कल्याण, डोंबिवलीतील जलकुंभ बनले मद्यपींचे अड्डे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 11:48 PM2019-01-27T23:48:43+5:302019-01-27T23:49:23+5:30

कल्याण-डोंबिवली शहराला पालिकेच्या जलकुंभातून पाणीपुरवठा केला जातो. पण आज हेच जलकुंभ असुरक्षित झाले आहेत.

Alcoholic base formed in Kalyan, Dombivli, Jalakumbi | कल्याण, डोंबिवलीतील जलकुंभ बनले मद्यपींचे अड्डे

कल्याण, डोंबिवलीतील जलकुंभ बनले मद्यपींचे अड्डे

Next

कल्याण-डोंबिवली शहराला पालिकेच्या जलकुंभातून पाणीपुरवठा केला जातो. पण आज हेच जलकुंभ असुरक्षित झाले आहेत. या ठिकाणी मद्याच्या पार्ट्या झोडल्या जातात. जर एखादी व्यक्ती जलकुंभावर चढली आणि काही अनर्थ घडल्यास कोण जबाबदार. पाण्यात काही टाकल्यास नागरिकांच्या आरोग्याला धोकाही पोहचू शकतो. तेव्हा जलकुंभाच्या ठिकाणी सुरक्षारक्षक प्राधान्याने नेमण्याची गरज आहे.

मैदान, तलाव, स्मशानभूमी आणि बंद असलेली कार्यालये सुरक्षेविना ओस पडली असताना येथील जलकुंभही सुरक्षित नसल्याचे पाहयला मिळते. परिणामी कल्याणडोंबिवली शहरातील बहुतांश जलकुंभ हे मद्यपींचे अड्डे बनले असून याठिकाणी पडलेल्या दारूच्या बाटल्यांवरून याची प्रचिती येते. जलकुंभासारख्या मालमत्तांच्या सुरक्षेबाबतीतही केडीएमसी कितपत गंभीर आहे हेही एकंदरीत वास्तव पाहता स्पष्ट होते. केडीएमसीच्या बहुतांश वास्तू या वापराविना ओस पडल्या आहेत. त्यातच सुरक्षा कर्मचारी नसल्याने तेथील त्या अक्षरश: वाऱ्यावर पडल्या आहेत. त्यात मद्यपींसह गर्दुल्ले आणि प्रेमी युगुलांचे अड्डे त्याठिकाणी सर्रास सुरू आहेत. हेच चित्र कल्याण डोंबिवलीला पाणीपुरवठा करणाºया जलकुंभांच्या बाबतीतही दिसून येते.

केडीएमसीची ७८ जलकुंभ आहेत. परंतु यातील बहुतेक जलकुंभ सुरक्षेविना आहेत. याचा फायदा मद्यपींसह गर्दुल्ल्यांकडून सर्रास उठविला जात आहे. कल्याण पूर्वेकडील दादासाहेब गायकवाड क्रीडांगण मैदानाजवळीत जलकुंभ तसेच पश्चिमेकडील सुभाष मैदान नजीकचे जलकुंभ असो याठिकाणी मद्यपींचा वावर मोठया प्रमाणावर असतो.

हेच चित्र डोंबिवली पश्चिमेकडील दोन टाकी आणि देवीचापाडा, रेतीबंदर रोड भागातील जलकुंभाच्या ठिकाणीही दिसून येते. याठिकाणी संरक्षक भिंतींना लावण्यात आलेले गेटही छोटे असल्याने ते निरूपयोगी ठरलेआहे. विशेष बाब म्हणजे देवीचापाडा येथील जलकुंभाच्या परिसराची जागा वाहन पार्किंग म्हणून केली जात आहे. काही पाणीपुरवठा विभागाचे याकडे पुरते दुर्लक्ष झाले आहे. या विभागामार्फत कंत्राटी पध्दतीने सुरक्षा कर्मचारी नेमण्यात आले असले तरी ते पुरेसे नाहीत. केवळ महत्त्वाच्या जलकुंभांना सुरक्षा पुरविण्यात आली आहे. काही जलकुंभांच्या ठिकाणी रान मोठया प्रमाणावर वाढले असून काही ठिकाणी कचºयाचे साम्राज्यही पसरले आहे. केडीएमसीचे आपल्याच वास्तूंकडे दुर्लक्ष होत असल्याने या मालमत्तांचे कसे नुकसान होते आहे, ते दिसते.

कंत्राटदारावर केडीएमसीची भिस्त
अपुºया कर्मचाºयांचा फटका अन्य विभागाप्रमाणे पाणीपुरवठा विभागालाही बसत आहे. एकीकडे कर्मचारी निवृत्त होत असताना भरतीकडे दुर्लक्ष झाले आहे. खाजगी कंत्राटाच्या माध्यमातून कर्मचाºयांची पूर्तता करण्यात आली असून काही अंशी पाणीपुरवठा वितरणाचे नियोजन त्यांच्याच माध्यमातून सुरू आहे. त्यांच्यावर वॉच मात्र केडीएमसी प्रशासनाचा आहे.

२७ गावांना न्याय मिळणार कधी?
१ जून २०१५ ला २७ गावे केडीएमसीत आली, परंतु आजतागायत याठिकाणी सुविधांची बोंबाबोंब कायम आहे. याठिकाणी एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होत असला तरी वितरणाची जबाबदारी केडीएमसीची आहे. अपुरा पुरवठा पाहता २० टक्के अधिक कोटा मंजूर करण्यासाठी मंत्रालय दरबारी वारंवार बैठका झाल्या आहेत. परंतु कार्यवाही झालेली नाही. त्यात अमृत योजनेतंर्गत याठिकाणी जलकुंभ उभारणे, जुनी वितरण व्यवस्था बदलणे अशी महत्त्वपूर्ण कामे केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. अमृत योजनेतंर्गत १५५ कोटीचा निधी खर्च केला जाणार आहे. राज्य सरकार आणि केडीएमसीचा यामध्ये हिस्सा आहे. पाच कोटीची कामे करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.

त्यांच्यावर कारवाई व्हावी
सद्यस्थितीला मोठया प्रमाणावर पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असताना दुसरीकडे पाणीगळतीच्या माध्यमातून पाण्याची नासाडी होत आहे. यासंदर्भात एमआयडीसी असो अथवा केडीएमसी या दोन्ही प्राधिकरणांमधील वरिष्ठ अधिकाºयांनी गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाºयांवर कठोर कारवाई करावी जेणेकरून पाण्याची नासाडी होणार नाही असे मत कल्याण पूर्वेतील रहिवाशी मनोज वाघमारे यांनी व्यक्त केले.

केडीएमसी कोरडे पाषाण
बारवी आणि आंध्र धरणातील झपाटयाने कमी होत असलेला पाणीपुरवठा पाहता लघुपाटबंधारे विभागाच्या आदेशानुसार ३० तास पाणीकपात लागू झाली असताना गळतीच्या माध्यमातून पाण्याच्या होत असलेल्या नासाडीकडे मात्र केडीएमसी तसेच एमआयडीसीचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. कपातीमुळे पाण्याचे नियोजन कोलमडले असताना ठिकठिकाणी होणाऱ्या पाण्याच्या गळतीकडे झालेले दुर्लक्ष पाहता नागरिकांना पाणी बचतीचे धडे देणाºया केडीएमसी आणि एमआयडीसीची पाण्याच्या नासाडीबाबत हलगर्जीपणा का सुरू आहे ? असा सवाल ‘वास्तव’ पाहता उपस्थित होत आहे. वस्तूस्थिती पाहताा गोळवली, खंबाळपाडा, कल्याण रोड, बदलापूर पाइपलाइन रोड येथे गळती सुरू असून मोठया प्रमाणावर पाणी वाया जात आहे.

मीटरचोरांची दहशत संपेना
केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने लावण्यात आलेले सोसायटयांमधील पाण्याचे मीटर चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली असताना पोलीस यंत्रणा मात्र सुस्तच आहे. या चोºयांप्रकरणी गुन्हे दाखल होऊनही अद्याप त्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. या घटनांचे सत्र सुरूच राहिल्याने सोसायटीत राहणाºया नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे तर मीटर चोरीला गेल्याने ते नवीन घेण्यासाठी त्यांना आर्थिक भूर्दंडही सोसावा लागत आहे. डोंबिवलीत मीटरचोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. कल्याणमध्येही हे लोण काही प्रमाणात पसरले आहे. चोरटयांकडून मीटरच्या सुरक्षेसाठी लावलेल्या लोखंडी जाळया व कुलूप रितसर तोडून, पाईप पानाने मीटर उघडून नेण्यात येते.

वाढत्या चोरीच्या घटनांप्रकरणी सोसायटयांच्यावतीने स्थानिक पोलीस ठाण्यात निवेदनही देण्यात आली आहेत. या चोरीमागे एखादी टोळी असावी असा संशय व्यक्त होत असून या वाढत्या घटनांमुळे सोसायटीमधील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रारंभी पोलिसांकडून दाखल होणाºया तक्रारींची दखल घेतली जात नव्हती. परंतु केडीएमसीचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांच्यावतीने पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांना ठोस कारवाईचे निवेदन दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली.

काही ठिकाणच्या चोरीच्या घटनांमध्ये मीटरचोरी करणारे चोरटे सोसायटींच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.परंतु ठोस कारवाई पोलिसांकडून होत नसल्याने चोरटयांचा उच्छाद जैसे थे सुरू आहे. दरम्यान एक इंची पाणीमीटरसाठी ५ हजार ५२० रूपये, पाऊण इंची मीटरसाठी ३ हजार रूपये तर अर्धा इंची मीटरसाठी २ हजार ३१० रूपये महापालिका घेते. जर मीटर चोरीला गेले तर नव्याने मीटर खरेदी करावे लागते. तसेच इंचाप्रमाणे दर ग्राहकांना द्यावे लागतात. त्यामुळे मीटर खरेदीसाठी आर्थिक भूर्दंड नागरिकांना सोसावा लागतो. चोरटयांनी घातलेला धुमाकूळ पाहता मीटरचोरीचा गेल्या जानेवारीपासूनचा आकडा हा सुमारे हजारोंच्या आसपास आहे.

23 जलकुंभ वापराविना
केडीएमसी क्षेत्रातील एकूणच जलकुंभाचा प्रभागनिहाय आढावा घेता कल्याणमधील अ प्रभागात १८ जलकुंभ आहेत यातील आठच वापरात आहेत. उर्वरित दहा वापरात नाहीत. ब प्रभागात १० जलकुंभ असून ७ वापरात आहेत तर ३ जलकुंभांचा वापर केला जात नाही. क प्रभागात सहा जलकुंभ आहेत यातील चौघांचा वापर सुरू आहे पण २ निरूपयोगी आहेत.
ड आणि जे प्रभागात १४ जलकुंभ असून १३ वापरात आहेत केवळ एकाचा वापर केला जात नाही. डोंबिवलीतील ग आणि फ प्रभागातही १८ जलकुंभ असून १७ वापरात आहेत तर एकाचा वापर केला जात नाही. ह प्रभागात १७ जलकुंभ आहेत, या सर्वांचा वापर सुरू आहे. आय प्रभागात सहा जलकुंभ असून यातील दोघांचा तर इ प्रभागात चार जलकुंभांपैकी दोघांचाच वापर सुरू आहे.
२७ गावांमध्ये पाण्याची वाढती मागणी पाहता अमृत योजनेच्या माध्यमातून नव्याने जलकुंभ उभारण्यात येणार असल्याचे सांगत असले तरी ठोस कृती होणार तरी कधी? असा सवाल आहे. महत्त्वाचे म्हणजे एमआयडीसी क्षेत्रातील घरडा सर्कलजवळ असलेला २० लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ ३० वर्षापासून अधिक काळ विनावापर पडून आहे. हा जलकुंभ उपयोगात आणावा अशी मागणी एमआयडीसी प्रशासनाकडे सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांच्याकडून करण्यात आली होती.
याबाबतचे पत्र थेट उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनाही देण्यात आले होते. एप्रिल २०१८ मध्ये याबाबतचे निवेदन देण्यात आले होते. यावर संबंधित जलकुंभ वापर करण्यायोग्य आहे की धोकादायक हे पाहण्यासाठी त्याचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचा निर्णय एमआयडीसीने घेतला आहे. परंतु याला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.

बेकायदा नळजोडणी विरोधातील कारवाई पडली थंड
मध्यंतरी केडीएमसी प्रशासनाने बेकायदा नळजोडणी विरोधात व्यापक मोहीम हाती घेतली होती. परंतु ही कारवाई सद्यस्थितीला थंडावली आहे. ज्या रहिवाशांनी बेकायदा नळजोडण्या घेतल्या आहेत त्या शोधून ती तोडण्याची मोहीम युध्दपातळीवर सुरू करावी, असे आदेश आयुक्त गोविंद बोडके यांनी ऑक्टोबरमध्ये झालेल्या साप्ताहिक आढावा बैठकीत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते.
याशिवाय ज्या गृहनिर्माण संस्थांनी बूस्टर लावले आहेत, तेही शोधण्याचे निर्देश आयुक्तांनी त्यावेळी दिले होते. दरम्यानच्या काळात आलेली दिवाळीचा आणि पुरेसा पोलीस बंदोबस्त न मिळणे या पार्श्वभूमीवर ही मोहीम तत्काळ राबविण्यात आली नव्हती. डिसेंबरमध्ये या मोहिमेला प्रारंभ झाला.
शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांनी तर २५ हजारांपेक्षा जास्त बेकायदा नळजोडण्यांद्वारे पाणीचोरी होत असल्याकडे लक्ष वेधले होते. मात्र सद्यस्थितीला ही मोहीम पूर्णपणे थंड पडल्याने बेकायदा जोडण्या घेणाºयांचे चांगलेच फोफावले आहे.परंतु कारवाई सुरू असल्याचा दावा संबंधित विभाग करीत आहे.
बेकायदा बांधकामधारक केडीएमसी हद्दीतील करदात्यांचे पाणी पळवत आहेत असा आरोप सातत्याने महासभेत सदस्यांकडून केला जात आहे. याचा परिणाम महापालिका हद्दीतील पाणीपुरवठयावर होत असून कारवाईची मागणीही लाऊन धरण्यात आली होती. यासंदर्भातील कोणतीही कार्यवाही प्रशासनाक डून झालेली नाही.


टॅपिंग केल्यास त्वरित कारवाई
बदलापूर पाइपलाइनला जी सर्व्हीस सेंटर उभारण्यात आली आहेत त्यांना बोअरवेलमधील पाणी वापरले जाते. एमआयडीसीच्या जलवाहिनीला छिद्र पाडून पाणी घेतले जात नाही. मात्र आमच्या जलवाहिनीवर जर कोणी टॅपिंग केले असेल तर आमच्याकडून लागलीच कारवाई केली जाते अशी प्रतिक्रिया एमआयडीसी डोंबिवली विभागाचे उपअभियंता एस. पी. कुंभार यांनी दिली.

कमी दाबानेच पाणीपुरवठा
धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने पाणीकपात लागू झाली हे आम्हाला मान्य आहे. परंतु ज्यावेळी पाणीपुरवठा सुरू असतो त्यावेळी अत्यंत कमी दाबाने पाणी एमआयडीसीकडून सोडले जाते त्यामुळे कपातीचा दिवस वगळता अन्य दिवशीही आम्हाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते हे चुकीचे आहे, असे मत सागांव सोनारपाडा प्रभागाच्या नगरसेविका डॉ. सुनिता पाटील यांनी व्यक्त केले.

Web Title: Alcoholic base formed in Kalyan, Dombivli, Jalakumbi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.