वैभवच्या बहादुरीमुळे मुस्कानचा वाचला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 06:47 AM2017-07-26T06:47:18+5:302017-07-26T06:47:20+5:30
जाधववाडी येथील इयत्ता पाचवीत शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीला कॅनॉलच्या पाण्यात पडल्यानंतर येथील शाळेतील वैभव सुनील गायकवाड या विद्यार्थ्याने स्वत:च्या जिवाची
राजुरी : जाधववाडी येथील इयत्ता पाचवीत शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीला कॅनॉलच्या पाण्यात पडल्यानंतर येथील शाळेतील वैभव सुनील गायकवाड या विद्यार्थ्याने स्वत:च्या जिवाची पर्वा न करता कॅनॉलमध्ये उडी मारून तिचा जीव वाचवला. ही घटना मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
येडगाव धरणातून कुकडी नदीला, तसेच कुकडी डाव्या कालव्याला मोठ्या प्रमाणात पाणी सोडलेले आहे. हा कुकडी डावा बोरी बुद्रुक जाधववाडीमार्गे गेलेला आहे. जाधववाडी (ता. जुन्नर) गावाची श्री जगदंबा माध्यमिक विद्यालय ही शाळा कालव्याच्या बाजूला असून येथील शाळेत शिकत असलेली इयत्ता पाचवीमधील मुस्कान बशीर पठाण ही सायकलवरून शाळेत जात होती. तिचे घर कॅनॉलच्या एका बाजूला असून दुसºया बाजूला शाळा आहे. मुस्कान पुलावरून जात असताना तिचा तोल गेला व या पुलाला कठडे नसल्याने ती पाण्यात पडली.
ती जेव्हा सायकलसह पाण्यात पडली तेव्हा तिच्याबरोबर काही विद्यार्थी शाळेत चालले होते. त्यांच्यापैैकी इयत्ता आठवीत शिकणारा वैभव सुनील गायकवाड या विद्यार्थ्याने स्वत:च्या जिवाची पर्वा न करता कॅनॉलमध्ये उडी मारली व ही वाहत जात असलेली मुलगी जवळपास शंभर मीटरवर गेलेली असतानादेखील तिचा पाण्यात पोहत जाऊन तिला पकडले. पुढे पोहत जाऊन कॅनॉलमध्ये शेतकºयांनी टाकलेल्या पाइपलाइनला पकडून बाहेर काढले.
विशेष म्हणजे ही मुलगी जेव्हा पाण्यात पडली तेव्हा तिच्याबरोबर असलेल्या विद्यार्थ्याने आरडाओरडा केला होता. आरडाओरड झाल्याने आजूबाजूला असलेले ग्रामस्थ घटनास्थळी आले होते. परंतु मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने तिला वाचवण्यासाठी कोणीही उडी मारली नव्हती. परंतु या चौदावर्षीय मुलाने कुठलाही विचार न करता कॅनॉलमध्ये उडी मारून तिचा जीव वाचवला व सायकल व तिचे दप्तर वाहून गेले.
मुख्याध्यापक एस. ए. कसाळ, तसेच राजेंद्र पायमोडे, रामदास जाधव, अविनाश गायकवाड, किशोर गायकवाड, संतोष जाधव, तसेच विद्यालयातील सर्व शिक्षकांनी या बहादूर विद्यार्थ्याचा सत्कार केला. मुलाचा राज्यपातळीवर सत्कार व्हावा, यासाठी विद्यालयाच्या वतीने पाठपुरावा करणार आहे, असे मुख्याध्यापक एस. ए. कुसाळ यांनी सांगितले.