खुर्ची मिळाली; गाड्या मात्र महिनाभर दूर !
By admin | Published: September 22, 2014 10:10 PM2014-09-22T22:10:18+5:302014-09-23T00:14:37+5:30
आचारसंहितेची आडकाठी : जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष वापरणार स्वत:चीच वाहने
सातारा : सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीवरून आठवडाभर खल सुरू होता. रुसवे-फुगवे दूर करत, गट-तट सांभाळत अखेर रविवारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची माळ माणिकराव सोनवलकर तर उपाध्यक्षपदाची माळ रवी साळुंखे यांच्या गळ्यात पडली. दोघांनाही खुर्ची मिळाली; पण खरा रुबाब असणारी शासकीय गाडी मिळण्यासाठी किमान महिनाभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
राजकारणात येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला महत्त्वाची सत्ता मिळावी, अधिकार मिळावेत, अशी अभिलाषा असते. त्यादृष्टीने वाटचाल सुरू होते. राजकारणातील सर्वच पदे प्रत्येकाला मिळतातच, असे नाही. सामाजिक आरक्षणाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर अनेक तळागाळातील लोकांच्या पदरात महत्त्वाची पदे पडली आहेत. त्याचप्रमाणे सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या अडीच वर्षांच्या दुसऱ्या टर्मच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी रविवारी निवडी झाल्या. तत्पूर्वीच शनिवारी राष्ट्रवादी भवनात निवडीसाठी बैठक झाली. त्यावेळी मंत्री शशिकांत शिंदे, नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासमोर शिवेंद्रसिंहराजे भोसले वगळता सर्वच आमदारांनी भूमिका मांडली. त्यानुसार अध्यक्षपदासाठी शिवाजीराव शिंदे, सुभाष नरळे, माणिकराव सोनवलकर, आनंदराव शेळके-पाटील तर उपाध्यक्षपदासाठी अमित कदम यांचे नाव चर्चेत आले. खासदार उदयनराजे भोसले यांनी उपाध्यक्षपद मागितल्याने या निवडी रविवारी जाहीर करण्याचे ठरले.
जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांच्या उपस्थितीत रामराजे गटाचे माणिकराव सोनवलकर तर उपाध्यक्षपदी खा. उदयनराजे भोसले गटाचे रवी साळुंखे यांची निवड करण्यात आली. ही निवड होत असतानाच अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. दोघांनाही जिल्ह्यातील महत्त्वाची असलेली व ग्रामीण भागातील मातीशी नाळ जोडणाऱ्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष-उपाध्यक्षपद मिळाले. खुर्ची मिळाली असली तरी विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्याने त्यांना सत्तेचा फारसा वापर करता येणार नाही. आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी या काळात कोणत्याही लोकप्रतिनिधीला शासकीय सुविधांचा वापर करता येत नाही. त्याप्रमाणे गाड्याही वापरता येणार नाहीत. तोपर्यंत अध्यक्ष-उपाध्यक्ष यांना स्वत:च्या खासगी वाहनांचा वापर करावा लागणार आहे. (प्रतिनिधी)
नव्या सरकारात मिळणार गाड्या...
अनेक नाट्यमय घडामोडीनंतर रुसवे-फुगवे दूर करत अन् स्वत:च्या मार्गातील अडथळे दूर करत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अध्यक्षपदी सोनवलकर तर उपाध्यक्षपदी साळुंखे यांची निवड केली. ही निवड केवळ एका वर्षासाठी आहे. त्यातून सध्या विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे विधानसभेसाठी दि. १५ आॅक्टोबरला मतदान, तर मतमोजणी दि. २२ आॅक्टोबरला होणार आहे. त्यानंतर नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल. त्यानंतर अध्यक्ष-उपाध्यक्षांना शासकीय गाड्या मिळणार असून, अधिकाराचा खऱ्या अर्थाने वापर करता येणार आहे. पहिला एक महिना विधानसभेसाठी उमेदवारांच्या प्रचारात जाणार आहे. त्यामुळे खूपच कमी कालावधी मिळणार आहे, हे मात्र निश्चित.
नव्या सरकारात मिळणार गाड्या...
अनेक नाट्यमय घडामोडीनंतर रुसवे-फुगवे दूर करत अन् स्वत:च्या मार्गातील अडथळे दूर करत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अध्यक्षपदी सोनवलकर तर उपाध्यक्षपदी साळुंखे यांची निवड केली. ही निवड केवळ एका वर्षासाठी आहे. त्यातून सध्या विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे विधानसभेसाठी दि. १५ आॅक्टोबरला मतदान, तर मतमोजणी दि. २२ आॅक्टोबरला होणार आहे. त्यानंतर नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल. त्यानंतर अध्यक्ष-उपाध्यक्षांना शासकीय गाड्या मिळणार असून, अधिकाराचा खऱ्या अर्थाने वापर करता येणार आहे. पहिला एक महिना विधानसभेसाठी उमेदवारांच्या प्रचारात जाणार आहे. त्यामुळे खूपच कमी कालावधी मिळणार आहे, हे मात्र निश्चित.