...अन्यथा सप्टेंबरला सरकारचा ‘गणपती’! राजू शेट्टी : इस्लामपुरात जल्लोषी स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:07 AM2018-07-22T00:07:04+5:302018-07-22T00:07:37+5:30

... otherwise the government's 'Ganapati' in September! Raju Shetty: Welcome to Islampura | ...अन्यथा सप्टेंबरला सरकारचा ‘गणपती’! राजू शेट्टी : इस्लामपुरात जल्लोषी स्वागत

...अन्यथा सप्टेंबरला सरकारचा ‘गणपती’! राजू शेट्टी : इस्लामपुरात जल्लोषी स्वागत

Next
ठळक मुद्दे दूध दरवाढीची नीट अंमलबजावणी करा; उसाच्या एफआरपीची दरवाढ फसवी असल्याचा आरोप

इस्लामपूर : दूध आंदोलनात शिष्टाई करा म्हणून मी सरकारच्या मागे लागलो नव्हतो, तर सरकारच माझ्या मागे लागले होते. माझ्या दुधात पाणी आहे की कशात आहे, हे काळच दाखवून देईल. निर्णयाची योग्य ती अंमलबजावणी न झाल्यास सप्टेंबरमध्ये या सरकारचा ‘गणपती’ करणारच, असा इशारा स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

उसाला २०० रुपयांची एफआरपीमधील फसवी वाढ देऊन शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकºयांनी कमळावर कसलं तणनाशक फवारायचे हे ठरवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

दूध आंदोलनाच्या यशानंतर खा. शेट्टी यांचे इस्लामपूर शहरात पहिल्यांदाच आगमन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वाहनांच्या लवाजम्यासह खा. शेट्टी यांचा ‘रोड शो’ आयोजित केला होता. पंचायत समिती आवारातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीस सुरुवात झाली. त्यानंतर तहसील कचेरीजवळील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सांगता झाली. पत्रकार भवनात खा. शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

खा. शेट्टी म्हणाले, दूध आंदोलनाच्या यशानंतर आता उसाच्या एफआरपीचा प्रश्न हाती घेणार आहे. ज्या साखर कारखान्यांनी एफआरपी थकवली आहे, ती त्यांनी द्यावी, यासाठी साखर आयुक्तांना महिन्याची मुदत दिली होती. त्यामुळे ज्यांनी एफआरपी दिली नाही, त्यांच्यावर आर. आर. सी. कायद्यानुसार कारवाई करून त्यांच्या साखरेचा लिलाव करून शेतकºयांचे पैसे द्यायला भाग पाडणार आहोत. सध्या फक्त शेतकरी आणि शेतकºयांचे प्रश्न एवढेच डोळ्यासमोर आहे.
सगळ्या पक्षांपासून समान अंतरावर आहे. भारतीय जनता पक्ष शेतकरी व जनतेची फसवणूक करीत आहे. २०० रुपयांच्या फसव्या एफआरपीला आपण महिन्याभरापूर्वीच विरोध केला होता. हा विरोध डावलून त्यांनी दिलेली ही एफआरपी केवळ ५५ रुपयांची आहे. सरकारने शेतकºयांचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकºयांनी कमळावर कसलं तणनाशक फवारायचे ते ठरवावे.

ते म्हणाले, दुधाचा सध्याचा १४ ते २३ रुपयांचा प्रतिलिटर दर हा राज्यात वेगवेगळा होता. दूध उत्पादक शेतकºयांना तो परवडणारा नव्हता. ३० ते ३५ रुपयांचा उत्पादन खर्च येत होता. गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी आतबट्ट्याचा धंदा करीत होता. आंतरराष्टÑीय बाजारपेठेत दर पडल्याने बटर आणि दूध पावडरचा साठा ठप्प झाला. त्याचे उत्पादन कमी झाल्याने २० ते २२ लाख लिटर अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाला. त्याचा परिणाम दर पाडण्यात झाला. त्यावेळी सरकारने पुढाकार घ्यायला हवा होता.

खा. शेट्टी म्हणाले, परराज्यातील दूध महाराष्टÑात येऊ नये यासाठीच थेट शेतकºयाला प्रतिलिटर ५ रुपयांचे अनुदान द्यावे, ही मागणी केली. त्यावर सरकारकडून दूध व्यवसायाची माहिती नाही, वेळ लागेल, किचकट आहे, अशी कारणे सांगितली. आम्ही त्यांना पर्याय दिले, त्यातील दुसरा पर्याय त्यांनी स्वीकारला. त्यामुळे उद्यापासून ही पाच रुपयांची दरवाढ मिळणार आहे. जे संघ २५ रुपयांप्रमाणेच दूध खरेदी करतील, तेच संघ, संस्था अनुदानास पात्र ठरतील, असा आदेश काढण्याची सूचना केली आहे. त्यामुळे फसवा-फसवी होणार नाही.

ते म्हणाले, राज्यातील शेतकरी या दूध आंदोलनात ताकदीने आणि एका विचाराने उतरला. दूध उत्पादकांनीच हे आंदोलन हातात घेतले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाला दिशा दिली. आंदोलनात ५० हजार लिटर दूध वाया गेले, मात्र एकाचवेळी १ कोटी ४० लाख लिटर दुधाचे संकलन ठप्प झाल्याने सरकारला जाग आली, हे शेतकºयांचे यश आहे.
यावेळी सयाजी मोरे, भागवत जाधव, विकास देशमुख, संदीप राजोबा, शिवाजीराव मोरे, आप्पासाहेब पाटील, अ‍ॅड. एस. यु. संदे उपस्थित होते.

दादा, मोठे अभ्यासू!
शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील अभ्यासू आहेत. दूध संघवाल्यांना विचारून आंदोलन केले म्हणतात. यावर शेट्टी म्हणाले की, १ जूनच्या आंदोलनात ते होतेच की! त्यावेळी कुणाला विचारले हे त्यांना माहीत आहेच. मी स्ांघवाल्यांना सामील, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीला सामील, असे ते म्हणतात. आता फक्त मी पाकिस्तानला सामील झालोय, एवढेच म्हणायचे दादा बाकी आहेत!
मराठा, धनगर आरक्षणासाठी आग्रही
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मी पहिल्यापासूनच आग्रही आहे. २०१२ मध्येच लोकसभेत मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी केली होती. धनगर आरक्षणाबाबतही केंद्राशी अनेकवेळा बोललो आहे. धनगर आरक्षणाबाबत राज्य सरकारला वेळोवेळी कळवूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही, असे केंद्र सरकारचे लेखी पत्र आपल्याकडे आहे, याकडेही शेट्टी यांनी लक्ष वेधले.

सदाभाऊ किरकोळ
दूध आंदोलनात आ. हार्दिक पटेल यांनी फसवले का, या प्रश्नावर बोलताना खा. शेट्टी म्हणाले, त्यांनी फसवण्याचा प्रश्नच नव्हता. ते आंदोलनात येणार नव्हते; मात्र त्यांनी जी मदत करायची होती ती केलीच. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणतात, आमच्याच शिष्टाईने दर मिळाला, यावर शेट्टी यांनी ‘किरकोळ लोकांचे नाव कशाला काढताय राव’, अशा शब्दात खोत यांची खिल्ली उडवली.

Web Title: ... otherwise the government's 'Ganapati' in September! Raju Shetty: Welcome to Islampura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.