जीवन प्राधिकरणाच्या पाणी नियोजनाचा खेळखंडोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 10:06 PM2018-06-11T22:06:51+5:302018-06-11T22:07:09+5:30

चार महिने झाले. पाणीटंचाईने यवतमाळकर होरपळून निघत आहे. या काळात जीवन प्राधिकरणाने पर्यायी योजना गाजराची पुंगी म्हणूनच राबविली. हाती घेतलेल्या कामांची उपलब्धता काहीच नाही. आता पावसाला सुरुवात झाली आहे.

Sports Plan of Water Planning of Life Authority | जीवन प्राधिकरणाच्या पाणी नियोजनाचा खेळखंडोबा

जीवन प्राधिकरणाच्या पाणी नियोजनाचा खेळखंडोबा

Next
ठळक मुद्देयवतमाळकरांची सहनशीलता : पाणीटंचाईने होरपळली जनता

विलास गावंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : चार महिने झाले. पाणीटंचाईने यवतमाळकर होरपळून निघत आहे. या काळात जीवन प्राधिकरणाने पर्यायी योजना गाजराची पुंगी म्हणूनच राबविली. हाती घेतलेल्या कामांची उपलब्धता काहीच नाही. आता पावसाला सुरुवात झाली आहे. अजूनही हा विभाग ताळ्यावर आला नाही. पाण्याची मागणी निश्चितच कमी झाली. तरी महाकाय टँकरचे पाणी होते तेवढेच सुरू आहे. निळोणा प्रकल्पात पाणी वाढले आहे. इमरजन्सी सुरू होऊ शकते. पण प्राधिकरणाची इच्छाशक्ती नळाने पाणी सोडण्यासाठी आडवी येत आहे. सुदैवाने या विभागाला यवतमाळकरही सहनशील भेटले. अपवाद वगळता त्यांच्या संयमाचा बांध फुटला नाही.
जानेवारीपासूनच यवतमाळला पाणी टंचाई सुरू झाली. हळूहळू याची भीषणता वाढत गेली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नगरपरिषदेने ऐनवेळी योजनांचे घोडे दामटले. चापडोहचा मृतसाठाही संपत आलेला असताना फ्लोटींगचा पर्याय शोधला. तोपर्यंत इकडे निळोणा आचक्या देत होता. निळोणात फ्लोटींग सुरू झाले. तिकडे चापडोह संपले. दरम्यानच्या काळात गोखीचा पर्याय पुढे आला. काम देण्यात आणि सुरू करण्यात एक महिना निघून गेला. २४० नगरांना या योजनेचे पाणी पोहोचणार होते. पण झाले उलटे. उद्घाटनानंतर सात दिवस गोखीचे पाईपच लिक होत राहिले. ही तात्पुरती नळ योजना कार्यान्वित करण्यासाठी आटापिटा केला, असा आव आणणाऱ्यांचा चेहरा पडला. ना प्राधिकरणाने बोंब ठोकली ना पालिकेने आवाज उचलला.
सात आठ दिवसानंतर गोखीचे पाणी पुढे सरकले. पण जिथे पोहोचायचे तिथे पोहोचलेच नाही. लोहारा, सुयोगनगर, दर्डानगर टाकीला पाणी पोहोचणार, असा बोभाटा करण्यात आला. अर्ध्या हळकंडात पिवळी, अशी या योजनेची गत झाली. सुरुवातील दर्डानगरच्या टाकीत पाणी भरले. नंतर मात्र ही टाकी भरू शकत नाही, अशी बोंब ठोकण्यात आली. का, तर म्हणे गोखीचे पाईप लहान आणि टाकीचे मोठे आहे म्हणून. सुरुवातीला कशी भरली, याचे उत्तर मात्र कुणाकडेही नाही. आतापर्यंतचा नियोजनशून्यतेचा खेळ संपवायला हा विभाग तयार नाही. तीन दिवसांच्या पावसाने निळोणात पाणी जमले. किमान महिनाभर पुरेल एवढे पाणी असल्याचे जानकारांचे मत आहे. त्याला आधारही आहे. इमरजन्सीपर्यंत पाणी आलेले आहे. थोडेथोड का होईना उपसले तर काहीअंशी अडचण दूर होऊ शकते. इच्छाशक्तीला बळ दिल्यास हा उपाय कठीण नाही. कार्यकारी अभियंता अजय बेले यांनी यापूर्वी इतर ठिकाणी कार्यरत असताना पाणी टंचाईचे अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले आहे. यवतमाळात त्यांची लाईन कुठे ब्रेक झाली, हे कळायला मार्ग नाही, असे सांगितले जाते. गोखीचे पाणी घेण्याची काही लोकांची इच्छा नव्हती, अशी कुजबूज आजही सुरू आहे.
बेंबळातून पाण्याची सर्कस मोडली
बेंबळा प्रकल्पातून पाणी आणण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी तंबू टाकला. दिवसरात्र काम सुरू असल्याचा गाजावाजा करण्यात आला. पण रात्र कमी सोंग फार, अशी स्थिती असताना जनतेच्या भावना समजून न घेता तारखाही जाहीर करण्यात आल्या. एक महिन्यात काम होत नाही, हे प्राधिकरणातील काही मंडळी पूर्ण विश्वासाने सांगत होती. परंतु राजकीय मंडळींनी आपले घोड दामटवत तारीखही जाहीर करून टाकली. यवतमाळला पाणी येण्याच्या तारखेवरून दीड महिना निघून गेला. अजूनही बेंबळाची पाणी किमान एक महिना यवतमाळात पोहोचू शकणार नाही, ही स्थिती आहे. टाकळीपर्यंत पाणी आणण्यासाठी घेतलेल्या चाचणीतच पाईपच्या ठिकºया उडाल्या. अर्थातच हा पाईप निकृष्ट होता. जिथे टाकळीपर्यंतच योजना नापास झाली तिथे यवतमाळची काय सोय. टाकळी फाटा, हनुमान आखाडा चौकात दोन असे तीन बेंड मारायचे आहे. टाकळी फाट्यापासून पुढे काही काम व्हायचे आहे. तूर्तास तरी बेंबळाचे तेही रॉ वॉटर मिळणार नाही, हे स्पष्ट आहे. या स्थितीत निळोणा, गोखी आणि मिळालेच तर चापडोहचे पाणीच तारणहार ठरणार आहे. पाण्यासाठी लोकांची अजूनही जागल सुरू आहे. निळोणाचे पाणी सोडण्यासाठी थोड्या इच्छाशक्तीची गरज आहे. लोकप्रतिनिधींनी (?) थोडे लक्ष दिल्यास ते शक्य आहे, असे मत व्यक्त होत आहे.

Web Title: Sports Plan of Water Planning of Life Authority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.