स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध भिलारवर चढले ‘पुस्तकाच्या गावा’चे रंग
By admin | Published: April 21, 2017 12:00 AM2017-04-21T00:00:52+5:302017-04-21T00:00:52+5:30
पुस्तकांची आकर्षक मुखपृष्ठे घरांच्या भिंतीवर साकारली... वाचनानंद घेण्याचे संदेश दर्शनी भागात झळकले... लेखक, ग्रंथकार यांची चित्रे अक्षरश: जिवंत झाली...
ठाणे : पुस्तकांची आकर्षक मुखपृष्ठे घरांच्या भिंतीवर साकारली... वाचनानंद घेण्याचे संदेश दर्शनी भागात झळकले... लेखक, ग्रंथकार यांची चित्रे अक्षरश: जिवंत झाली...स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असलेले भिलार गाव अवघ्या ३६ तासांत रंगात भिजले आणि ‘पुस्तकांचे गाव’ अशी नवी ओळख सांगू लागले.
तब्बल ७५ नामवंत कलाकारांनी २५ घरांवर ११ हजार चौ. फूट चित्रे काढून ही किमया केली. त्यामध्ये ४० कलाकार हे ठाण्यातील होते. गाव रंगवण्याच्या या कामात गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला.
महाराष्ट्र शासनाच्या ‘पुस्तकांचे गाव’ या उपक्रमासाठी मराठी भाषा विकास संस्थेने पर्यटन नकाशावरील स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असलेल्या भिलार गावाची निवड केली होती. मराठी भाषा आणि वाचनसंस्कृती वाढावी, या उद्देशाने गावातील काही घरांमध्ये एकेका विषयानुरूप पुस्तके ठेवण्यात येणार आहेत. आलेल्या पर्यटकांसाठी ही एक पर्वणी असणार आहे. या सर्व घरांना त्यांच्या साहित्यिक विषयानुरूप ओळखता यावे, याकरिता भिलार गावातील २५ घरे रंगवण्याचा निर्णय झाला.
नेहमीप्रमाणे पाट्या न लावता घराची भिंतच चित्रमय झाली, तर दुरूनही ती दृष्टीला येईल, अशी कल्पना पुढे आली आणि मग कलाकारांची निवड प्रक्रिया सुरू झाली. महाराष्ट्रातील कलाकारांना व्हॉट्सअॅप संदेश ‘स्वत्व’ संस्थेने पाठवले. त्याला शंभरहून अधिक कलाकारांनी प्रतिसाद दिला. विजयराज बोधनकर, महेश आंजर्लेकर, शशिकांत झगडे, चंद्रकांत हुळवळे, रवी चव्हाण, हंसोज्ञेय तांबे, अमेय म्हात्रे, सुधीर उदगीरकर आणि सदाशिव कुलकर्णी हे ज्येष्ठ व्यावसायिक कलाकार आणि कलाशिक्षक स्वत:हून या उपक्र मात सहभागी झाले.
७५ कलाकारांच्या संचासह ‘स्वत्व’चे कार्यकर्ते १४ तारखेला भिलार येथे पोहोचले आणि हा उपक्रम पूर्णत्वास नेला. विविध व्यावसायिक, गृहिणी, रचना संसदचे २० आणि अॅमिटीचे कला विद्यार्थी यांनीही या उपक्रमास हातभार लावला.
भिलार ग्रामस्थांचा प्रेमळ पाहुणचार, उपक्रमाबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन आणि आपलेपणा थक्क करणारा होता, असे कलाकारांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य भाषा संवर्धन संस्थेकडून या उपक्र माला संपूर्ण सहकार्य लाभले. ‘स्वत्व’च्या अॅड. स्वाती दीक्षित आणि आर्किटेक्ट श्रीपाद भालेराव यांनी विनोद शर्मा यांच्यासह नियोजन केले. ही ‘पुस्तकांचे गाव योजना’ नक्कीच यशस्वी होईल, अशी आशा ‘स्वत्व’ने व्यक्त केली. (प्रतिनिधी)