भूमिका - आत्महत्या करून पाण्याचा प्रश्न सुटणार आहे थोडाच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 04:02 AM2019-02-18T04:02:53+5:302019-02-18T04:03:07+5:30

महापालिकेच्या महासभेत प्रभागातील पाणी समस्येबाबत समाधान न झाल्याने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा इशारा देण्याची वेळ नगरसेविका साखराबाई बगाडे यांच्यावर आली

Role - will the question of suicide be eliminated? | भूमिका - आत्महत्या करून पाण्याचा प्रश्न सुटणार आहे थोडाच?

भूमिका - आत्महत्या करून पाण्याचा प्रश्न सुटणार आहे थोडाच?

Next

पंढरीनाथ कुंभार, भिवंडी

महापालिकेच्या महासभेत प्रभागातील पाणी समस्येबाबत समाधान न झाल्याने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा इशारा देण्याची वेळ नगरसेविका साखराबाई बगाडे यांच्यावर आली. ही अत्यंत लाजिरवाणी घटना आहे. वारंवार निवडून येणाºया गोल्डन गँगला सांभाळणाºया पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांनी नगरसेविकेचे इशारा देणारे पत्र फारसे मनावर घेतले नाही. त्यामुळे संताप अनावर झाल्याने भाजपा नगरसेविकेने महापालिका इमारतीच्या तिसºया मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा इशारा दिला. लागलीच सभागृह सोडून आत्महत्या करण्यासाठी त्या तरातरा निघाल्या. मात्र संतापाने व आत्महत्या करण्याच्या विचाराने त्यांचा रक्तदाब वाढल्याने चक्कर येऊन त्या रस्त्यात कोसळल्या. एका लोकप्रतिनिधीची जर भिवंडी शहरात ही अशी केविलवाणी अवस्था असेल तर सामान्य माणूस महापालिकेच्या कारभारापुढे किती हतबल असेल, याची कल्पनाच करवत नाही. मूळात आत्महत्या करणे हा गुन्हा आहे हे नगरसेवकपदावरील व्यक्तीला माहित हवे. काहीही असो मात्र या घटनेमुळे मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचे धिंडवडे निघाले आहेत.

महापालिका अधिकारी जसे मस्तवाल आहेत तसेच नगरसेवकांचा बेकायदा नळ जोडण्यांकरिता अधिकाºयांवर दबाव असतो. बºयाच नगरसेवकांनी आपल्या प्रभागात मनमानी करीत मुख्य जलवाहिनीतून जोडणी केली आहे. त्यामुळे काही प्रभागात जास्त वेळ पाणीपुरवठा होतो. एका नगरसेवकाने मनपाची परवानगी नसताना पालिकेचे पाईपलाइन स्वखर्चाने आणून त्याची नियमबाह्य जोडणी केली. वरिष्ठांनी आदेश देऊनही उप अभियंत्यांनी त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली नाही. एका नगरसेवकाने जबरदस्तीने अनधिकृत इमारतीत पाणीपुरवठा केला तर महापालिका क्षेत्रात विकास दर भरून नव्याने बांधलेल्या अधिकृत इमारतींना पाणीपुरवठा झालेला नाही. अशा नगरसेवकांवर कारवाई करण्याऐवजी पाणीपुरवठा अधिकारी त्यांच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत. ज्या ठिकाणी गरज आहे तेथे पाणीपुरवठा केला जात नाही. काही ठिकाणी अधिकारी वर्ग नगरसेवकांमध्ये पाण्यावरुन भांडणे लावून देतात.

भिवंडीला स्टेमकडून ७८ एमएलडी, मुंबई महापालिकेकडून ३५ एमएलडी व भिवंडी महापालिकेकडून २ एमएलडी असा ११५ एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. या पाणीपुरवठ्याचे नियोजन नसल्याने काही ठिकाणी पाण्याची लूट सुरु आहे तर काही ठिकाणी घोटभर पाण्याकरिता लोक तहानलेले आहेत. शहरातील डार्इंग, सायझिंग त्याच प्रमाणे सर्व्हीस सेंटरमध्ये अनधिकृत पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु कोणतीही ठोस कारवाई होत नाही. त्याचा फटका इतरांना बसत आहे. या पाणी टंचाईवर टँकरलॉबी पोसली जात आहे. दरवर्षी कोट्यवधी रूपये खर्च होऊन देखील अनेक ठिकाणचा पाणी प्रश्न निकाली काढण्यात महापालिकेच्या कार्यकारी अभियंता व उप अभियंत्यांना अपयश आले आहे. केवळ योजना राबवण्यासाठी पालिकेचा निधी खर्च करायचा व बिल निघाल्यानंतर त्या योजना धूळ खात ठेवायच्या,असा कारभार गेल्या काही वर्षापासून पालिकेत सुरू आहे.

ज्या साठे नगरमधील नागरिकांसाठी नगरसेविकेने आत्महत्या करण्याचा इशारा दिला त्या ठिकाणी दलित वस्ती सुधार समिती व दारिद्र्य रेषेखालील वस्ती योजनेंतर्गत आजतागायत कोट्यवधी रूपये खर्च केले आहेत. शहरातील गायत्रीनगर व रामनगर भागातही कोट्यवधी रूपये खर्च केले आहेत. परंतु या दोन्ही ठिकाणी पाणी समस्या कायम आहे. या वरून पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी कसे नियोजन करतात हेच दिसून येते. नगरसेविकेच्या धमकीनंतरही मनपा आयुक्त मनोहर हिरे यांनी पाणीपुरवठा विभागातील बेजबाबदार अधिकाºयांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे शहरात संताप व्यक्त केला जात आहे.
महापालिकेच्या कामाचे नियोजन व्हावे व नागरिकांना नियमीत सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी शासनाकडून आलेल्या अधिकाºयांना काम करू दिले जात नाही. तर सर्व व्यवहार प्रभारी अधिकाºयांकडून हाकला जात आहे. याबाबत शासनाने पालिका अधिकाºयांना जाब विचारलेला नाही. हे सर्व नगरसेवकही खपवून घेत असल्याने त्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा प्रभारींना असल्याचे वारंवार दिसून आले आहे. वारंवार मागणी करूनही पाणीपुरवठा, मलनि:स्सारण, नगरविकास विभाग यांनी मुख्य कार्यालयांत आपल्या कामाबाबतचे व कार्यक्षेत्राचे नकाशे लावलेले नाहीत. शहरात ५२ आरसीसी रस्ते बनवण्यास घेतले आहेत.

भाजपाच्या नगरसेविका साखराबाई बगाडे यांनी त्यांच्या प्रभागातील पाणीटंचाईचा प्रश्न सुटत नसल्याने अलीकडेच चक्क महापालिका इमारतीच्या तिसºया मजल्यावरुन आत्महत्या करण्याचा इशारा दिला. भिवंडी शहरात लोकप्रतिनिधींची अवस्था इतकी केविलवाणी असेल तर सर्वसामान्यांची काय पत्रास? या घटनेने महापालिका प्रशासन व पाणीपुरवठा विभागाच्या अब्रूचे धिंडवडे निघाले आहेत.
 

Web Title: Role - will the question of suicide be eliminated?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.