तृतीयपंथीयांना समाजाने मनापासून सन्मानाने वागविण्याची आवश्यकता: सावित्रीबाई फुले व्याख्यानमालिकेत आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 04:12 PM2019-01-22T16:12:29+5:302019-01-22T16:16:30+5:30

तृतीयपंथीयांना समाजाने मनापासून सन्मानाने वागविण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन सावित्रीबाई फुले व्याख्यानमालिकेतील करण्यात आले.

Third party needs to be treated with dignity and respect: Savitribai flowers speech! | तृतीयपंथीयांना समाजाने मनापासून सन्मानाने वागविण्याची आवश्यकता: सावित्रीबाई फुले व्याख्यानमालिकेत आवाहन

तृतीयपंथीयांना समाजाने मनापासून सन्मानाने वागविण्याची आवश्यकता: सावित्रीबाई फुले व्याख्यानमालिकेत आवाहन

Next
ठळक मुद्देतृतीयपंथीयांना समाजाने मनापासून सन्मानाने वागविण्याची आवश्यकता: सावित्रीबाई फुले व्याख्यानमालिकेतील आवाहन!सर्वोच्च न्यायालयात प्रदीर्घ लढ्यानंतर मिळाला कलाम ३७७ चा निकाल!संविधान, आरोग्य, नगरविकास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आदींवर कार्यक्रम 

ठाणे : जन्मतः कुणीही व्यक्ती तृतीयपंथीय असत नाही तर सर्वांच्याच शरीरात कमी अधिक प्रमाणात असणार्‍या स्त्री आणि पुरुष हार्मोन्सचे संतुलन बिघडले तर लेस्बियन, गे, व्दिलैंगिक आणि लिंगापलीकडचे असे तृतीयपंथीय तयार होत असतात. स्त्री आणि पुरुष या प्रमाणेच हा देखील समाजातील एक घटक आहे. त्यामुळे यांना मनापासून सन्मानाने स्वीकारणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असे आवाहन ठाण्यात समता विचार प्रसारक संस्थेच्या सावित्रीबाई फुले व्याख्यानमालिकेत व्यक्त झाले. 

    "व्याख्यान तुमच्या दारी आणि व्याख्याता तुमच्या घरी", या भूमिकेतून ठाण्यातील विविध लोकवस्तीत आयोजित होणाऱ्या या व्याख्यान मालिकेच्या नवव्या वर्षात मानपाडा येथील कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार आणि लेखिका वैशाली रोडे व विधिज्ञ अॅड. निलेश खानविलकर यांची "एल जी बी टी समाज आणि कलम ३७७ चे वास्तव" यावर व्याख्याने झाली. त्यावेळी वरील विचार व्यक्त करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय  मंगला गोपाळ होते. "आपल्या परंपरेनुसार हिजर म्हणजे आत्मा तर हिजरा म्हणजे उन्नत आत्मा असलेला जीव. त्या अर्थाने हिजडा हा सन्मान दर्शक समाज घटक होय. त्यास धार्मिक कार्यात मान असे. वास्तवात तृतीयपंथीयातील परस्पर आकर्षण म्हणजे अनैसर्गिक चाळे अशी भावना तथाकथित संस्कृती रक्षकांनी पसरवली आणि तृतीयपंथीयांचे जगणे मुश्किल झाले. वेगळा आवाज, हावभाव, आवडी - निवडी यामुळे तृतीयपंथीय मुले हेटाळली जातात. त्यांची टिंगल टवाळी होते. ती एकलकोंडी बनतात. शाळेत जात नाहीत. वयात आल्यावर घरातूनही हाकलले जाते आणि मग भीक मागणे, शरीर विक्रय करणे आदी मार्गाला त्यांना लागावे लागते, अशी खंत वैशाली रोडे यांनी व्यक्त केली. 

सर्वोच्च न्यायालयात प्रदीर्घ लढ्यानंतर मिळाला कलाम ३७७ चा निकाल!

अर्धनारी नटेश्वर असणारा भगवान शंकर, विष्णूने घेतलेले मोहिनीचे रूप, महाभारतात अर्जुनाने घेतलेले बृहन्नडेचे सोंग अशा हिंदू धर्मातील अनेक प्रतीकांचा शोध घेतल्यास असे लक्षात येते की एल जी बी टी हा आपल्या परंपरेचा भाग असून तो काही पाश्चात्यांचे खूळ नाही की संस्कृतीच्या विरोधीही नाही! ब्रिटिशांनी १८६१ साली केलेल्या भारतीय दंड संहितेत कलम ३७६ हे बलात्कारासंबंधीचे गुन्हेगारी कलम तर कलम ३७७ हे अनैसर्गिक किंवा प्रजनन शक्य नसणारे व्यक्ती - व्यक्ती मधील संबंध याबाबतचे कलम होते. तृतीय पंथीयांमधील परस्पर शरीर संबंध हे प्रजननक्षम संबंध नसल्याने कलम ३७७ नुसार दहा वर्षापर्यंतच्या करावासास पात्र ठरत होते. तृतीयपंथीयात काम करणार्या संस्था - संघटना याबाबत आवाज उठवत होत्या. अखेरीस नाथ फाउंडेशनने २००१ साली दिल्ली उच्च न्यायालयात या बाबत याचिका दाखल केल्या नंतर याचिका फेटाळणे,  याचिका सादर करणे, सर्वोच्च न्यायालयात दाद मागणे, सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा उच्च नायायालयात पाठवणे असे असंख्य फेरे पार पडल्यावर गेल्या सप्टेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने, घटनेचे कलम २१ - जगण्याचा अधिकार, कलम १५ - लैंगिक आधारावर भेदाभेदास मनाई, कलम १४ - समानतेचा अधिकार, कलम १९ - अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आदींच्या आधारे ३७७ कलम रद्द केले, अशी माहिती ऍड निलेश खानविलकर यांनी मांडली. 

"कुंभ मेळयातही किन्नरांच्या आखाड्याच्या शाही  मिरवणुकीचे स्वागत करत, सर्वांना सोबत घेऊन विकास करायचा तर समाजातला तृतीयपंथीय घटक हा नैसर्गिक असून त्याला विसरताही कामा नये आणि डावलताही कामा नये, ही समाजाची जबाबदारी असल्याचे, अध्यक्षीय समारोपात डॉ संजय मंगला गोपाळ यांनी स्पष्ट केले.  सुरुवातीस वंचितांचा रंगमंचावर गाजलेली किन्नरांवरची नाटिका दीपक वाडेकर,  आणि सहकाऱ्यांनी सादर केली. व्याख्यानमालिके परिसरातील स्त्री-पुरुष, युवा-वयस्क नागरिकांनी चांगलाप्रतिसाद दिला. अशा संवेदनक्षम विषयांवर खुले प्रबोधन करण्याबद्दल अनेकांनी संस्थेचे कौतुक केले. संजय निवंगुणे, अजय भोसले, निलेश दांत, इनॉक कोलियर, दर्शन  आदी कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहेनत घेतली. 

संविधान, आरोग्यनगरविकासडॉ. बाबासाहेब आंबेडकरमहात्मा गांधी आदींवर कार्यक्रम 

३ जानेवारीला सावित्रीबाई फुले जयंतीदिनी सामाजिक कृतज्ञता निधीचा कृतज्ञता पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ सत्यशोधक कार्यकर्त्या कमलताई विचारे यांच्याशी केलेल्या कार्यकर्ता वार्तालापातून सुरु झालेली हि व्याख्यानमालिका जवाहर वाचनालय कळवा, सावरकरनगर, माजिवडा, खारटण रोड आदी लोकवस्तीतील  कार्यक्रम पार पाडत महात्मा गांधी स्मृतिदिन ३० जानेवारी पर्यंत एकंदर १४ कार्यक्रम सादर करणार आहे. २४ जानेवारीला राबोडी जवळील कावेरी रुस्तोमजी येथे आरोग्यावर डॉ विकास हजरनीस, २५ तारखेला मुलुंड जवळील वैशाली नगरात स्त्री पुरुष समतेवर लतिका सु. मो., २६ तारखेला चिराग नगर व राम नगर येथे संविधानावर सुरेश सावंत, २७ ला नगरविकासावर कोलबाड येथील जागमाता मंदिरा जवळ मयुरेश भडसावळे आणि स्मिता वायंगणकर, २८ ला कळवा सुकूर पार्क जवळ महात्मा फुले नगरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य यावर उत्तम जोगदंड आणि ३० तारखेला मराठी ग्रंथ संग्रहालयात ‘महात्मा गांधींचे करायचे काय’ यावर युवकांचा टॉक शो व मान्यवरांचे मार्गदर्शन, असे भरगच्च कार्यक्रम ठेवण्यात आले असल्याची माहिती सह संयोजक मनीषा जोशी, हर्षलता कदम, अजय भोसले यांनी दिली. या उपक्रमात वाल्मिकी विकास संघ, जवाहर वाचनालय, सिद्धार्थ बौद्धविहार समिती, बौद्धजन पंचायत समिती, महाराष्ट्र रुखी ज्ञाती समाज, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था आदी संस्था संघटनांचे सहकार्य प्राप्त झाले आहे. बिरपाल भाल, प्रवीण खैरालिया, ओंकार जंगम, चेतन दिवे, कल्पना भांडारकर, सुनील दिवेकर, मीनल उत्तूरकर, अनुजा लोहार आदी कार्यकर्ते संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहेत.  

Web Title: Third party needs to be treated with dignity and respect: Savitribai flowers speech!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.