Lok Sabha Election 2019 कपटनीतीचा चक्रव्यूह की कात्रजचा घाट? कारण राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 12:27 AM2019-03-31T00:27:41+5:302019-03-31T00:29:30+5:30

दोन वर्षांपासून तयारी सुरू केलेल्या, पण अखेरपर्यंत तळ्यात-मळ्यात असणाऱ्या विशाल पाटील यांनी शनिवारी अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उमेदवारी स्वीकारली. मतदानाला पंचवीस दिवस राहिले असताना वसंतदादांच्या या धाकट्या नातवानं काँग्रेस आघाडीतल्या घटक पक्षाची

Loksabha Election 2019 Katraj Ghat of the maze of diplomacy? Because of politics | Lok Sabha Election 2019 कपटनीतीचा चक्रव्यूह की कात्रजचा घाट? कारण राजकारण

Lok Sabha Election 2019 कपटनीतीचा चक्रव्यूह की कात्रजचा घाट? कारण राजकारण

googlenewsNext
ठळक मुद्दे कपटनीतीचा चक्रव्यूह की कात्रजचा घाट? कारण राजकारण

-श्रीनिवास नागे

दोन वर्षांपासून तयारी सुरू केलेल्या, पण अखेरपर्यंत तळ्यात-मळ्यात असणाऱ्या विशाल पाटील यांनी शनिवारी अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उमेदवारी स्वीकारली. मतदानाला पंचवीस दिवस राहिले असताना वसंतदादांच्या या धाकट्या नातवानं काँग्रेस आघाडीतल्या घटक पक्षाची लांग बांधून ‘बॅट’ हातात घेतली! मैदानात उतरायचं की नाही, याबाबत साशंक असणाऱ्या विशाल पाटील यांचा खरंच निर्णय होत नव्हता, की स्वत: ‘कन्फ्यूज’ असल्याचं दाखवून ते विरोधकांना ‘कन्फ्यूज’ करून सोडत होते, उमेदवारी मिळवून ते कपटनीतीच्या चक्रव्यूहात अडकले, की त्यांनीच सगळ्यांना कात्रजचा घाट दाखवला, या प्रश्नांची उत्तरं निकालात दडलेली पहायला मिळतील.

वसंतदादांचे चिरंजीव प्रकाशबापू पाटील यांच्या निधनानंतर बापूंचे थोरले चिरंजीव प्रतीक खासदार झाले. पण तेव्हापासूनच ‘धाकटी पाती’ राजकारणात येण्यासाठी धडपडत होती. तथापि गृहकलह टाळण्यासाठी विशाल यांना २००५ पासून आतापर्यंत थांबावं लागलं. २०१४ मध्ये प्रतीक पाटील यांचा पराभव झाला. तेव्हापासूनच विशाल यांच्या महत्त्वाकांक्षेला जादा धुमारे फुटू लागले होते. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी आस्ते कदम तयारी सुरू केली होती. जिल्हा बँक, बाजार समिती आणि महापालिकेत त्यांनी गट तयार केला. यंदाच्या महापालिका निवडणुकीत पैसा लावून काही नगरसेवक निवडून आणले. वसंतदादा साखर कारखाना खासगी संस्थेस चालवण्यास देऊन, स्वत:चा व्याप कमी करून घेतला! वसंतदादा सांस्कृतिक महोत्सव भरवून चर्चेत राहण्यावर भर दिला. पण लोकसभा की विधानसभा, अशा संभ्रमात ते होते. (तसं दाखवत तरी होते!)

दोन महिन्यांपूर्वी प्रतीक पाटील यांचं तिकीट कापण्याचं ‘हायकमांड’नं ठरवल्यानंतर विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांची नावं पुढं आली. पण दोघांनीही तिकीट नाकारलं. दोघांनाही दिल्लीपेक्षा मुंबईत जाण्यातच जादा रस होता. शिवाय दगाफटक्याची भीती! मग सुरू झालं काँग्रेस-राष्टÑवादी-स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आघाडीचं जागावाटप. वसंतदादा घराण्यातून कुणाचीच दावेदारी पुढं येऊ नये, यासाठी आघाडीच्या जागावाटपात सांगली काँग्रेसकडं राहणार नाही, याची विशेष काळजी जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या नेत्यांनी घेतली. त्यातल्या काहींना दादा घराण्याला राजकारणातनं संपवायचं होतं, तर काहींना भाजपच्या संजयकाका पाटलांना ‘बाय’ द्यायचा होता! ‘स्वाभिमानी’नं मागणी केलेल्या जागांवर पटापट काँग्रेस-राष्टवादीनं तिकीटवाटप केलं. शिल्लक राहिलेली सांगलीची जागा ‘स्वाभिमानी’च्या वाट्याला गेली. दोन आठवड्यापूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी राजू शेट्टींना जागा बहाल केल्यानंतर कार्यकर्त्यांनी काँगे्रस कमिटीला टाळं ठोकलं. त्याचवेळी विशाल यांनी रिंगणात उतरण्यास तयार असल्याचं जाहीर केलं. अर्थात वेळ निघून गेली होती... त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी विशाल यांच्याशी संपर्कही साधला नाही!

याच दरम्यान भाजपमध्ये संजयकाकांचा पत्ता कट करण्यात अपयश आलेल्या नाराज भाजपेयींनी चाचपणी सुरू केली होती. विशाल यांचे मनसुबे समजताच त्यांनी जाळं टाकलं. विशाल यांना अपक्ष म्हणून लढण्यास बळ दिलं. अपक्षाला रसद पुरवून संजयकाकांची ‘गेम’ करण्याचा ‘प्लॅन’ त्यांनी आखला, मग काँग्रेसचे नेते हलले. दुसरीकडं विशालऐवजी गोपीचंद पडळकर यांनाच तिकीट द्यावं म्हणून आघाडीतल्या नेत्यांनी राजू शेट्टींवर ‘प्रेशर’ टाकायला सुरुवात केली. हातकणंगलेत त्रास देण्याचा बागुलबुवा दाखवला. पण शेट्टी काही कच्च्या गुरुचे चेले नाहीत! वसंतदादा घराण्याला तिकीट दिल्यानं आपसूक तयार होणारी सहानुभूती, हातकणंगलेसाठी मिरज पश्चिम भागातून त्यांना मिळणारी दादा घराण्याची मदत नजरेआड करून चालणार नव्हती. त्यांनी झारीतल्या शुक्राचार्यांच्या ‘प्रेशर टॅक्टीज’ उडवून लावल्या आणि विशाल पाटील यांच्या हाती ‘बॅट’ दिली...

...तासाभरात गोपीचंद पडळकर यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्याचं जाहीर केलं. पडळकरांना फूस कुणाची, ते कुणाची मतं खाणार, हा चक्रव्यूह कुणी आखलाय, हे यथावकाश समोर येईलच.

जाता-जाता : विशाल पाटील यांनी राजकीय अपरिहार्यता स्वीकारत जुगार खेळलाय. त्यांना जशी नाराज भाजपेयींची रसद मिळणार आहे, तशीच रसद काँग्रेस-राष्टÑवादीतून संजयकाकांनाही मिळणार आहे. हल्ली कुठं, किती मतदान झालं, याची आकडेवारी समजत असली तरी युती-आघाडीधर्म न पाळणाऱ्यांची दोन्हीकडं कमी नाही. त्यामुळं हातात बांधलेल्या घड्याळाचे काटे कमळाकडं किती झुकले आणि ‘बॅट’ धरलेल्या हातात कमळाच्या पाकळ्या किती आल्या, हे सांगणं अवघडच!

Web Title: Loksabha Election 2019 Katraj Ghat of the maze of diplomacy? Because of politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.