहुजन समाज कळणारी नाही. त्या काळात वेदमंत्राचा अधिकार देखील सर्वांना नव्हता. त्यामुळे वेद तत्वज्ञानापासून बहुजन समाज वंचित राहिला. संतांनी विचार केला की, मनुष्य देहाच्या उद्धाराचे हे तत्वज्ञान समाजाला कळलेच पाहिजे. वेदाच्या कृपणतेबद्दल संतांनी खंत व्यक्त केली, ज्ञानराज माऊली म्हणतात -

वेद संपन्न होय ठाई । परी कृपणू आण नाही ॥
जो कानी लागला तिही । वर्णाचिया ॥

वेदातला उध्दाराचा हा मार्ग, हा मानवता धर्म, सर्वांना कळावा, मोक्षद्वार सर्वांसाठी खुले व्हावे म्हणून संतांनी वेद वाङमय मराठी मायबोलीत आणले. वेदाचे काठिण्य लक्षात घेऊन भगवंताने श्रीकृष्ण अवतारात गीता सांगितली पण अशिक्षित समाजाला गीता देखील कळाली नाही परत भगवंताने ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने अवतार घेऊन ज्ञानेश्वरीसारखा सुबोध ग्रंथ रचला व वेदप्रणति मानवता धर्म तत्वज्ञान बहुजन समाजासाठी खुले केले.
माऊली म्हणतात -

तैसा वाग्विलासे विस्तारु  । गीतार्थेसी विश्व भरु  ॥
आनंदाचे आवारु  । मांडू जगा ॥

संतांनी कर्मकांडात आणि  व्रतवैकल्यांत अडकलेली भक्ती सर्वजनसुलभ केली. देव प्राप्तीसाठी फार सायास करण्याची गरज नाही. पश्चातापपूर्वक भगवंताला शरण गेले की तो सहज प्राप्त होतो. यासाठी संतांनी नामसाधना सांगितली. माऊली हरिपाठात वर्णन करतात -

देवाचिये द्वारी उभा क्षणभरी। तेणे मुक्ती चारी साधियेल्या॥ 
हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा। पुण्याची गणना कोण करी॥

 

संताच्या या सोप्या, सुलभ तत्वज्ञानामुळे या देशातील अठरा पगड जाती हरिनामाच्या ध्वजाखाली एकत्रित आल्या व त्यांनी पंढरीच्या वाळवंटात एकात्मतेचा गोपाळकाला केला. पंढरीचा पांडुरंग हा भेदभावातीत आहे, कृपाळू आहे, कनवाळू आहे, पतितपावन आहे, त्याला सर्वभावे शरण जा. मन, बुद्धी, चित्त व संसारातील सर्व कर्म त्याला अर्पण करा. जे जे कर्म कराल ते निष्काम व निर्लेप करा. कुणाचा कधी द्वेष, मत्सर, वैरभाव करू नका. देव हा देवळापुरता मर्यादित नाही, तो सर्वांतरयामि आहे, सर्वत्र आहे.

जे जे भेटे भूत । ते ते मानिजे भगवंत ॥
हा भक्तीयोग निश्चित । जाण माझा ॥

 

ही भक्ती जणमनात रुजविली अशा अभेद वृत्तीने जर जीवन व्यवहार केला तर परमेश्वराचे सगुण दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. भक्ती म्हणजे नुसतेच बाह्य दर्शन नाही तर अंतरंगात बदल अपेक्षित आहे.

(लेखक राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी - 9421344960 )

Web Title: Devotion is a change in intimacy