संकल्प ३७ लाख वृक्षलागवडीचा ; राज्य सरकारचे ५० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 03:11 AM2018-07-02T03:11:30+5:302018-07-02T03:11:37+5:30

वाढते प्रदूषण, मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. याबाबत जागतिक स्तरावरही चिंता व्यक्त केली गेली आहे. पर्यावरणाचा -हास रोखण्यासाठी राज्य सरकारने ५० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवेले आहे.

 Resolutions of 37 lakhs of trees; State Government's target of 50 million trees | संकल्प ३७ लाख वृक्षलागवडीचा ; राज्य सरकारचे ५० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट

संकल्प ३७ लाख वृक्षलागवडीचा ; राज्य सरकारचे ५० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट

Next

अलिबाग : वाढते प्रदूषण, मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. याबाबत जागतिक स्तरावरही चिंता व्यक्त केली गेली आहे. पर्यावरणाचा -हास रोखण्यासाठी राज्य सरकारने ५० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवेले आहे. रायगड जिल्ह्यात यंदा तब्बल ३७ लाख वृक्षलागवडीचा शुभारंभ रविवारी जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मात्र दांडी मारली. सूर्यवंशी यांनी उपस्थितांना वृक्ष प्रतिज्ञा दिली.
गेल्या दोन वर्षांत तब्बल १६ लाख ९७ हजार ५३९ वृक्ष लावण्यात आले होते. पैकी १३ लाख ७८ हजार ५८८ वृक्ष जगवण्यात प्रशासनाला यश आले आहे. रायगड जिल्हा हा समृद्ध जिल्हा म्हणून ओळखला जायचा. तर शेती हा जिल्ह्यातील प्रमुख व्यवसाय होता. जिल्ह्यात औद्योगिकीकरणाचे वारे वाहू लागल्याने मोठ्या संख्येने येथे कारखाने उभे राहिले. विकासकामांसाठी मोठ्या संख्येने वृक्षतोड करण्यात आली, त्यामुळे जिल्ह्याला बकाल स्वरूप आले. येथे असलेल्या कारखान्यांमध्ये रासायनिक कारखान्यांचा मोठ्या संख्येने भरणा अधिक आहे, त्यामुळे प्रदूषणाच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. एकीकडे झपाट्याने वृक्षतोड तर दुसरीकडे वाढते प्रदूषण, अशा संकटात जिल्हा अडकत होता. अशीच परिस्थिती सध्या जगभर सुरू आहे. जागतिक स्तरावर याची गंभीर दखल घेतल्यानंतर सरकारनेही पर्यावरण वाचवण्यासाठी वृक्षलागवडीचा संकल्प केला. त्यानुसार जिल्ह्यात यंदा ३० लाख सहा हजार रोपे लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. अभियानात जिल्हाभरातील सरकारच्या विविध यंत्रणांमार्फत, विविध संस्था, नागरिकांना सहभागी करण्यात आले.
रायगड जिल्ह्यात वृक्षलागवडीसाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केले. यासाठी ३० लाख सहा हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट असले, तरी प्रत्यक्षात ३७ लाख २२ हजार ३८८ रोपे लावण्याची तयारी प्रशासनाने केल्याचे जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी सांगितले. या महोत्सवात जिल्ह्यातील नागरिकांनी, सामाजिक, सेवाभावी संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही सूर्यवंशी यांनी केले. कार्ला येथील कार्यक्रमात रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभय यावलकर, उपवनसंरक्षक मनीष कुमार यांच्यासह अन्य अधिकारी, सरपंच, नागरिक उपस्थित होते.

विभागनिहाय रोपलागवड
जिल्ह्यात विभागनिहाय रोपे लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. अलिबाग वनविभाग नऊ लाख, रोहा वनविभाग पाच लाख, सामाजिक वनीकरण विभाग तीन लाख, रायगड जिल्ह्यामध्ये ८०३ ग्रामपंचायती आहेत.
त्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक हजार १०३ रोपे, या प्रमाणे ग्रामविकास विभागामार्फत
दहा लाख रोपे
लावण्यात येणार
आहेत.
पनवेल महानगरपालिकेतर्फे १५ हजार, तर अन्य सरकारी विभागांमार्फत दोन लाख ९१ हजार, असे एकूण ३० लाख सहा हजार रोपे लागवडीचे उद्दिष्ट जिल्ह्यात पूर्ण केले जाणार आहे.
यासाठी सर्व विभागांच्या बैठका घेऊन नियोजन करण्यात आले आहे.

सात लाख जादा रोपेलागवडीची तयारी
रायगड जिल्ह्यासाठी दिलेले उद्दिष्ट ३० लाख सहा हजार रोपांचे असले, तरी वनविभागाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर अलिबाग वनविभागाने दहा लाख ३१ हजार २२३, रोहा वन विभागाने चार लाख ९८ हजार ८३२, ग्रामविकास विभागाने ११ लाख ८२ हजार ६७५, पनवेल महानगरपालिकेने १५ हजार, तर अन्य विभागांनी सहा लाख ७३ हजार २२६ अशा एकूण ३७ लाख २२ हजार ३८८ रोपेलागवड स्थळांची माहिती अपलोड केली आहे. थोडक्यात दिलेल्या उद्दिष्टापेक्षा सात लाख १६ हजार ३८८ जादा रोपेलागवड करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.

रोपलागवडीसाठी ‘लँड बँक’
इतक्या मोठ्या प्रमाणावर रोपांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्यासाठी जिल्ह्यात ‘लँड बँक’ तयार करण्यात आली आहे. त्यात उपवनसंरक्षक अलिबाग हे १३६५.११ हेक्टर क्षेत्रावर, उपवनसंरक्षक रोहा ६५६ हेक्टर, सामाजिक वनीकरण विभाग ८३ हेक्टर, ग्रामविकास विभाग ४४७.५५ हेक्टर, कृषी विभाग ३६२.८० हेक्टर, तर महसूल विभाग ३३८.९६ हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी उपलब्ध केले आहे.
तर जिल्ह्यातील सावित्री, काळ, गांधार (१०८ कि.मी.), कुंडलिका, आंबा नदी (८० कि.मी.), उल्हास नदी (१० कि.मी.), पाताळगंगा नदी (५० कि.मी.) असे एकूण २४८ कि.मी. लांबीच्या नदीपात्रांच्या काठांपासून एक कि.मी. रुंदीच्या क्षेत्रात ही रोपांची लागवड होणार आहे. त्यात एकूण ६९३.४९ हेक्टर जमीन उपलब्ध होणार आहे, अशी माहिती रोजगार हमी योजना शाखेचे उपजिल्हाधिकारी विश्वनाथ वेटकोळी यांनी दिली.

७१ लाख
रोपांची उपलब्धता
मोहिमेत लागवड करण्यासाठी जिल्ह्यात ९९ रोपवाटिकांमधून ७१ लाख १४ हजार रोपांची उपलब्धता करण्यात आली आहे.
गेल्या वर्षीच्या मोहिमेतील शिल्लक, तसेच पुढल्या वर्षी लागवड करावयाच्या रोपांचे नियोजन यांचाही समावेश केला आहे.

महाराष्ट्र हरित सेना सभासद होण्याचे आवाहन
अभियानाच्या अनुषंगाने महाराष्ट्र हरित सेना सभासद नोंदणीही करण्यात येत आहे. जिल्ह्यात १ लाख ४५ हजार २६३ जण यात सहभागी झाले आहेत. उपक्र मात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

ग्रामपंचायतींना रोपांची उपलब्धता मोफत
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना रोपे लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तथापि, सर्व ग्रामपंचायतींना ही रोपे सामाजिक वनीकरण विभागामार्फत मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती विभागीय वन अधिकारी ए. एस. निकत यांनी दिली. सामाजिक वनीकरण विभागाच्या १३ आधुनिक तर अन्य सहा रोपवाटिका आहेत, त्यातून १७ लाख रोपांची निर्मिती करण्यात आली आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या विविध रोपवाटिकांमधून त्या-त्या ग्रामपंचायत क्षेत्रात रोपे पोहोच करण्यासाठी तालुकास्तरावरून तयार करण्यात आलेल्या वाहतूक आराखड्यानुसार रोपे पोहोचविण्याचे काम सुरू झाले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संस्था, संघटनांचा सहभाग
अभियानात समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने सर्व नियोजन पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान ही श्री सदस्यांची संस्था, महाड येथील हिरवळ प्रतिष्ठान, ग्रीन आर्मीचे सभासद, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, गावांमधील संयुक्त वनव्यवस्थापन समिती सभासद यांच्यासह विविध सामाजिक संघटना या अभियानात सहभागी होत आहेत.

रोपांचे संवर्धन समाधानकारक
याआधी लागवड केलेल्या रोपांची जतन व संवर्धन यावरही सरकारचे लक्ष आहे. त्यांचाही नियमित आढावा घेण्यात येत आहे. लागवड केलेल्या रोपांची देखभाल करण्याची जबाबदारी त्या-त्या विभागांवर सोपविण्यात आली आहे. वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत २०१६मध्ये लागवड केलेल्या पाच लाख ७९ हजार ४२२ रोपांपैकी सध्या चार लाख २८ हजार १८९ रोपे जिवंत आहेत. त्याची टक्केवारी ७३.९० इतकी आहे. तर २०१७मध्ये जिल्ह्यात ११ लाख १८ हजार ११७ रोपांपैकी नऊ लाख ५० हजार ३९९ रोपे जिवंत आहेत. त्याची टक्केवारी ८५ इतकी आहे.

Web Title:  Resolutions of 37 lakhs of trees; State Government's target of 50 million trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड