डॉ.आंबेडकर प्रशिक्षण केंद्र सुरू करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 01:32 AM2018-04-09T01:32:34+5:302018-04-09T01:32:34+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले आणि महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. या दोन्ही महामानवाचे विचार प्रशासनात काम करण्यास इच्छुक असणाऱ्या आय.ए.एस. व आय.पी. एस. अधिकाऱ्यांमध्ये रुजवण्यासाठी.....

Dr. Ambedkar Training Center will be started | डॉ.आंबेडकर प्रशिक्षण केंद्र सुरू करणार

डॉ.आंबेडकर प्रशिक्षण केंद्र सुरू करणार

Next
ठळक मुद्देरामदास तडस : सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले आणि महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. या दोन्ही महामानवाचे विचार प्रशासनात काम करण्यास इच्छुक असणाऱ्या आय.ए.एस. व आय.पी. एस. अधिकाऱ्यांमध्ये रुजवण्यासाठी वर्धेच्या ऐतिहासिक भूमीत आय.ए.एस. आणि आय.पी.एस. प्रशिक्षण केंद्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे दिला आहे. तो मंजूर होईल, अशी माहिती खा. रामदास तडस यांनी दिली.
सामाजिक न्याय भवन येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभागाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी खा. तडस मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर नगराध्यक्ष अतुल तराळे, जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाणे, डॉ. मधुकर कासारे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी अविनाश रामटेके, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पंकज वंजारे, जात पडताळणी समितीचे मुख्य संशोधन अधिकारी गौतम वोकोडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
खा. तडस पुढे म्हणाले, डॉ. आंबेडकर यांचे विचार घराघरापर्यंत पोहचवण्यासाठी आपण काम केले पाहिजे. शेतकरी मजूर म्हणून स्वत:च्या शेतात काम करतो. त्याला मनरेगातुन पैसे मिळाले पाहिजे. तसेच शहरात पण मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी मनरेगा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी संसदेत प्रश्न उपस्थित केल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
ग्रा.पं.च्या कारभारापासून देशाचा कारभार कसा चालेल हे संविधानात लिहून ठेवले आहे. त्या संविधानाप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न विद्यमान सरकार करीत आहे. इतकेच नव्हे तर डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा असो की लंडन मधील घर, राज्य व केंद्र सरकार प्रत्येकवेळी विचारपूर्वक काम करेल. डॉ. आंबेडकर ज्या संसदेत बसायचे, ज्या वाचनालयात पुस्तके वाचून संशोधन करायचे तिथे बसताना आम्हालाही अभिमान वाटतो. म्हणून बाबासाहेबांचे विचार शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवण्यासाठी काम करण्याचा संकल्प प्रत्येकाने केला पाहिजे असेही यावेळी खा. तडस यांनी स्पष्ट केले.
नगराध्यक्ष अतुल तराळे म्हणाले की, सामाजिक समरसता निर्माण करण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी प्रयत्न केले. तेच काम आज पून्हा करण्याची गरज आहे. शासनाच्या योजना एकत्रितपणे सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाच्या विविध विभागांनी कामे केली पाहिजे. आज विद्यार्थी मैदानापेक्षा मोबाईलवर जास्त वेळ घालवतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या संपूर्ण क्षमता विकसित होत नाही. शिक्षण हे कमाईचे साधन असू नये तर ते व्यक्तिमत्त्व विकासाचे साधन व्हावे, असे त्यांनी सांगितले.
जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, डॉ. आंबेडकर यांनी स्त्रियाचा समान हक्क, शिक्षण, मतदान आदी विषयांवर काम केले. त्यांच्या कामाचे आपण अवलोकन करून ते आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांनी अनेक विषयांवर केलेल्या कामामुळे त्यांना जागतिक स्तरावर आदर आणि सन्मान मिळाला असल्याचे सांगितले.
मधुकर कासारे यांनी शोषित, पीडित लोकांना इतरांच्या बरोबरीने आणण्यासाठी शासनाच्या योजना त्यांच्यापर्र्यंत पोहचविणे आवश्यक आहे. आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी संविधानाच्या सामाजिक न्यायाच्या तत्त्वानुसार काम करणे ही काळाची गरज आहे. लोकशाही रुजवण्यासाठी प्रयत्न करावेत अट्रोसिटीचा वेगळा एफ.आय.आर. नोंदणी करणे आवश्यक आहे. खासदारांनी अट्रोसिटी प्रकरणांचा आढावा घ्यावा. बेरोजगारांचे मेळावे, आयोजित करावे, मनरेगा ही योजना १०० दिवसांएवजी जास्त दिवस व शहरासाठी पण लागू करावी. यासाठी खासदारांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली.
पंकज वंजारी यांनी आज आपण निसर्गाचे विभाजन केले. आपआपले रंग वाटून घेतले. यामुळे समानता कशी येणार. आम्ही भारतीय आहोत हा विचार प्रथम प्रत्येकामध्ये रुजविला पाहिजे. त्यासाठी मनापासून संविधानाचे प्रास्ताविक वाचण्याची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते १०० विद्यार्थ्यांना स्वाधार योजना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते माहिती व जनसंपर्क महासंचालनालाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आहे. प्रास्ताविक गौतम वाकोडे यांनी केले. संचालन प्रा. प्रवीण वानखेडे यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

Web Title: Dr. Ambedkar Training Center will be started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.