रत्नागिरी : धरणामुळे सुटला गुहागरचा पाणीप्रश्न, वर्षभर पिण्याचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 04:37 PM2018-05-31T16:37:08+5:302018-05-31T16:37:08+5:30

गुहागर शहर व आजूबाजुच्या ग्रामपंचायतींना वर्षभर पिण्याचे पाणी पुरविण्याचे काम अप्रत्यक्षपणे मोडकाघर धरण सध्या करीत आहे.

Ratnagiri: Water problem of Guhaagar due to dam construction, drinking water throughout the year | रत्नागिरी : धरणामुळे सुटला गुहागरचा पाणीप्रश्न, वर्षभर पिण्याचे पाणी

रत्नागिरी : धरणामुळे सुटला गुहागरचा पाणीप्रश्न, वर्षभर पिण्याचे पाणी

googlenewsNext
ठळक मुद्दे धरणामुळे सुटला गुहागरचा पाणीप्रश्न, वर्षभर पिण्याचे पाणी गेल्या ४५ वर्षात धरणातील गाळ जैसे थे; अद्याप उदासीनता

गुहागर : गुहागर शहर व आजूबाजुच्या ग्रामपंचायतींना वर्षभर पिण्याचे पाणी पुरविण्याचे काम अप्रत्यक्षपणे मोडकाघर धरण सध्या करीत आहे.

कमी पावसामुळे भविष्यात दुष्काळासारख्या गंभीर संकटापासून हे धरण महत्त्वाची भूमिका बजावू शकते, हे लक्षात घेता पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या पाण्यापासून धरणातील पाणीसाठा व पाण्याची पातळी वाढविण्याकरिता सर्वतोपरी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

यासाठी गेल्या ४५ वर्षात धरणामध्ये साठलेला गाळ उपसण्याची गरज आहे. या कामासाठी तालुका प्रशासनाच्या पुढाकारासह लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा मानला जात आहे.

या धरणाचे पाणलोट क्षेत्र ११.६५ चौरस किलोमीटर असूून, उंची तब्बल २० मीटर आहे. या अवाढव्य धरणाची साठवण क्षमता ४४.७० लाख घनमीटर आहे.

वाढत्या शहरीकरणात कालांतराने शेती, भाजीपाला व बागायतीसाठी कालव्याने पाणीपुरवठा करण्याची पद्धत बंद झाल्यानंतर शिल्लक राहिलेल्या धरणाच्या मुबलक पाणीसाठ्यावर सुरुवातीला तालुक्याचे ठिकाण असलेल्या गुहागर व शेजारच्या असगोली ग्रामपंचायतीने संबंधित खात्याची पूर्वपरवानगी घेऊन धरणाच्या शेजारी विहीर पाडून त्यावर स्वतंत्र जॅकवेल पंप बसवून नळपाणी योजना सुरू केली.

त्यानंतर शेजारच्या पाटपन्हाळे, पालशेत व आरे गावांनीही आपापली पाणीयोजना व धरणाच्या बाजूला विहीर उभारून सरू केली. या धरणाच्या उभारणीपासून आजतागायत डागडुजी व दुरूस्तीकरिता कोणताही शासकीय निधी खर्ची पडला नाही.

परंतु सन २०१० - ११ मध्ये धरणाच्या भिंतीमधून लागलेली गळती बंद करण्यासाठी राज्य शासनाने जलसुधारणा प्रकल्पांतर्गत जागतिक बँकेकडून प्राप्त झालेला ९५ लाखांचा भरीव निधी याठिकाणी खर्ची टाकला.

परंतु प्रत्यक्षात ही गळती बंद करण्यास संबंधित ठेकेदाराला अपयश आले. त्यामुळे दुरूस्तीवर टाकलेला निधी अक्षरश: वाया गेल्याने वर्षाकाठी साठलेल्या पाण्यापैकी लाखो लीटर पाणी आजही या धरणामधून वाया जात समुद्राला मिळत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळते.

त्यामुळे शासनाच्या लघुपाटबंधारे खात्याने पाण्याचे सध्याचे महत्व लक्षात घेता संबंधित कंत्राटदाराकडून ही गळती कोणताही जादा निधी न देता पूर्णत: बंद करून घ्यावी, अशी मागणी गुहागर तालुकावासीयांकडून होत आहे.

गेल्या काही वर्षात कमी झालेला पाऊस लक्षात घेता भविष्यात आपणही पाण्याच्या टंचाईपासून निर्माण झालेल्या दृष्टचक्रात सापडल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती आहे.

सध्याची वाढती लोकसंख्या, भरमसाठ जंगलतोड, नवे गृह व बंगलो प्रकल्पामुळे वाढलेल्या नवनवीन वस्त्या, गावाकडे होणारे स्थलांतर यामुळे भविष्यात पाणीटंचाईचे भीषण संकट आपल्यावरसुद्धा येऊ शकते, हे लक्षात घेऊन आपण आपल्या लाभलेल्या मोडकाघर धरणाची योग्य तऱ्हेने जपणूक व निगा राखून त्यातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कशी वाढविता व कायम राखता येईल, हे पाहणे अत्यावश्यक आहे. संपूर्ण गुहागर शहर आणि परिसराला वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा या धरणात उपलब्ध आहे. त्यामुळे हे धरण वरदानच ठरत आहे.

गुहागर पर्यटनस्थळ : धरणाची योग्य ती निगा राखण्याची गरज

गुहागर शहर व तालुका परिसर आज पर्यटनाचे एक सुंदर ठिकाण म्हणून विकसित होत आहे. हा पर्यटन विकास होत असताना आपल्याकडे असलेला समुद्रकिनारा व प्रेक्षणीय स्थळे जेवढी महत्त्वाची आहेत, तेवढेच आपल्या शहराला मिळणारे मुबलक पाणीही महत्त्वाचे आहे.

शहर परिसराला मुबलक पाणी नसेल तर नुसती प्रेक्षणीय ठिकाणे आणि परिसर असून काहीही उपयोग होणार नाही. त्यामुळे गुहागरच्या पर्यटन विकासात शहराला कायमस्वरुपी पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.

मोडकाघर धरणामध्ये गुहागर तालुकावासीयांची पूर्ण क्षमतेने तहान भागविण्याची ताकद आजही आहे. त्यामुळे या धरणाची डागडुजी करून निगा राखली, तरच पुढची काही वर्षे पाणी मिळू शकेल.
 

Web Title: Ratnagiri: Water problem of Guhaagar due to dam construction, drinking water throughout the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.