फाटक्या झालेल्या केडीएमसीचा परिवहन उपक्रमाला टेकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 12:43 AM2018-10-22T00:43:58+5:302018-10-22T00:44:01+5:30

डोंबिवलीला स्मार्ट शहरे बनविण्याचा संकल्प असला, तरी सध्याची परिस्थिती सुधारली तरी खूप आहे, असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

 Backed KDMC's transport initiative | फाटक्या झालेल्या केडीएमसीचा परिवहन उपक्रमाला टेकू

फाटक्या झालेल्या केडीएमसीचा परिवहन उपक्रमाला टेकू

googlenewsNext

कल्याण-डोंबिवलीला स्मार्ट शहरे बनविण्याचा संकल्प असला, तरी सध्याची परिस्थिती सुधारली तरी खूप आहे, असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. शहरात धड रस्ते नाहीत. कुठे पाणीटंचाई, तर कुठे धुळीचे साम्राज्य असूनही नागरिक कर देत आहेत. आधीच केडीएमसीकडे निधी नसल्याने ती केडीएमटीला टेकू तरी कसा देणार, असा सवाल केला जात आहे. यासाठी आधी केडीएमसीची परिस्थिती सुधारणे गरजेचे आहे.
आजच्या घडीला कल्याण- डोंबिवली महापालिकेची परिवहन सेवा सर्वस्वी पालिकेच्या अनुदानावर अवलंबून आहे. २०१४ च्या सरकारी आदेशानुसार ज्या परिवहन संस्थाच्या संचलनात जी तूट होते ती संबंधित महापालिकेने भरून काढली पाहिजे असा नियम आहे. परंतु महापालिकेचीच आर्थिक स्थिती फारशी आलबेल नसल्याने आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार अशी परिस्थिती आहे.
परिवहन उपक्रमाला सध्या दरमहा होणारा वाढीव आणि प्रलंबित राहणारा खर्च तीन कोटी ५९ लाख इतका आहे. १९९९ पासून ते आजतागायत ६४ कोटी ३४ लाख रूपये इतका तोटा उपक्रमाला सहन करावा लागला आहे. कर्मचारी थकीत देणी ३२ कोटी ९२ लाख रूपये इतकी आहे. प्रवासी थकीत कर ११ कोटी ५० लाख आणि थकीत पथकर तीन कोटी असे सरकारला द्यायचे आहेत. कंत्राटदाराची आठ कोटी सात लाख रूपये देणी आहे. घसारा थकीत रक्कम एक कोटी ५० लाख तर भांडवली खर्चाचा आढावा घेता अन्य कंत्राटदार प्रलंबित व देयके असे सात कोटी ३५ लाख देणे आहे. महापालिकेकडे दर महिन्याला वेतनासाठी साकडे घालावे लागते मात्र अनुदान वेळेवर मिळत नसल्याने वेतनाची बोंब सातत्याने असते. त्यातच दिवसाला साडेतीन हजार लिटर डिझेल उपक्रमाला लागते. महापालिकेची वाहनेही त्यावर अवलंबून असतात. उपक्रमाला मिळणारे उत्पन्न आणि होणारा खर्च यात तफावत असल्याने याचा फटका उपक्रमाला बसून तेथील आर्थिक स्थिती पुरती डबघाईला गेली आहे.
>मोडकळीस आलेली कार्यालये
परिवहन उपक्रमाची २८ ठिकाणी आरक्षण आहेत. परंतु यातील गणेशघाट, वसंतव्हॅली आणि खंबाळपाडा आगार वगळता अन्य कुठलीही आरक्षित जागा परिवहनच्या ताब्यात नाही. आजच्या घडीला केवळ गणेशघाट आगार कार्यरत असून उपक्रमाच्या सर्व बसचे संचलन याठिकाणाहून होत आहे. परंतु आगाराच्या व्यवस्थेकडे पुरते दुर्लक्ष झाल्याने आजमितीला दुरवस्थेतील आगार आणि मोडकळीस आलेली कार्यालये हे चित्र आगारांमधील आहे.
खंबाळपाडा आगार कार्यान्वित करण्यासंदर्भात वारंवार ठराव मंजूर झाल्यानंतर विलंबाने का होईना आगाराच्या विकासाला प्रारंभ झाला खरा, परंतु निधीअभावी हे काम सद्यस्थितीला पुरते रखडले आहे. खंबाळपाडा आगाराचा आढावा घेता या ठिकाणी कचºयाच्या गाड्यांनी अतिक्रमण केले आहे. या गाडया तात्काळ हटवा असे परिवहन सदस्यांकडून सातत्याने प्रशासनाला सांगूनही याबाबत कार्यवाही झालेली नाही.
त्यामुळे नव्याने दाखल होणाºया बस ठेवायच्या कुठे? असा सवाल उपस्थित होत आहे. वेळप्रसंगी मेट्रो मॉलचा आधार घ्यावा लागला आहे. तेथील बसही संचलनअभावी धूळखात आहेत. आलटून पालटून बस चालविण्यात येतात असा दावा उपक्रमाकडून केला जात असलातरी आगाराअभावी संचलनावर परिणाम झाला आहे. खंबाळपाडा आगाराच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष झाल्याने या आगाराला एकप्रकारे डम्पिंगचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
पूर्वी २७ गावांमधील कचरा याठिकाणी एकत्रित गोळा केला जायचा. तेथून तो कचºयाच्या गाडयांमधून आधारवाडी येथे नेला जायचा. आज पुरेसा वीजपुरवठा नसणे, पिण्याच्या पाण्याची सुविधा नसणे यामुळे येथे तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाºयांचेही हाल होत आहेत. कल्याणमधील खडकपाडा परिसरातील वसंतव्हॅली मधील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आगाराची स्थिती फारशी वेगळी नाही. गणेशघाट आगाराची पुरती दुरवस्था झाली आहे. मोठया संख्येने बस या आगारात उभ्या केल्या जात असल्याने बस बाहेर काढताना गोंधळ उडतो.
रात्रीच्या वेळेस या ठिकाणी काहीवेळेस वीज नसते, त्यामुळे अंधाराचे साम्राज्य असते. परिणामी, रात्रपाळीत वर्कशॉपच्या कामात अडथळा येतो. तब्बल ११ लाख खर्चून सोलर दिवे लावण्यात आले, परंतु देखभाल दुरुस्तीअभावी ते निरुपयोगी ठरले आहेत. आगारातील कार्यालये मोडकळीस आली असून, येथील स्वच्छतागृहे, रेकॉर्डरूमची दुरवस्था झाली आहे. कार्यालयांमध्ये घुशी आणि उंदरांचा सतत वावर असल्याने कर्मचाºयांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.
आगाराला लागूनच नाला असल्याने येथे सापांचाही वावर असल्याचे कर्मचारी सांगतात. कर्मचाºयांच्या विश्रामगृहातील पंखे बंद, दिव्यांचा पुरेसा प्रकाश नाही, अंथरायला चटई नाही, पावसाळ्यात गळके छप्पर असल्याने कर्मचाºयांचीही परवड होते. सुसज्ज कार्यशाळा नसणे हेही बसच्या नादुरुस्तीचे कारण असून टायर, सुटे भाग विखुरलेले आहेत.
>‘त्या’ ठरल्या नुसत्या ‘बाता’च
कंत्राटी पद्धतीने आउट सोर्सिंगच्या माध्यमातून भरती केली जाईल. कुठलीही परिवहन व्यवस्था नफ्यात नाही, परंतु प्रवाशाांना सुविधा मिळाव्यात ही अपेक्षा आहे. त्यासाठी बेंगळुरूच्या धर्तीवर रॉयल्टी पध्दतीने काही प्रवासी मार्ग चालवण्यात येतील, दुरवस्थेचे चित्र लवकरच बदलेल, परिवहनच्या थांब्यांवर काही ठिकाणी रिक्षांचे अतिक्रमण झाले ही वस्तुस्थिती असली, तरी या संदर्भात वाहतूक शाखांना पत्र पाठवून त्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.त्यामुळे जवळच्या काळात ही परिस्थिती बदलेल यात दुमत नाही. सुसज्ज कार्यशाळेसह आगार उभारण्याचे काम गणेशघाटसह खंबाळपाडा या ठिकाणी केले जाणार आहे. डोंबिवलीहून सुटणाºया सर्व बसचे संचलन सद्यस्थितीला कल्याणातील गणेशघाट आगारातून होत आहे, परंतु लवकरच ते खंबाळपाडा आगारातून केले जाणार आहे. या आगारातील कचºयाच्या गाडया अन्यत्र हलविण्याच्या सूचना महापालिकेला देण्यात आल्या
आहेत. त्याची अंमलबजावणी तातडीने होणार आहे. गणेशघाट, खंबाळपाडा, वसंतव्हॅली आणि काटेमानिवली याठिकाणचे आगार यंत्रसामग्रीसह सुसज्ज केले जाणार असून, जेएनएनयूआरएम योजनेतंर्गत दाखल होणाºया उर्वरित बसही लवकरच येणार असल्याने लवकरच उपक्रमाला सुगीचे दिवस येतील यात शंका नाही. अशा अनेक वल्गना उपक्रमातील तसेच महापालिकेच्या पदाधिकारी आणि अधिकाºयांकडून याआधी करण्यात आल्या आहेत. परंतु सद्यस्थिती पाहता त्या वल्गना केवळ बाता ठरल्या आहेत.
>परिवहनचे थांबेही दुर्लक्षित
देखभाल दुरूस्तीअभावी आगारातील व्यवस्थेचा बोजवारा उडाला असताना बसथांबेही पूर्णपणे दुर्लक्षित झाले आहेत. बस वेळेत न येणे, अर्ध्या रस्त्यात बंद पडणे यासारखी दुखणी प्रवाशांच्या पाचवीला पुजलेली असताना त्यात भर म्हणून बसथांबेही सुस्थितीत नाहीत. कल्याण डोंबिवलीचा आढावा घेता बहुतांश बसथांबे निरूपयोगी ठरले आहेत. काहीठिकाणी रिक्षांनी अतिक्रमण केले आहे. डोंबिवली पश्चिमेकडील स्थानक परिसरातील टपºया हटवून त्याठिकाणी बसथांबा उभा केला आहे. परंतु त्याठिकाणी रिक्षातळाने अतिक्रमण केले आहे. काही थांब्याचा वापर कपडे वाळत घालण्यासाठी केला जात असून तर काहीठिकाणी थांब्यासमोरच कचºयाचे ढीग जमा होत असल्याने ते गैरसोयीचे ठरत आहेत. कंत्राटदाराकडून जे थांबे रस्तारूंदीकरणात बाधित झाले आहेत ते नवीन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
>या कारणांमुळे उपक्रमाला लागली ‘घरघर’, आगाराच्या विकासासाठी निधी नाही
जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत १८५ बस मंजूर झाल्या, परंतु महापालिकेने बस खरेदीसाठी आपल्या दायित्वावी हिश्यापोटीची पुरेशी रक्कम उपलब्ध करून न दिल्याने ६७ बस सरकारकडे परत गेल्या.
गणेशघाट, खंबाळपाडा आणि वसंत व्हॅली हे आगार विकसित करून देणार, अशी हमी बस खरेदी करताना केंद्र सरकारला दिली होती, परंतु निधी उपलब्ध करून दिला नसल्याने आगारांचा विकास झाला नाही.
पर्याय त्रासदायक ठरू नये
उपक्रमाला खाजगीकरणाशिवाय पर्याय नसला, तरी मागील अनुभव पाहता त्या पर्यायाचा त्रास होणार नाही हे पाहणेही मह्त्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या अटी-शर्थीनुसारच खासगी संस्थेने सेवा देणे गरजेचे आहे. उपक्रम ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर सद्यस्थितीला चालविला जात असला, तरी प्रवाशांना चांगली सेवा मिळणे हा आमचा अग्रक्रम पुढेही कायम राहील
- विनीता राणे, महापौर
तेजस्विनी महिला चार बसच्या खरेदीसाठी सरकारकडून एक कोटी २८ लाखांचा निधी आला. परंतु पाच वेळा निविदा काढूनही प्रतिसाद मिळाला नाही. कार्यरत बससाठी आवश्यक अशा सरकारी धोरणानुसार कंत्राटी पध्दतीवरील चालक-वाहक, कारागिर, कर्मचारी उपलब्ध होण्याबाबत चार ते पाच वेळा निविदा काढण्यात आली, परंतु त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे देखभाल दुरुस्तीसह निधींचा अभाव, कर्मचाºयांची उपलब्धता या अडचणींमुळे ताफ्यात २१८ बस असूनही मार्गावर त्या बस सक्षमतेने चालविणे जिकरीचे होऊन बसले आहे. महत्त्वाचे म्हणजे उपक्रमामध्ये कामगारांच्या चार संघटना आहेत.युनियनबाजीमुळे अनेक कर्मचारी आपल्या मर्जीनुसार सेवा बजावतात. युनियनच्या पदाधिकाºयांकडून व्यवस्थापनावर दबाव येत असल्याने बहुतांश बस चालकाविना आगारात खितपत पडून असतात. हेही

 


प्रवास असुरक्षित आणि धोकादायक
सद्यस्थितीत उपक्रमात बसचा पुरेसा ताफा असलातरी बहुतांश बस ब्रेकडाउन स्थितीत आहेत. त्यामुळे केवळ ५० ते ६० बसच रस्त्यावर धावतात. प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सुविधांपेक्षा परिवहनचा उपक्रम विविध समस्यांनी नेहमीच गाजला. देखभाल दुरुस्तीअभावी नादुरुस्त बसचा प्रश्न गंभीर बनला असताना बसना आगी लागण्याच्या घटनाही वारंवार घडल्या आहेत. त्यामुळे परिवहनचा प्रवास हा एक प्रकारे जीवघेणा ठरतो. सुसज्ज आगार आणि कार्यशाळेच्या अभावात नादुरूस्त बसचे प्रमाण वाढत असून यातूनच आगी लागण्याच्या घटना घडत असल्याचे चालकांचे म्हणणे आहे. जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत २०१३ मध्ये परिवहनच्या ताफ्यात टाटा कंपनीच्या दाखल झालेल्या बसना आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. शॉर्टसर्किटने आग लागण्याचे कारण सातत्याने पुढे केले जात असले तरी २०१५ मध्ये दोन बसनी पेट घेतला होता. त्या बसही टाटा कंपनीच्याच होत्या. एकंदरीतच आगीच्या घटनांचा आढावा घेता २८ डिसेंबर २०१३ ला कल्याण पश्चिमेकडील बैलबाजार परिसरात मलंगगड-कल्याण या बसने पेट घेतला होता. या बसमध्ये ४१ प्रवासी होते. परंतु चालक आणि वाहकाच्या प्रसंगावधनाने सुदैवाने कोणलाही दुखापत झाली नाही. ३ आॅक्टोबर २०१४ यादिवशी अंबरनाथ तालुक्यातील कुशीवली येथे केडीएमटीच्या बसला भीषण आग लागली होती या आगीत बसचा केवळ सांगाडा उरला होता. आतील प्रवासी वेळीच बसमधून बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेला महिना उलटत नाही, तोच १० नोव्हेंबर २०१४ मध्ये देखील एका बसमधून धूर आल्याची घटना शिवाजी चौकात घडली होती. हा सिलसिला पुढेही सुरूच राहिला आहे. बस गरम होऊन रस्त्यातच बंद पडतात. त्या थंड झाल्यावर पुन्हा सुरू होतात. त्यामुळे आजच्या घडीलाही प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे.

Web Title:  Backed KDMC's transport initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.