बंदला संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 10:08 PM2017-12-11T22:08:35+5:302017-12-11T22:09:29+5:30
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या विदर्भ बंदला यवतमाळ जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या विदर्भ बंदला यवतमाळ जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. यवतमाळ, उमरखेड आणि वणी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. उमरखेड व वणी येथे मोर्चा काढून बंदचे आवाहन करण्यात आले. व्यापारी प्रतिष्ठानांसह शैक्षणिक संस्थाही बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या.
विदर्भ राज्य आंदोलन समितीने सोमवारी विदर्भ बंदचे आवाहन केले होते. या आवाहनानुसार यवतमाळ शहरात उत्तम प्रतिसाद मिळाला. विदर्भवाद्यांनी बंदचे आवाहन केले. त्यानुसार व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली. दत्त चौक, नेताजी मार्केट, मेनलाईन, टांगा चौक यासह आझाद मैदानावर स्वेटर विक्रीसाठी आलेल्या तिबेटीयन बांधवांनीही आपली दुकाने बंद ठेवली. यासोबतच शहरातील शाळा, महाविद्यालयेही बंदमध्ये सहभागी झाली होती. बंद दरम्यान यवतमाळ शहरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. दुपारनंतर मात्र व्यवहार सुरळीत सुरू झाले. जिल्ह्यात कुठेही वाहतुकीलाही फटका बसला नाही. यवतमाळात आंदोलनाचे नेतृत्व विदर्भ राज्य जनआंदोलन समितीचे अध्यक्ष कृष्णराव भोंगाडे यांनी केले. यावेळी डॉ. विजय चाफले, अशोक कपिले, भरत तोंदवाल, मनोज चमेडिया, प्रदीप धामणकर, निखील खरोडे, अशोक पोहेकर, तुकाराम खडसे, मनोहर सहस्त्रबुद्धे, अनिल कालोकर, लकी लष्करी, श्रीधर ढवस, किशोर परडखे आदी सहभागी झाले होते.
वणी येथे विदर्भवाद्यांनी टिळक चौकात एकत्र येऊन मोर्चा काढला. मोर्चेकऱ्यांनी व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यानुसार वणीत कडकडीत बंद पाळण्यात आला.
उमरखेड येथे स्वतंत्र विदर्भ राज्य झालेच पाहिजे, अशा घोषणा देत मोटरसायकल रॅली काढण्यात आली. तसेच मोर्चाही काढण्यात आला. विदर्भवाद्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.
अन्याय निवारण समिती
स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी पुकारलेल्या बंदमध्ये अन्याय निवारण समितीने सहभाग नोंदविला. नेताजी मार्केट, बसस्थानक परिसरातील व्यापाऱ्यांना आपली प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन या समितीने केले. बंदमध्ये समितीचे गणेश कोसरकर, शेख जाकीर, मोतीराम सिंह, सुधाकर गुल्हाने, राज बतरा, अंकुश साठवणे, दिनेश पाचकवडे, अनुप तेला, वहिद अकबानी आदींनी सहभाग नोंदविला.