पालावरची बिनभिंतीची शाळा! एक अनोखा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 04:29 AM2018-01-01T04:29:27+5:302018-01-01T04:29:36+5:30

ज्या समाजात पिढीजात शिक्षण नाही, दर काही महिन्यांनी त्यांची राहण्याची जागा बदलते, कामाचं ठिकाण बदलतं, रोज मजुरी मिळेलच याची खात्री नाही, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, गरिबी आणि शिक्षणाचा अभाव अशा एक ना अनेक समस्यांचा सतत ससेमिरा झेलत जीवन जगणारा समाजातील असा एक उपेक्षित घटक म्हणजे पोतराज.

 School of Unbelievable Education! A unique undertaking | पालावरची बिनभिंतीची शाळा! एक अनोखा उपक्रम

पालावरची बिनभिंतीची शाळा! एक अनोखा उपक्रम

Next

- सुनील जगताप
उरुळी कांचन : ज्या समाजात पिढीजात शिक्षण नाही, दर काही महिन्यांनी त्यांची राहण्याची जागा बदलते, कामाचं ठिकाण बदलतं, रोज मजुरी मिळेलच याची खात्री नाही, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, गरिबी आणि शिक्षणाचा अभाव अशा एक ना अनेक समस्यांचा सतत ससेमिरा झेलत जीवन जगणारा समाजातील असा एक उपेक्षित घटक म्हणजे पोतराज.
अशा उपेक्षित समाजाच्या आयुष्यात नवचैतन्य आणण्याचे काम सोरतापवाडी येथील सामाजिक कार्यकर्त्या प्रांजली चौधरी (ढगे)
या करीत आहेत. प्रांजली या समाजातील नव्या पिढीला अक्षरओळख करून देऊन त्यांच्या आयुष्यातील अज्ञानाचा अंधकार
दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
त्या समाजात एक नवचैतन्य आणायचे काम करीत आहेत. यामागे
त्यांचे प्रयोजन काय असे विचारले असता, केवळ आनंद व या उपेक्षित समाजाची शैक्षणिक परवड थांबविताना मिळणारे मानसिक समाधान वेगळेच असल्याचे
मत प्रांजली चौधरी (ढगे) यांनी
व्यक्त केले.

याबद्दल अधिक माहिती देताना प्रांजली म्हणाल्या की, आमच्या वस्तीवर डोंगराच्या बाजूला असलेल्या माळरानावर आपली पालं टाकून ही दहा-बारा कुटुंबं दरवर्षी काही काळ राहायला येतात. यात एक वर्ष वयापासून अठरा-वीस वयाच्या मुला-मुलींचा समावेश आहे. मात्र, त्यांचा अबकड या मराठी भाषेतील बाराखडीतील अक्षरांशी कसलाच संबंध आलेला नसल्याने दैनंदिन जीवनात वावरताना त्यांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते आणि काही वेळा फसवणूक, अडवणूक वा काही अपमानालाही सामोरं जावं लागतं.

या गोष्टी ध्यानात घेऊन प्रांजली चौधरी (ढगे) यांनी त्या खासगी कंपनीतील आपले काम संपवून घरी आल्यावर या मुला-मुलींशी जवळीक साधून त्यांची शिक्षणाच्या बाबतीत काय अडचण आहे व ती कशी दूर करायची याबाबत माहिती घेतली आणि नंतर त्यांच्या अनपड आई-वडिलांशी चर्चा करून त्यांना दररोज सायंकाळी अबकड शिकवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या माळावरच्या बिनभिंतीच्या शाळेत एक एक करत जवळपास २५ मुलं-मुली शिकू लागली व त्यांच्या आयुष्याच्या नव्या बदलाची खरी सुरुवात झाली.

कामाचं चीज होतंय

या शाळेत शिकायला वयाची अट नसल्याने एक लग्न झालेली जोडी पण अबकड शिकत आहे आणि आपली मुले शिकत असताना बघून त्यांचे अशिक्षित आई-वडील पण समाधानी झाल्याचा वेगळाच अनुभव या ठिकाणी पाहायला मिळत आहे.
यांचा अनुभव विचारले असता त्या म्हणाल्या, की मुलांना शिक्षणाची आवड आहे. अभ्यासाची गोडीही निर्माण झाली आहे आणि मुलांची लिखाण व वाचनात छान प्रगती होत असताना दिसत आहे. त्यांचे अक्षरही मोत्यासारखे आहे. मुलांची आकलनशक्ती वाढलेली आहे. त्यांच्यातील सुप्त गुण हळूहळू विकसित होत असताना दिसत आहेत. यामुळे आपण
करत असलेल्या कामाचं चीज
होत आहे याचं समाधान काही वेगळंच आहे..
प्रांजलीच्या कार्यामुळे
अनेक निरागस मुलांच्या आयुष्यात सोनेरी पहाट
येऊन त्यांच्या आयुष्याला नवीन कलाटणी मिळेल हे
मात्र निश्चित.

Web Title:  School of Unbelievable Education! A unique undertaking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा