...त्यांचा काळही आला होता आणि वेळही!
By admin | Published: August 8, 2016 02:21 AM2016-08-08T02:21:01+5:302016-08-08T02:21:01+5:30
दुर्घटना घडली, त्या इमारतीच्या मालकाला दररोज सकाळी साडेसहाच्या दरम्यान कुत्र्याला फिरायला घेऊन जाण्याची सवय होती. तसेच ते रविवारी सकाळीही गेले
दीपक देशमुख , वज्रेश्वरी
दुर्घटना घडली, त्या इमारतीच्या मालकाला दररोज सकाळी साडेसहाच्या दरम्यान कुत्र्याला फिरायला घेऊन जाण्याची सवय होती. तसेच ते रविवारी सकाळीही गेले, तेव्हा ते परतत असताना इमारत थोडी कलत असल्याचे खाली उभ्या असलेल्या रहिवाशांनी त्यांना सांगितले आणि त्यांनी सज्जन गुप्ता यांना वर जाण्यापासून रोखले. पण, पत्नी वर झोपली आहे. तिला घेऊन येतो आणि इमारतीची कागदपत्रे आणतो, असे सांगून ते त्याही स्थितीत वर गेले आणि लगेचच इमारत कोसळली. पत्नीसह त्यांचाही मृत्यू झाला... त्यांचा काळही आला होता आणि वेळही...
अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या महादेव इमारतीचे मालक स्वत: गवंडीकाम करीत असत आणि ३५ वर्षांपूर्वी त्यांनी स्वत: ही इमारत बांधली होती. ती इमारत अनधिकृत होती आणि इमारतीत मालकासह १० कुटुंबे राहत होती. तळ मजल्यावर चार दुकाने होती. ही इमारत रिकामी करण्याची नोटीस पालिका २०१४ पासून देत होती. अखेरीस या वर्षी जूनमध्ये ती अतिधोकादायक जाहीर करून तिचे वीज-पाणी तोडण्यात आले होते.
पागडी पद्धतीने भाडेकरू राहत असल्याने घरांवर मालकी हक्क असल्याचा त्यांचा दावा होता. त्यासाठी घरे सोडण्यापूर्वी त्यांना तशी कागदपत्रे हवी होती. पण, इमारतीच्या मालकीवरून भाऊबहिणींत वाद असल्याने सज्जन गुप्ता तसे एकतर्फी लिहून देण्यास तयार नव्हते. त्यातून तोडगा काढण्यासाठीच शुक्रवारी मालक-भाडेकरूंची मीटिंग झाली होती. त्यात बांधकाम खर्चापोटी प्रत्येक चौरस फुटाला १२०० रुपयांचा भाव मालकाने सांगितला. तो भाडेकरूंनी मान्यही केला आणि रविवारी घरे सोडण्याचे ठरवण्यात आले. पण, घरे सोडण्यापूर्वीच घात झाला...
मालक-भाडेकरूंच्या वादात दुसऱ्या भागातील काही भाडेकरूंनी पर्यायी घरे शोधली, काही शोधत होते. मात्र, जो भाग रविवारी कोसळला, त्यातील ठाकूर कुटुंबही घर शोधत होते. पण, त्यांना हवे तसे घर मिळाले नव्हते. त्यापूर्वीच काळाने त्या पूर्ण कुटुंबावर झडप घातली, असे ठाकूर यांचा चुलत भाऊ जितेंद्र राजपूत याने सांगितले. संबंधित वृत्त/५