हजारेंच्या सहमतीनंतर धरणग्रस्तांचा बहिष्कार
By admin | Published: September 23, 2014 12:10 AM2014-09-23T00:10:15+5:302014-09-23T00:10:15+5:30
मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या काळू धरणामुळे सुमारे ४१ गावपाड्यांना जलसमाधी मिळणार आहे.
ठाणे : मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या काळू धरणामुळे सुमारे ४१ गावपाड्यांना जलसमाधी मिळणार आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी एकाही राजकीय पुढाऱ्याने अद्याप या गावकऱ्यांची बाजू मांडली नाही. यामुळे या विधानसभा निवडणुकीवरदेखील बहिष्कार टाकण्याचा निर्णय ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी चर्चा केल्यानंतरच ग्रामस्थांनी घेतल्याचे उघड झाले .
मुरबाड तालुक्यातील काळू नदीवर बांधण्यात येणाऱ्या या धरणाचे संपूर्ण पाणी मुंबई महानगरपालिकेला जाणार आहे. परंतु, मागील काही वर्षांपासून सुमारे ४१ गावपाड्यांनी तीव्र विरोध करून या धरणाचे काम थांबवले आहे. लोकसभा निवडणुकीवरदेखील सुमारे १८ हजार लोकसंख्येच्या १९ गावांमधील गावकऱ्यांनी बहिष्कार टाकला होता. त्याची पुनरावृत्ती करून या विधानसभा निवडणुकीवरदेखील या गावकऱ्यांनी निर्धार कायम ठेवून बहिष्कार टाकला आहे. या निर्धारापूर्वी या गावांच्या शिष्टमंडळाने राळेगण सिद्धी येथे जाऊन अण्णा हजारे यांची भेट घेऊन बहिष्कार टाकत असल्याचे त्यांना सांगितले आहे़
अण्णांना भेटलेल्या शिष्टमंडळात काळू धरणविरोधी शेतकरी, कष्टकरी व भूमिहीन समुदाय मंचचे कृष्णकांत तेलम, पोपटराव देशमुख, भगवान भला, आत्माराम देशमुख, सदाशिव देशमुख, अशोक पठारे, सुरेश देशमुख, दशरथ देशमुख, प्रवीण देशमुख, रमेश राऊत आदी गावकऱ्यांचा समावेश होता.
या वेळी त्यांनी काळू धरण बांधण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना जबरदस्तीने धरणाचा घाट घातला जात आहे. याशिवाय, ४१ गावपाड्यांच्या सर्व ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन या धरणाला विरोध दर्शवला आहे. यानंतर, तळेगाव, जडई, फांगळोशी, खुटळ, चासोळे, दिघेफळ, शिवेचीवाडी, खरशेत, उंबरोली, कुंदाचीवाडी, लाहाडी, भिकारवाडी, शिरसोनवाडी, भट्टीची वाडी, पायरवाडी, वाकळवाडी, न्याहाडी आदी गावांच्या गावकऱ्यांनी तळेगाव येथे एकत्र येऊन बैठक घेतली आणि मतदानावर बहिष्कार टाकला.