पालघर नगर परिषदेवर अपेक्षेप्रमाणे युतीची सत्ता; नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 06:01 AM2019-03-26T06:01:39+5:302019-03-26T06:01:49+5:30

लोकसभेच्या रणधुमाळीतही सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या पालघर नगर परिषदेतील २८ पैकी तब्बल २१ जागा जिंकत शिवसेना-भाजपा युतीने निर्विवाद सत्ता मिळवली आहे.

Alliance's power as expected on Palghar Municipal Council; NCP chief | पालघर नगर परिषदेवर अपेक्षेप्रमाणे युतीची सत्ता; नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे

पालघर नगर परिषदेवर अपेक्षेप्रमाणे युतीची सत्ता; नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे

Next

पालघर : लोकसभेच्या रणधुमाळीतही सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या पालघर नगर परिषदेतील २८ पैकी तब्बल २१ जागा जिंकत शिवसेना-भाजपा युतीने निर्विवाद सत्ता मिळवली आहे.
शिवसेनेने प्रतिष्ठेच्या केलेल्या नगराध्यक्षपदाच्या लढतीत त्या पक्षाच्या श्वेता पिंंपळे यांचा एक हजार ७० मतांनी पराभव करत आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. उज्ज्वला काळे यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे सत्ता युतीची आणि नगराध्यक्ष आघाडीचा अशी निकालानंतरची राजकीय स्थिती तेथे आहे. आघाडीच्या उमेदवार असलेल्या राष्ट्रवादीच्या डॉ. काळे यांना १३ हजार ९७४ मते मिळाली. शिवसेनेच्या डॉ. श्वेता पिंपळे यांना १२ हजार ९०४ मते मिळाली, तर अपक्ष अंजली पाटील यांनी पाच हजार १२३ मते मिळवली.
दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने २६ जागांसाठी ९० उमेदवार रिंगणात होते. तेथे सोमवारी सकाळपासून मतमोजणी सुरू झाली. त्यात शिवसेनेने १४, भाजपाने सात असा २१ जागांवर विजय मिळवला. तर आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागांवर समाधान मानावे लागले. पाच जागांवर अपक्ष निवडून आले असून त्यातील बहुतांश युतीतील बंडखोर आहेत. काँग्रेस, बहुजन विकास आघाडी, जनता दलाला एकही जागा मिळाली नाही. नगरपालिकेसाठीच्या जागावाटपात भाजपाला नऊ जागा देऊन झुकते माप देत सांभाळून घेण्याचा प्रयत्न शिवसेनेने यावेळी केला होता.
पालघरमधील लोकसभेच्या जागावाटपावरून युतीत झालेले रूसवे फुगवे पाहता स्थानिक गरज लक्षात घेऊन यंदा नगरपालिकेत शिवसेना-भाजपाची प्रथमच युती झाली. २८ जागांपैकी १७ जागी शिवसेना, तर नऊ जागी भाजपा लढत होती. महायुतीत सहभागी असूनही आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षाला एकही जागा सोडण्यात आलेली नव्हती. युतीतील नगराध्यक्षपद शिवसेनेला सोडण्यात आले होते आणि त्या पक्षाने ते प्रतिष्ठेचे केले होते. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम आणि आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जवळपास दोन आठवडे तळ ठोकला होता. भाजपानेही राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे प्रचाराची सारी सूत्रे दिली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी, जनता दल यांची आघाडी झाली होती. त्यात राष्ट्रवादी १५, काँग्रेस सात, बविआ पाच, तर जनता दल एका जागेवर लढत होते. त्यातील नगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आले होते.
१९९९ ला नगरपालिका अस्तित्वात येताच १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने १० जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली. तेव्हा शिवसेनेला चार, भाजपाला एक, अपक्षांना तीन जागा मिळाल्या होत्या. २००४ मध्ये थेट नगराध्यक्षाच्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आणि तेव्हाच्या २५ जागांपैकी १७ जागा जिंकत शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवली. जनाधार पार्टी तीन, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तीन,भाजपा एक आणि बविआ एक अशी स्थिती होती. २००९ मध्ये शिवसेनेविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी, बविआ, अपक्षांनी एकता परिषद स्थापन केली. त्यानंतर २५ पैकी शिवसेनेने १२, काँग्रेसने पाच, राष्ट्रवादीने तीन, बविआने तीन व अपक्षांना दोन जागा मिळाल्या. सत्ता स्थापनेवेळी एकता परिषदेला दोन अपक्षांनी साथ दिली. २०१४ मध्ये २८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने १७ जागा जिंकत एकहाती सत्ता स्थापन केली. राष्ट्रवादीला १०, काँग्रेसला एक जागा मिळाली. भाजपाला एकही जागा मिळाली नव्हती. त्या पक्षाची ताकद नसतानाही यावेळच्या जागावाटपात त्यांना नऊ जागा सोडण्यात आल्या. त्यातील एक बिनविरोध निवडून आली होती.

Web Title: Alliance's power as expected on Palghar Municipal Council; NCP chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :palgharपालघर