मीरा-भाईंदरच्या क्लस्टरकडे दुर्लक्ष, मतदारांना विचार करायला लावणारं काम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 03:12 AM2019-04-04T03:12:57+5:302019-04-04T03:13:44+5:30

मागील वचननाम्यातील ही आश्वासने पूर्ण करण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

Ignore the cluster of Mira-Bhayander | मीरा-भाईंदरच्या क्लस्टरकडे दुर्लक्ष, मतदारांना विचार करायला लावणारं काम

मीरा-भाईंदरच्या क्लस्टरकडे दुर्लक्ष, मतदारांना विचार करायला लावणारं काम

Next

ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात आता शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, अशी थेट लढत होण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांचा सामना करण्याकरिता राष्ट्रवादीने आनंद परांजपे यांना रिंगणात उतरवले आहे. पाच वर्षांपूर्वी विचारे यांनी जाहीर केलेला आपला वचननामा पूर्ण करण्याकडे लक्ष दिले असले, तरी ठाण्यासह मीरा-भार्इंदर आणि नवी मुंबईच्या पाण्याच्या प्रश्नाकडे त्यांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले आहे. तसेच मीरा-भार्इंदर आणि नवी मुंबईतील क्लस्टरची योजना पुढे सरकू शकलेली नाही.

मागील वचननाम्यातील ही आश्वासने पूर्ण करण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. शिवाय, महापालिकांची कामे ही आपली कामे म्हणून खपवण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. मागील निवडणुकीत विचारे यांच्यासमोर राष्टÑवादीचे संजीव नाईक यांचे आव्हान होते. परंतु, त्यांचा पराभव झाला. विचारे यांना २०१४ च्या निवडणुकीत पाच लाख ९५ हजार ३६४ मते मिळाली होती, तर नाईक यांना तीन लाख १४ हजार ६५ मते मिळाली होती. आता पुन्हा विचारे हे मैदानात उतरले असून त्यांच्यासमोर राष्टÑवादीच्या परांजपे यांचे आव्हान आहे.

निवडणुकीत काही उमेदवार आपला वचननामा अथवा जाहीरनामा जाहीर करतात. विचारे यांनी ठाण्यातील सुशिक्षित मतदारांना आकर्षित करण्याकरिता आपला वैयक्तिक वचननामा मांडला होता. आता पुढील ५ वर्षांसाठी विचारे कोणती नवी आश्वासने देतात व त्यांच्या पूर्ततेसाठी काय करतात, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागणार आहे.

दिलेली आश्वासने
ठाण्यासह मीरा-भार्इंदर आणि नवी मुंबईचा पाणीप्रश्न सोडवला जाईल. त्यातही नवी मुंबईसाठी २४ तास पाण्याची सेवा उपलब्ध करून दिली जाईल.

मीरा-भार्इंदरमधील कचऱ्याचा प्रश्न सोडवतानाच डम्पिंगचाही प्रश्न सोडवला जाईल.

ठाण्यासह मीरा-भार्इंदर आणि नवी मुंबईत क्लस्टर योजना राबवण्यासाठी प्रयत्न करणार.

वस्तुस्थिती
ठाण्यासह मीरा-भार्इंदर आणि नवी मुंबईचा पाणीप्रश्न आजही सुटू शकलेला नाही. नवी मुंबई महापालिकेत २४ तास पाणीपुरवठा करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू आहे. परंतु, अद्याप ती योजना पुढे सरकू शकलेली नाही.

मीरा-भार्इंदरमधील कचऱ्याचा प्रश्न आजही आ वासून उभा आहे. डम्पिंगच्या प्रश्नाचेही तसेच भिजत घोंगडे पडले आहे.

ठाण्यात क्लस्टरचा प्रश्न टप्प्याटप्प्याने मार्गी लागला आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात सहा भागांचा बायोमेट्रीक सर्व्हे सुरू झाला आहे. परंतु, मीरा-भार्इंदर आणि नवी मुंबईत ही योजना अद्यापही सुरू झालेली नाही.

भूमिका
मी माझ्या वचननाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी १०० टक्के प्रयत्न केलेले आहेत. परंतु, पाच वर्षांत सर्वच आश्वासने पूर्ण होऊ शकत नाहीत. त्यामुळे पुढील पाच वर्षांत शिल्लक राहिलेली कामे पूर्ण करण्यावर भर दिला जाईल. तसेच नवीन कामेसुद्धा हाती घेतली जातील. महापालिका ही राज्य आणि केंद्राचे अंग असून महापालिकेत अनेक योजना या केंद्र आणि राज्य सरकारकडूनच येत असतात. त्यामुळे त्या पूर्ण करण्यासाठीसुद्धा प्रयत्न खासदाराकडून होत असतात.
- राजन विचारे,
उमेदवार ठाणे लोकसभा, शिवसेना


आक्षेप
वचननाम्यात दिलेली ९० टक्के कामे पूर्ण केलेली नाहीत. जी कामे महापालिकेशी निगडित असतात, जी नगरसेवकांनी पूर्ण करायची असतात, त्या कामांचा उल्लेख वचननाम्यात करण्यात आलेला आहे. वास्तविक पाहता खासदाराची कामे काय असतात, हे आधी समजून घेणे गरजेचे आहे.
- आनंद परांजपे, उमेदवार ठाणे लोकसभा, राष्ट्रवादी काँग्रेस

Web Title: Ignore the cluster of Mira-Bhayander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.