जुळ्या बहिणींशी लग्न केल्यानं पोलिसांत तक्रार दाखल; तरुणावर कारवाई होणार?, जाणून घ्या...!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 05:04 PM2022-12-04T17:04:55+5:302022-12-04T17:05:02+5:30

सदर प्रकरणी माळेवाडी येथील राहुल फुले यांनी तक्रार दाखल केली आहे.

Complaint filed with police for marrying twin sisters; Action will be taken against youth, Lets Know the law | जुळ्या बहिणींशी लग्न केल्यानं पोलिसांत तक्रार दाखल; तरुणावर कारवाई होणार?, जाणून घ्या...!

जुळ्या बहिणींशी लग्न केल्यानं पोलिसांत तक्रार दाखल; तरुणावर कारवाई होणार?, जाणून घ्या...!

googlenewsNext

मुंबई येथे राहणाऱ्या जुळ्या बहिणींना लहानपणापासून एकत्र राहण्याची सवयच लागल्यामुळे दोघांनीही आयुष्याचा साथीदार हा एकच निवडला आहे. या तिघांचा विवाह अकलूज येथे पार पडला. गजब कहाणीतून प्रेम निर्माण झाल्यामुळे अजब लग्न पार पडले. मात्र लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवाच्या आणि जुळ्या बहिणींच्या आनंदावर विरजण पडले.

सदर प्रकरणी माळेवाडी येथील राहुल फुले यांनी तक्रार दाखल केली आहे. नवरदेवाच्या विरोधात भारतीय दंड संहिता 1860 च्या 494 कलमानुसार अकलूज पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा (NCR) दाखल झाला आहे. त्यामुळे आता या नवरदेवावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. मात्र कायदा काय सांगतो, जाणून घ्या...

भारतीय दंड विधान 494 नुसार पती किंवा पत्नी जिवंत असताना दुसरं लग्न करता येत नाही. असं केल्यास ७ वर्षांची शिक्षा होऊ शकते. मात्र स्वखुशीने जर दोन्ही पत्नी राहत असतील तर तो गुन्हा ठरत नाही असं मत अॅड. असीम सरोदे यांनी सांगितलं. भारतात द्विभार्या प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आहे. पण समजा दोन्ही पत्नी स्वखुशीने आणि सहमतीने जर नांदत असतील तर हा गुन्हा ठरत नाही. कारण देशातील अनेक भागात दोन लग्नांची पद्धत दिसून येते. जर त्या मुली एकाच पतीसोबत राहण्यास तयार असतील तर इतर व्यक्ती त्यात काही हस्तक्षेप करू शकत नाही, असं असीम सरोदे यांनी सांगितलं.

जुळ्या बहिणींशी लग्न करणं नवरदेवाच्या अंगलट; दुसऱ्याच दिवशी आनंदावर पडलं विरजण!

तत्पूर्वी, जन्म, बालपण, शिक्षणच काय, तर नोकरीही एकत्रित असा जीवनाचा प्रवास एकत्रित करणाऱ्या रिंकी व पिंकी या जुळ्या बहिणींची ही आयुष्याची गोष्ट. दोघींना एकमेकींची इतकी सवय लागली की, त्या एकमेकींशिवाय राहणे कठीण बनले होते. इतकेच काय, तर एकमेकींची आवड- निवडही एकसारख्याच झाल्या होत्या. कांदिवली येथील रिंकी व पिंकी उच्च विभूषित असून आयटी क्षेत्रात मोठ्या पगारावर नोकरी करणाऱ्या जुळ्या बहिणी. वडिलांच्या पश्चात आईसोबत राहत होत्या. 

सहा महिन्यांपूर्वी रिंकी, पिंकी व आई आजारी पडल्या होत्या. यावेळी अंधेरी येथे राहणाऱ्या अतुल या टॅक्सी ड्रायव्हरने तिघींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिघींच्या कुटुंबात पुरुष नसल्याने माणुसकीच्या नात्याने अतुलने तिघींची रात्रंदिवस सेवा केली. यामुळे तिघींना अतुलविषयी आपुलकी निर्माण झाली. यातूनच जुळ्या बहिणींतील एकीचे प्रेम हे अतुलबरोबर जडले, पण दोघींनी एकमेकींना कधीच सोडले नसल्याने त्या विभक्त होऊन राहू शकत नसल्याने दोघींनी अतुलशी विवाह करण्याचा निर्णय घेतला.

सोशल मीडियावर मिम्सचा धुमाकूळ-

अकलूजमध्ये पार पडलेल्या विवाह सोहळ्याचे फोटो व चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल झाला. यातून चर्चा होत मिम्सचा अक्षरश: धुमाकूळ घातला. काहींनी आम्हाला एक वधू मिळत नाही, म्हणून खंत व्यक्त केली, तर काहींनी एकीलाच सांभाळणं कठीण होत असल्याचे सांगितले. काहींनी तर आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे असेही मत मांडले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Complaint filed with police for marrying twin sisters; Action will be taken against youth, Lets Know the law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.