आरटीई प्रवेशासाठी ९५५ पालकांची शाळेकडे पाठ
By admin | Published: April 21, 2017 12:01 AM2017-04-21T00:01:51+5:302017-04-21T00:01:51+5:30
उच्च दर्जाचे शिक्षण देणाऱ्या जिल्ह्यातील ८०८ शाळांमध्ये २५ टक्के आरक्षणात १६ हजार ४५५ विद्यार्थ्यांना नर्सरीपासून ते
सुरेश लोखंडे , ठाणे
उच्च दर्जाचे शिक्षण देणाऱ्या जिल्ह्यातील ८०८ शाळांमध्ये २५ टक्के आरक्षणात १६ हजार ४५५ विद्यार्थ्यांना नर्सरीपासून ते पहिलीपर्यंत मोफत प्रवेश दिला जात आहे. आतापर्यंत सुमारे चार हजार १८३ बालकांचे प्रवेश झाले. मात्र, सुमारे ९५५ विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी संबंधित पालक या शाळांकडे फिरकलेच नसल्याचे निदर्शनास आले आहे.
उच्चभ्रू कुटुंबातील मुले शिक्षण घेत असलेल्या सीबीएसई, एसएससी आदी बोर्डांच्या खाजगी शाळांमध्ये मागासवर्गीय, दुर्बल व वंचित घटकांतील मुलांना शिक्षण हक्काखाली (आरटीई) आठवीपर्यंतचे शिक्षण मोफत दिले जात आहे. या गरिबांच्या मुलांनादेखील या उच्चभ्रू कुटुंबातील मुलांसोबत शिकता यावे, म्हणून त्यांच्या शाळांमध्ये २५ टक्के आरक्षणातून गरिबांच्या मुलांना प्रवेश देणे सक्तीचे केले आहे. आतापर्यंतच्या तिसऱ्या फेरीअखेर जिल्ह्यातील चार हजार १८३ बालकांचे प्रवेश झाले आहेत. परंतु, संबंधित विद्यार्थ्यांचे सुमारे ९५५ पालक दिलेल्या शाळांत गेलेच नसल्याचे दिसले. पालकांच्या उदासीनतेमुळे किंवा त्यांच्या अज्ञानामुळे दिलेल्या शाळेत पालक न गेल्यामुळे ९५५ विद्यार्थी या प्रवेशावाचून वंचित आहेत.
सध्या तिसऱ्या फेरीचे प्रवेश शाळांमध्ये घेतले जात आहेत. २८ एप्रिलपर्यंत संबंधित पालकांना दिलेल्या शाळांमध्ये जाऊन पाल्याचा प्रवेश घेता येणार आहे. या तिसऱ्या फेरीत एक हजार ९२६ बालकांचे प्रवेश होणार आहेत. आतापर्यंत ७३४ प्रवेश झाले असून २२ बालकांचे प्रवेश विविध कारणांखाली नाकारले आहेत. उर्वरित २९७ बालकांनी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतल्यामुळे ते या फेरीत मिळालेल्या शाळांमध्ये प्रवेश घेऊ शकले नाहीत. तर, ८८१ बालकांचे वडील शाळेत प्रवेशासाठी गेलेच नाही. यामुळे त्यांचे अद्याप प्रवेश झाले नाही. या पालकांना आताही शाळेत जाऊन पाल्याचे प्रवेश घेता येतील.
या प्रवेशाच्या पहिल्या टप्प्यात तीन हजार ४५० प्रवेश झाले आहेत. तर, या दुसऱ्या टप्प्यात ६१३ शाळांमध्ये एक हजार ९२६ मुलांचे प्रवेश निश्चित झाले होते. त्यापैकी आतापर्यंत ३२४ प्रवेश झाले. चार विद्यार्थ्यांचे प्रवेश वेगवेगळ्या कारणांखाली नाकारण्यात आले असता ७१ पालक शाळेत जाऊन प्रवेश घेऊ शकले नाहीत.