आनंदी देशातही आम्ही उदास अन असमाधानी का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:59 PM2019-05-13T12:59:59+5:302019-05-13T13:00:18+5:30

काही माणसं चुकीची वागूनही आनंदी जगतात असं वाटतं. पण ते अर्धसत्य असते तुम्ही हा विचारच मनातून काढून टाका. दिसतं तसं नसतं.

We are sad and dissatisfied even in a happy country? | आनंदी देशातही आम्ही उदास अन असमाधानी का ?

आनंदी देशातही आम्ही उदास अन असमाधानी का ?

Next

काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रातून जगातील आनंदी देशाबाबतचे सर्वेक्षण आले होते. त्यात आपल्या भारत देशाच्या क्रमांकाचा जेव्हा विचार करू लागलो तेव्हा मला खरोखरंच वाचून धक्काच बसला. कारण माझी अपेक्षा पहिल्या पाच पंचवीसमध्ये तो असावा असं वाटत  होती, पण आपल्या देशाचा नंबर हा १४० व्या स्थानावर होता. यादी भली मोठी होती.पण विचार थांबले होते.कसं शक्य आहे हे ?

आमची भारतीय संस्कृती इतकी प्राचीन.सर्वस्तरावरील आमची गगनचुंबी कामगिरी, प्राचीन काळापासून आमच्यावर झालेले सुसंस्कार, ध्यान, मौन, अध्यात्म, विविध संप्रदाय तसेच आमच्या देशातील एवढे धर्म, त्याची शिकवण, संस्कार, तरीही आम्हाला आनंदी होण्याची कला शिकवू शकली नाही. समाधान देऊ शकली नाही म्हणून तर श्री समर्थ रामदासांनी जगी सर्व सुखी असा कोण आहे? असं म्हटलं असेल का ? संत तुकाराम महाराज म्हणतात तसं आनंदाचे डोही आनंद तरंग निर्माण करणारे आनंदाचे डोहही आटून गेले की काय ? मानवतेच्या दुष्काळामुळे याचाही विचार मनात आला.

संत श्री ज्ञानेश्वरांनी वर्णिलेला सकल मतीचा प्रकाशू काळवंडून  गेला आहे की काय असंही वाटून गेलं.खरंच अस्वस्थ झालो. मग आमच्या शहरातील व आत्ताच्या गावा,वाड्या,वस्ती, पालावर आलेला भौतिक सोयीसुविधांचा झगमगाट, प्रगती वा स्थित्यंतरेही आम्हाला का आनंदी ठेवण्यासाठी अपुरी का पडत आहेत ? आज खरंच आम्ही भौतिक साधन सोयी सुविधा कमावण्यात यशस्वी झालो खरं, पण त्यातून क्षणभंगुर आनंद मिळवता येऊ शकतो पण शाश्वत आनंद नाही. आम्हाला मनाची अस्वस्थता, चंचलता व अधाशीपणावर नियंत्रण ठेवावं लागेल इतरांच्या प्रगतीत पाय घालण्यापेक्षा प्रगतीसाठी धडपडणाºया प्रत्येकाला शक्य तिथं मदतीचा हात द्यायचं धाडस करावंच लागेल, कदाचित आपण जास्त आनंदी होऊ शकू.

परोपकाराची नाळ तुटू देऊन चालणार नाही, पण मजबूर होऊन कुणाची मुजोरी कधीही सहन करु नका. दुबळे व्हाल. अवतीभवती घडत असेल चांगलं काहीतर जरुर कौतुक करु या. प्रयत्नवाद्यांना बळ देऊ या. यशाची गणितं वेगळ्या पद्धतीने मांडता येऊ शकतील याचा विचार करून पाहावा लागेल. मनातला कोणत्याही बाबीतला संभ्रम दूर करून सुस्पष्टता आणावी लागेल.

पैशांनी वाट्टेल ते मिळत असेलही कदाचित पण शाश्वत सुख मिळेलच याची हमी अजून तरी कुणी देऊ शकत नाही. जगण्यातलं सहजपण शोधावंच लागेल.जसे आहोत तसेच राहू. नकली मुखवटे चेहºयावर चढवणं बंद करावे लागेल. मानसिक अस्वस्थ होण्यासाठी काही ठोस कारण असावंच लागतं असं काहीही नाही.लगेच सावरावे स्वत:ला. एखादी परिस्थिती बदलतंच नाही तेव्हा वाटेतील दगड बाजूला ठेवून वाट काढून जातो तितक्या सहजतेने वागावं लागेल, यालाच स्वत:ला बदलणं असं म्हणतात यामुळे आपण लवकर आनंदी होऊ शकतो. 

आज खरंच काही व्यक्तींना सातत्याने एकापाठोपाठ एक संकटाला तोंड द्यावे लागते,  पण अनेक जण अगदी छोट्या छोट्या कारणांनी आनंदाला नैराश्याची  काजळी चढते आहे. म्हणून आम्ही उदास आहोत. आनंदाच्या यादीत. काही माणसं चुकीची वागूनही आनंदी जगतात असं वाटतं. पण ते अर्धसत्य असते तुम्ही हा विचारच मनातून काढून टाका. दिसतं तसं नसतं. तेव्हा छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद शोधू या. कदाचित भविष्यात आपण आनंदी देशाच्या क्रमवारीत वरच्या स्थानावर येऊ शकतो.

घर, बंगला, गाडी, सोने, साडी, नोकरी आणि छोकरी ही सारी छोटी मोठी स्वप्ने पूर्ण केल्यानंतर त्यातला आनंद घ्यायची व टिकवण्याची कला शिकावी लागेल. कामात राम शोधला की, जीवनास शाश्वत आराम मिळतोच. तो लवकरात लवकर मिळवावाच लागेल. आहे त्या स्थितीत छान रहावं लागेल. व्यसनांधता देवभोळेपणा, अधाशीपणा व अतृप्तता दूर ठेवत सचोटीने व चिकाटीने प्रयत्न केला तर आपण नक्कीच आपल्या जीवनातील आनंदाचा स्तर उंचावू शकतो. आपण सारेजण आपापला परीघ आनंदाच्या तरंगानी भरुन काढू व आपण स्वत:पासून सुरुवात करुया. आज ही काळाची गरज आहे. चलातर मग देशाचा नंबर आनंदाच्या क्रमवारीत किमान टप्प्याटप्प्याने तरी वर घेऊन जाऊ या आणि आपण खरंच आनंदी होऊ या. मग आनंदी देशाच्या यादीतही आम्ही उदास दिसणार नाही. तेव्हा बी हॅपी...
- रवींद्र देशमुख 
(लेखक शिक्षक आहेत)

Web Title: We are sad and dissatisfied even in a happy country?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.